तक्रारदारातर्फे :- अँड. बी.एस.कदम
सामनेवालेतर्फे :- अँड. एन. एम. कुलकर्णी.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हे दिंद्रुड ता. माजलगांव जि. बीड येथील रहिवाशी आहे. मौजे दिंद्रुड शिवारात गट नं. 249 व 250 मध्ये 2 एकर साडे चौसा आर बागायती जमीन असून तो अल्पभूधारक शेतकरी आहे. तक्रारदाराने सामनेवाले नं. 2 कडून ता. 29/6/2009 रोजी यशोदा तूर-45 हे बियाणे 2 बॅग खरेदी केले. ज्याचा बॅच नं. 90040-42 आहे. सामनेवालेने बियाणे खरेदीचे बिल क्रं. 396 चे तक्रारदारास दिलेले आहे.
तक्रारदाराने योग्य ती मशागत करुन तारीख 29/6/2009 रोजी वरील दोन्हीही गट नंबर मधील क्षेत्रावर 4 बाय 1.5 फुट अंतरावर टोकण पध्दतीने तुरीची लागवड केली. त्यावेळी डीएपी-2 बँक खत दिले.
तूर लागवड केल्यानंतर उगवण 100 टक्के झाली. एक महिन्याने 1 बॅग युरिया व 1 बॅग पोटॅश खत दिले. अंतरमशागत करुन रान स्वच्छ केले. पाण्याच्या पाळया दिल्या. कालांतराने पिकाची अवास्तव वाढ दिसू लागली. तूर पिकास तुरळक जवळपास फक्त 10 टक्के झाडांना फुले दिसू लागली. वेळोवेळी फवारणीही केली. तूर लागवड करुन 165 दिवसांचा कालावधी झाल्यानंतरही 90 टक्के झाडास फुले व शेंगा आल्याच नाहीत. झाडे वांझोटी दिसू लागली. पिक न आल्याने तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे तक्रारदारास मानसिक धक्का बसला.
तारीख 15/12/2009 रोजी गट विकास अधिकारी माजलगांव यांना वरील पिकाबाबत तक्रार अर्ज दिला. तारीख 22/12/2009 रोजी सामनेवाले नं. 1 यांनी सामनेवाले नं. 2 मार्फत तुरीच्या झाडांना शेंगा न लागल्याने आर्थिक नुकसान झाल्याबाबत तक्रारी दिली.
तारीख 23/12/2009 रोजी श्री हजारे एस. जी. कृषि अधिकारी, पंचायत समिती, माजलगांव यांनी प्रत्यक्ष शेतावर येऊन तूर पिकाची पाहणी केली. फक्त 10 टक्के झाडांना शेंगा दिसून आल्या. उर्वरीत झाडांना शेंगा अथवा फुले दिसून आली नाहीत. कृषी अधिकारी यांनी पंचनामा केला.
जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने तारीख 06/01/2010 रोजी प्रत्यक्ष शेतामध्ये येऊन भेट देवून पंचनामा केला. तारीख 12/01/2010 रोजी निदान चमु (विस्तार कृषी विधावेता, वनस्पती विकृती शास्त्रज्ञ, उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगांव ) यांनी भेट देवून पिकाचे निरीक्षणे घेतली व त्या अनुषंगाने निष्कर्ष देण्यात आले.
तारीख 08/02/2010 रोजी सामनेवाले नं.1 यांना तूर पिकास शेंगा न लागल्यामुळे आर्थिक नुकसान झालेबाबत तक्रारी अर्ज दिला व तो त्यांना तारीख 13/02/2010 रोजी मिळाला.
तूर चांगली आल्यावर एक एकरला एका बॅगला 10 क्विंटल उत्पादन होते. एकूण 2 बँगला 20 क्विंटल उत्पादन झाले असते. परंतू बियाणे खराब निघाल्यामुळे तक्रारदाराचे अतोनात नुकसान झाले. 1 क्विंटला 4,000/- भावाप्रमाणे जवळपास रुपये 80,000/- चे नुकसान झाले. तक्रारदारास शारिरीक , मानसिक त्रास झाला. त्यापोटी रक्कम रु. 20,000/- मिळण्यास तो हक्कदार आहे. खते फवारणी पाळया घालणे, अंतर मशागत, पाणी देणे इत्यादी खर्च रक्कम रु. 10,000/- मिळण्यास हक्कदार आहे. दाव्याचा खर्च रु. 10,000/- मिळण्यास तकारदार हक्कदार आहे.
विनंती की, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम रु.1,20,000/- सामनेवाले नं. 1 व 2 कडून देण्याबाबत आदेश व्हावा.
सामनेवाले नं. 1 यांनी त्यांचा खुलासा तारीख 11/6/2010 रोजी दाखल केला. त्यांच्या खुलाशात सामनेवालेंनी तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. सदरचे आक्षेप सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदारावर आहे. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय बियाणे तक्रार समितीने त्यांच्या अहवालाद्वारे स्टॅरीलिटी मोझॅकमुळे आणि काही प्रमाणात नॉन पॅथोजेनिक ऑर्गनीजमुळे 65 टक्के ते 70 टक्के वांझपणाची विकृती आल्याचे नमूद केलेले आहे. मात्र त्याबाबत सक्षम निरीक्षणे नोंदविलेली नाहीत. चौकशी समितीने तक्रारदाराच्या पेरणीच्या पध्दती बाबत बियाण्यांची मात्रा/प्रमाणा बाबत काहीही नमूद केलेले नाही. सदर समितीचा अहवाल अपूर्ण आहे तो सामनेवालेंना मान्य नाही.
सामनेवाले नं. 1 च्या वतीने शेतक-यास आवश्यक असणा-या वेगवेगळया बियाणांच्या संशोधीत जाती निर्माण करण्यात येतात व सामनेवालेंचे तज्ञ ‘ब्रीडर’ वेळोवेळी सखोल अभ्यास करुन नवनवीन आधुनिक जातींची निर्मिती करीत आहेत व त्यानुसार सामनेवाले यांचे वतीने यशोदा-45 ही संशोधीत वाण निर्माण केलेली असून सदरील वाण सरळ वाण आहे व ही प्रतिबंधक जात आहे. सदर वाण हे महामंडळाचे बी.एस.एम.आर.736 प्रमाणे आहे.
सदर वाणाबाबत तक्रारदारातर्फे दाखल करण्यात आलेले स्टेटमेंट-1 व 2 नुसार सदरील वाणाची व्हरायटी, सदरील वाणाची निर्मिर्ती, लॉटची संख्या, सदरील वाण तपासणी केल्याची तारीख, त्याची उगवण क्षमता या सर्व बाबी स्पष्ट होत आहेत. त्यानुसार सदरील वाणाची उगवण क्षमता 98 टक्के असल्याचे दिसून येत आहे व त्यामुळे सदरील वाण हे चांगल्या व उत्तम प्रतीचे दर्जेदार असल्याचे सिध्द होत आहे.
सदर वाणाची तूर ब-याच शेतक-यांनी खरेदी केलेली असून त्यांनी आपापल्या शेतामध्ये पेरणी केलेली आहे. बियाणाच्या दर्जाबाबत कोणत्याही तक्रारी नाहीत. उगवण चांगली झाली असून उत्पादन चांगले झाले आहे. त्याबाबत त्यांनी त्यांचे जबाब नोंदवलेले आहेत.
स्टरलॅटी मोझॅक या रोगाचा माईटस (कोळी) या किडीपासून प्रादुर्भाव होतो. त्यामुळे यशोदा-45 या वाणाला दोष देता येत नाही. तक्रारदाराने माईटस (कोळी) या किडीसाठी पुरशी नाशक अथवा कोळी नाशक या औषधाची फवारणी केल्याचे दिसून येत नाही. त्याच प्रमाणे जमिनीचे क्षेत्र पेरलेल्या बियाण्यांची मात्रा, खताचे प्रमाण हे विषम स्वरुपाचे आहे. पेरणीची पध्दत, हेक्टरी वापरलेले बियाणे, पेरणीच्या वेळी जमिनीतील ओलावा, इत्यादी बाबी महत्वाच्या आहेत. त्यामुळे तक्रारदाराच्या नुकसानीस वाण जबाबदार नसून तक्रारदाराचा निष्काळजीपणा जबाबदार आहे.
जिल्हास्तरीय समितीमध्ये अहवाल देता असतांना बियाण्यांच्या वांझपणाबाबत तज्ञ शास्त्रज्ञांचा समावेश नसल्यामुळे बियाण्याच्या वांझपणाबाबतच समितीचा निष्कर्ष अयोग्य स्वरुपाचा आहे. याउलट सामनेवाले कंपनीतर्फे सदरील वाणाची अचुक परीक्षण करुनच व त्याची खात्री झाल्यानंतर सदरील वाण विक्रीसाठी पाठवण्यात आलेले आहे.
बियाणे कायदयातील तरतुदीप्रमाणे तक्रारदाराने वादग्रस्त बियाण्यांचा नमुना मा. न्याय मंचासमोर दाखल करणे आवश्यक आहे. यासंदर्भात बियाणे प्रमाणीत करण्याचा कायदा- 1956, कलम-13 सी ते जे नुसार नमुना काढून तपासणीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. वादग्रस्त बियाण्यांचा नमुना पुराव्या दाखल सदर प्रकरणात सादर केलेला नसल्यामुळे बियाण्यांच्या उत्पादन क्षमतेबाबत शंका घेता येणार नाही व खात्री होणार नाही. तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी.
सामनेवाले नं. 2 यांनी त्यांचा खुलासा तारीख 01/07/2010 रोजी दाखल केला. त्यांनी तक्रारदाराच्या तक्रारीतील त्यांच्या बाबतचे सर्व आक्षेप नाकारलेले आहेत व सामनेवाले नं. 1 प्रमाणेच त्यांचा खुलासा आहे. बियाणे तक्रारदारांना विकल्याची बाब सामनेवालेंना मान्य आहे. परंतू सदरचे बियाणे हे खरेदी करीत असतांना कंपनीचे नांव, बॅच नंबर, पॅकींग सर्व गोष्टी व्यवस्थीत तपासूनच तक्रारदाराने घेतलेले आहे. सदर बियाणे हे प्रमाणीत बियाणे आहे. सदर बियाणे हे कंपनीचे अधिकृत बियाणे आहे.
त्याच हंगामामध्ये सदर सामनेवाले यांनी एकूण 20 शेतक-यांना सदर वाणाचे बियाणे विकलेले आहे. त्यांची नांवे सामनेवालेंनी खुलाशात निमूद केलेली आहेत, मात्र त्या शेतक-यांच्या तुरीच्या उत्पादनाबाबत तक्रारी नाहीत. उत्पादनाबाबत त्यांचे समाधान झालेले आहे. असे त्यांनी त्यांच्या जबाबात मान्य केलेले आहे. तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे साक्षीदार विठ्ठलराव काशीद, सिध्देश्वर हजारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगांव, सामनेवाले नं. 1 चा खुलासा, शपथपत्र, सामनेवाले नं. 2 चा खुलासा, शपथपत्र, साक्षीदार बाळासाहेबर माने, रामेश्वर शहाजी ठोंबरे, खोलेश्वर कृषी सेवा केंद्र श्री धोंडीराम लिंबाजी देवकर, शेतकरी, श्री गंगाधर त्रिंबक शिंदे, शेतकरी, रा. शिंदेवाडी, श्री धर्मराज सुंदर बडे, शेतकरी रा.शिंदेवाडी, मधुकर हरिभाऊ सातपुते, शेतकरी रा. शिंदेवाडी यांची शपथपत्रे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान अँड. बी.एस. कदम, व सामनेवाले नं; 1 व 2 चे विद्वान अँड. एन.एम. कुलकर्णी यांचा युक्तिवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदाराचे मौजे दिंद्रुड ता. माजलगांव शिवारात गट नं. 249 मध्ये 65.11 आर, व गट नं. 250 मध्ये 32 आर शेतजमीन आहे. ही बाब 7/12 उता-यावरुन स्पष्ट होते. तक्रारदाराने सन 2009-10 हंगामात वरील शेतजमीनीत तुरीच्या पिकाची लागवड केलेली होती. त्याची नोंद 7/12 उता-यामध्ये आहे.
तक्रारदाराने पावती क्रं. 396 अन्वये सामनेवाले नं. 1 ने उत्पादित केलेली तूर-45 बियाणे सामनेवाले नं. 2 कडून 2 नग प्रती 1 किलो ग्रामचे विकत घेतलेले आहेत, ही बाब सामनेवाले नं. 1 व 2 यांना मान्य आहे.
सदर बियाणाची लागवड तक्रारदाराने केल्यानंतर बियाणाची उगवण चांगल्या त-हेने झाली, पिकाची वाढ चांगल्या प्रकारे झाली परंतू फुल व फळे यावयाच्या वेळेला फक्त कांही झाडांना फुल व फळे लागली व इतर झाडांना लागली नाहीत. म्हणून तक्रारदाराने सामनेवाले नं. 2 कडे तक्रार केली. तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार कृषी अधिकारी यांनी पाहणी करुन पंचनामा तारीख 23/12/2009 रोजी केला. बियाणे समितीने त्यांचा निष्कर्ष दिलेला आहे. सदर निष्कर्षात त्यांनी नमूद केलेले आहे की, यशोदा-45 या जातीत आढळून आलेले स्टॅरीलिटी मोझॅक या रोगामुळे पिकात 65 टक्के ते 70 टक्के झाडांना वांझपणा आढळून आला, त्यामुळे उत्पादनात घट येवून आर्थिक नुकसान झाल्याने तक्रारीत तथ्या आढळून येते. सदर निष्कर्षाच्या संदर्भात व पंचनाम्याच्या संदर्भात तक्रारदाराने संबंधीत कृषी अधिकारी यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
सामनेवालेंनी यशोदा-45 हे तुरीचे वाण इतर शेतक-यांनीही विकत घेतलेले असून त्यांना सदर पिकापासून चांगले उत्पादन आल्याबाबत वर नमूद केलेल्या अनेक शेतक-यांची शपथपत्रे दाखल केलेली आहेत. सदरचे सर्व शेतकरी हे शिंदेवाडी येथील आहेत. त्यातील एकही शेतकरी हा दिंद्रुड गावातील नाही व दिंद्रुड शिवारात त्यांची शेतजमीन असल्याचे त्यांचे म्हणणे नाही. दिंद्रुड शिवारातील तुरीचे यशदा-45 या वाणाचे बियाणे लागवड केल्याबाबतचे एकाही शेतक-याचे शपथपत्र सामनेवालेंनी दाखल केलेले नाही.
वांझपणा हा डोळयाने दिसणारा नसून त्यासाठी प्रयोग शाळेचा अहवाल अत्यंत आवश्यक आहे, अशी हरकत सामनेवालेंनी घेतलेली आहे. तसेच सदरचे बियाणे हे बियाणे कायदयातील तरतुदीनुसार प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले नाही, त्यामुळे बियाणे समितीचा अहवाल हा योग्य नाही, तो ग्राहय धारता येणार नाही, अशी जोरदार हरकत सामनेवाले वकिलांनी घेतलेली आहे. याबाबत बियाणे कायदा व बियाणे समितीचा अहवाल व ग्राहक संरक्षण कायदा यांचा बारकाईने अभ्यास करता स्पष्ट होते की, बियाणे कायदयातील तरतुदीनुसार जरी बियाणे समितीने सदरचे पिक हे प्रयोग शाळेकडे पाठवलेले नाही. तथापि, बियाणे सदोष आहे, दोषयुक्त आहे, हे शाबीतीची जबाबदारी सामनेवालेंवर आहे. ज्यावेळेला सामनेवालेने बियाणे समितीचा अहवाल नाकारला, त्यास हरकत घेतली. सदरची हरकत ही खुलाशात घेतलेली आहे. तथापि, पिक पाहणीच्या वेळी सदर कंपनीचे प्रतिनिधी तेथे हजर होते. त्यांनी त्यासंदर्भात कोणतीही हरकत घेतलेली नाही. तसेच बियाणे समितीचा निष्कर्ष बियाणे उत्पादक कंपनीला प्राप्त झाल्यानंतर सदर कंपनीने देखील सदर अहवालाच्या संदर्भात कुठलाही आक्षेप बियाणे समितीकडे नोंदवलेला नाही. ग्राहक संरक्षण कायदयातील कलम-13 (1)(सी) प्रमाणे बियाणाचा नमुना न्याय मंचात दाखल करुन सदरचा नमुना हा प्रयोगशाळेकडे पाठविण्यासाठी कार्यवाही करु शकत होते, परंतू यासंदर्भात बियाणे उत्पादित कंपनीने कोणतीही पावले उचललेली नाहीत. तर केवळ बियाणे समितीच्या अहवालास हरकत घेतलेली आहे. भारतीय पुरावा कायदयातील तरतुदीनुसार व ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार बियाणे दोषयुक्त असल्याचे विधान शाबीत करण्याची जबाबदारी बियाणे कंपनीची असतांना बियाणे कंपनीने त्याप्रमाणे कार्यवाही केलेली नाही, त्यामुळे सामनेवालेची वरील हरकत या ठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही. बियाणे समितीचा अहवाल हा तज्ञाचा अहवाल असल्याने व सदर अहवालात 65 ते 70 टक्के झाडांना वांझपणामुळे फुल व फळांची धारणा झालेली नाही, असे स्पष्ट असल्याने सदरचा अहवाल ग्राहय धरणे उचित होणार नाही, असे न्याय मंचाचे मत आहे. तसेच यांसंदर्भात बियाणे उत्पादक कंपनीने सदर कृषी अधिकारी यांची उलटतपासणी घेतलेली नाही. यासंदर्भात सामनेवाले यांनी तूर या कडधान्याच्या लागवड तंत्राबाबत माहितीपत्रक तसेच स्टॅरीलिटी मोझॅक या रोगाबाबत करावयाची उपाययोजना बाबतचे माहितीपत्रक दाखल केलेले आहे व तसेच खालील न्याय निवाडयाचा आधार घेतलेला आहे.
1. 2004 2 सीपीआर-62 मा. ओरिसा राज्य आयोग.
ग्राहक संरक्षण कायदा-1986, कलम-2 1 जी – सेवेत कसूर – शेती –
दोषयुक्त बियाणे – तपासणीसाठी नमुना आवश्यक –सामनेवालेकडून
बियाणे विकत घेतले – सदर बियाणे उगवले नाही असा आक्षेप –
दोषयुक्त बियाणाची विक्री केल्याबाबत नुकसान भरपाई मिळण्यासाठी
तक्रार – प्रयोगशाळेत नमूना पाठवला नाही – त्यामुळे दोषयुक्त बियाणाचा
आक्षेप प्रयोगशाळेच्या तपासणीमार्फत शाबीत नाही – त्या व्यतिरिक्त
कोणताही पुरावा नाही—बियाणे दोषयुक्त असल्याचे विधान स्विकार्य नाही.
वरील न्याय निवाडयाचे सखोल वाचन केले असता सदर प्रकरणात बियाणे तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले नसले तरी बियाणे समितीचा अहवाल रेकॉर्डवर आहे व त्यासंदर्भात सामनेवालेंनी केवळ आक्षेप घेतलेला आहे, परंतू त्यांची पुढील कार्यवाही नाही. त्यामुळे वरील न्याय निवाडा हा सामनेवालेच्या म्हणण्याच्या समर्थनार्थ लागू होत नाही, असे न्याय मंच नम्रपणे नमूद करीत आहे.
तक्रारदाराने प्रत्येकी 1 किलोची बॅग अशा 2 बॅगा 2 किलो बियाणे 2 एकर क्षेत्रात लागवड केलेले आहे, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदाराच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे एकूण रुपये 80,000/- चे उत्पन्नाचे नुकसान झाल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. यासंदर्भात सामनेवालेने दाखल केलेले माहितीपत्रक पाहता प्रति हेक्टरी लागवडीसाठी लागणारे बियाणे हे 20 ते 25 किलो आहे. तक्रारदाराच्या एकूण 94 आर क्षेत्रावर तक्रारदाराने केवळ 2 किलो बियाणाची लागवड केलेली आहे. तसेच हेक्टरी उत्पादन पाहता जिरायत शेतजमीनीत प्रतीहेक्टरी 12 ते 20 क्विंटल व बागायत शेतजमीनीत प्रती हेक्टरी 20 ते 25 क्विंटल उत्पन्न होते. तक्रारदाराने केवळ 2 किलो बियाणे 94 आर क्षेत्रात टाकलेले आहे, त्यामुळे 2 किलोंच्या दृष्टीने विचार करता तक्रारदाराने केलेली मागणी ही प्रथमदर्शनी योग्य दिसत नाही. परंतू बियाणे समितीचा अहवाल पाहता 65 ते 70 झाडांना फुल व फळधारणा झालेली नाही, यावरुन तक्रारदाराचे निश्चित नुकसान झालेले आहे. यासंदर्भात विचार करता तक्रारदाराची शेतजमीन ही बागायती आहे व तक्रारदाराने केवळ 2 किलो बियाणाची लागवड केलेली आहे. माहितीपत्रकातील माहितीनुसार प्रति हेक्टरी 20 ते 25 किलो बियाण्याला 20 ते 25 क्विंटल उत्पादन येते, यावरुन स्पष्ट होते की, 2 किलोला 2 क्विंटल तक्रारदारांना उत्पादन आले असते. तक्रारदाराने त्यावेळच्या बाजार भावाचा कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगांवचा दाखला तारीख 09/09/2010 चा दाखल केलेला आहे. त्यात प्रती क्विंटल जास्तीत जास्त दर रु. 4,600/- व कमीत कमी दर रु. 4,000/- सरासरी रु. 4,300/- नमूद केलेला आहे. या दरपत्रकानुसार सरासरी रु. 4,300/- चा विचार करता 2 क्विंटलचे रु. 9,600/- चे तक्रारदाराचे नुकसान झालेले आहे. तक्रारदाराने मानसिक त्रासाची व इतर उत्पादन खर्चाची मागणी केलेली आहे, परंतू तक्रारदारांना एकूण येणारी उत्पन्नाची नुकसान भरपाई देण्यात येत असल्याने तक्रारदारांना इतर नुकसान भरपाई देणे उचित होणार नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. सामनेवाले नं. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्कम रु. 9,600/- (अक्षरी रुपये नऊ हजार सहाशे फक्त) आदेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत अदा करावी.
3. वरील विहीत मुदतीत अदा न केल्यास सदर रक्कमेवर तारीख 12/03/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
चुनडे/- स्टेनो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड