::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 19/11/2019)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. अर्जदार हा वरील नमूद पत्त्यावर राहत असून अर्जदाराचे गैरअर्जदार बॅंकेत क्र. 963718210000001 हे बचत खाते आहे व त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. अर्जदाराचे सदर बचत खात्याचे पासबुक मधील नोंदीनुसार दिनांक 14/6/2017 रोजी एम पे आणि आयडिया मनी द्वारे एकूण रू.22,500/- अर्जदाराच्या खात्यामधून काढण्यात आले. सदर रक्कम ही अर्जदाराने काढलेली नसून अर्जदार हा एम पे व आयडिया मनी या योजनेचा रजिस्टर्ड उपभोक्ता नाही तसेच अर्जदार कुठलाही अँड्रॉइड मोबाईल वापर करीत नाही. त्यामुळे अर्जदाराचे बँक खात्यामधून ऑनलाईन पैसे काढण्याचा झालेला व्यवहार हा अर्जदाराने केलेला नसून गैरअर्जदार बँकेतील तांत्रिक चुकीमुळे झालेला आहे. अर्जदाराचे खात्यातून रक्कम कमी झाल्याचा दिनांक 14/6/2017 रोजी बँकिंग मेसेजद्वारे समजताच अर्जदाराने ताबडतोब शाखा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, बायपास रोड, चंद्रपूर येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवर रात्री 22.50 वाजता जाऊन सदर खात्यातील रक्कम तपासली असता एटीएम मशीन मधून ट्रांझॅक्शन डिक्लाइन्ड असे नमूद करून पावती बाहेर आली यामुळे अर्जदाराला मानसिक धक्का बसला. बँकेकडे तोंडी तक्रार नोंदविली असता गैरअर्जदाराने, अर्जदारांला, बँकेला लेखी तक्रार द्या व त्यावर चौकशी करून एटीएम मधून अर्जदाराच्या बँक खात्यातून वजा झालेली रक्कम लवकरच अर्जदाराच्या खात्यात जमा होईल असे सांगितले. परंतु अर्जदाराने सदर तक्रारीची दुय्यम प्रत गैरअर्जदार यांच्याकडून सही करून घेतलेली नाही. खात्यातून वजा झालेल्या रक्कम रू.22,500/- पैकी दिनांक 16/6/2017 रोजी रू.2500/- एवढीच रक्कम गैरअर्जदार बँकेकडून अर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. ठेवलेली रक्कम ही सुस्थितीमध्ये राहावी व खातेदाराने रक्कम मागितल्यानंतर रकमेचा विड्रॉल व्हावयास हवा. परंतु दिनांक 14/6/2017 रोजी प्रस्तूत रू.22,500/- काढण्याचा कोणत्याही प्रकारे ऑनलाईन पद्धतीने व्यवहार अर्जदाराने केलेला नाही मात्र तरीदेखील त्याच्या सेव्हींग खात्यामध्ये विड्रॉल दाखवत आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराच्या ठेवीच्या सुरक्षीततेची काळजी न घेवून सेवेत न्यूनता केली आहे व अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे. सबब अर्जदाराने प्रस्तूत तक्रार दाखल केली असून अर्जदारांची मागणी आहे की गैरअर्जदाराकडे असलेले त्याचे बचत खाते क्र. 963718210000001 मधून बेकायदेशीररीत्या काढण्यांत आलेल्या रू.22500/- पैकी गैरअर्जदार यांनी रू.2500/- जमा केलेले असल्यामुळे उर्वरीत रू.20,000/- अर्जदारांस रक्कम काढल्याचा दिनांक 14/6/2017 पासून 12 टक्के व्याजासह गैरअर्जदार बँकेकडून अर्जदाराला परत मिळावे तसेच झालेल्या शारीरिक मानसिक आर्थिक त्रासापोटी रू.20000/- व तक्रार खर्च रू.10,000/- अर्जदाराला देण्याचे आदेश व्हावेत.
3. मंचातर्फे विरूध्द पक्ष यांना नोटीस पाठविण्यात आली. विरूध्द पक्ष यांनी मंचासमक्ष उपस्थित राहून त्यांचे लेखी उत्तर दाखल करून अर्जदाराचे तक्रारीतील म्हणणे खोडून काढत पुढे नमूद केले की दिनांक 14/6/2017 रोजी अर्जदाराच्या खात्यात बीडीआय जीपी व्यवहार झालेला असून त्याचा अर्थ, एम पैसा व आयडिया मनि या ऑनलाइन पोर्टल असलेल्या कंपनीने कुठल्या तरी ऑनलाईन बिलाचे पेमेंट केले व ती रक्कम अर्जदाराच्या खात्यातून वजा करण्यात आलेले आहेत. काही फसवणुक करणा-या ऑनलाइन कंपन्या एखाद्या खातेदाराचे संपर्क साधून त्या खातेदाराकडून त्याच्या खात्याशी संबंधीत एटीएम कार्डबाबतची संपूर्ण माहिती दिशाभूल करून काढून घेतात. वास्तविकतः बँक कधीही त्यांच्या खातेदाराकडून त्यांच्या एटीएमशी संबंधित माहिती, उदा. कार्ड क्र., पिन कोड नंबर, फोन नंबर इत्यादी गुप्त माहिती मागत नाही किंवा तसा फोन देखील कधीच बँक किंवा त्यांचे कर्मचारी खातेदाराला करीत नाही. ऑनलाइन पोर्टल असलेल्या फ्रॉड कंपनीकडून अर्जदाराला संपर्क केला गेला असेल व अर्जदाराकडून त्यांच्या खात्याची एटीएम कार्डबाबत गुप्त माहिती काही आमीष दाखवून मागितली असेल व अर्जदार त्यांच्या जाळ्यात अडकला असावा. अशा वेळी सदर फ्रॉड पोर्टलवरून अर्जदाराकडून सदर व्यवहारापोटी तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर जनरेट झालेला ओटीपी मागितला असावा व अर्जदाराने सदर ओटीपी सदर कंपनीला पुरविला असावा व म्हणून ट्रॅंझॅक्शन पूर्ण झाले असावे. दुसऱ्या पद्धतीत सदर फ्रॉड ऑनलाइन कम्पनी ओटीपी खातेधारकांना एटीएम कार्डचा गुप्त पिन कोड मागते व सदर पिन कोड खातेधारकांने दिल्यास ती ऑनलाईन कंपनी असे व्यवहार करू शकते. सदर कंपनीला अर्जदाराने ओटीपी नंबर किंवा स्वतःच्या एटीएम कार्डचा गुप्त पिनकोड नंबर सांगितला असावा व त्यामुळे सदर कंपनीने फ्रॉड करून हे ट्रांझॅक्शन केलेले असावे व प्रत्येकी रू. 10,000/- चे दोन ट्रॅंझॅक्शन सफल झाल्यामुळे खात्यातून रू.20000/- वजा झाले असावे मात्र रू.2500/- चे ट्रॅंझॅक्शन असफल झाले असल्याने ते पैसे आपोआप अर्जदाराच्या खात्यात परत जमा झाले. सदर व्यवहारावरून ही बाब स्पष्ट होते की अर्जदार बरोबर वरील कंपन्यांनी धोकाधडी करून त्यांचा पैसा हडपलेला आहे व त्यात बँकेची कुठलीही चूक नाही. तसेच सदर धोकाधडी ही अर्जदाराने सदर कंपन्यांना त्यांचे खात्याची गुप्त माहिती पुरविल्याने झालेली आहे. या प्रकरणात गैर अर्जदाराचा कुठलाही संबंध नाही. वास्तविकतः अर्जदाराने सदर कंपनीविरुद्ध फौजदारी तक्रार करावयास पाहिजे परंतु तसे न करता विनाकारण गैरअर्जदाराविरुद्ध खोटी तक्रार दाखल करून अर्जदार बँकेला वेठीस धरू पाहत आहे. सबब अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
4. अर्जदाराची तक्रार, दस्ताऐवज, शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, लेखीयुक्तीवाद तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद व तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
कारण मिमांसा
5. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा आहे की अर्जदाराचे गैरअर्जदाराकडे बचत खाते असून दिनांक 14/6/2017 रोजी एम पैसा आणि आयडिया मनी द्वारे त्यांच्या खात्यातून एकूण रू. 22,500/- काढण्यात आले असून सदर रक्कम अर्जदाराने काढली नाही असे त्याचे म्हणणे आहे तसेच अर्जदार कोणत्याही अँड्रॉइड मोबाईलचा वापर करीत नाही. सदर रक्कम बचत खात्यातून वजा झाल्याचा मेसेज त्याला बँकिंग मेसेज द्वारे समजले तेव्हा त्याने जवळच्या एटीएम मध्ये जाऊन खात्यातील रक्कम तपासली असता ट्रॅंझॅक्शन डिक्लाईन्ड व अनअॅथोराईज्ड कार्ड युसेज अशी पावती मशीनमधून प्राप्त झाली. अर्जदारने त्याबद्दल गैरअर्जदाराकडे तक्रार दिली संबंधीत अधिकाऱ्याने, त्यांचे खात्यातून वजा झालेली रक्कम पुन्हा खात्यात जमा होईल असे सांगितले. परंतु दिनांक16/6/2017 रोजी केवळ रू.2,500/- एवढीच रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली. गैरअर्जदाराने त्यांच्या उत्तरात अर्जदाराच्या चुकीमुळे सदर गैरव्यवहार झाला असे नमूद करून आयडीयां मनी या ऑनलाइन पोर्टल असलेल्या कंपन्या असतात व त्यांनी अर्जदाराशी संपर्क साधून त्यांच्या खात्याची गुप्त माहिती मिळवली व यात गैरअर्जदाराची कोणतीही सेवेतील त्रुटी नाही असा बचाव प्रस्तूत केला आहे. दोन्ही पक्षाचे युक्तिवाद व दस्तावेज यांचे अवलोकन केले असता अर्जदाराने तक्रारीत निशाणी क्र. 5 सह दस्त क्र. 2 वर गैरअर्जदार बँक यांनी दिलेल्या बॅंकींग मॅसेज ची प्रत दाखल केलेली आहे मात्र यावरून असे स्पष्ट दिसून येते आहे की अर्जदार हा अँड्रॉइड फोनचा वापर करतो हे सिध्द होते. ऑनलाईन फ्रॉड करणारे पोर्टलवरून मागविली जाणारी खात्याशी निगडीत गोपनीय माहिती कोणत्याही परिस्थितीत कोणालाही कळवू नये असे बँक ही त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सतर्क करीत असते. बॅंकींग व्यवहारातील सुरक्षीततेच्या उपाययोजनेअंतर्गत कोणताही ऑनलाईन व्यवहार करतांना बॅंकेमार्फत ओटीपी खातेदाराच्या रजिस्टर्ड मोबाईलवर पाठविला जातो व सदर ओटीपी वापरूनच सदर व्यवहार पूर्ण केला जाऊ शकतो. परंतु सदर प्रकरणात अर्जदाराने बँकेने वेळोवेळी दिलेल्या आवश्यक सुचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्या खात्यातून रक्कम काढण्यांत आली असावी असे मंचाचे मत आहे. वरील व्यवहारात गैरअर्जदार बँकेची कोणतीही चूक नसून त्यांनी अर्जदाराला दिलेल्या सेवेत कोणतीही न्युनता निदर्शनांस येत नाही. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.१५०/१७ खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.