श्रीमती शितल अ. पेटकर, मा. सदस्या यांचे आदेशांन्वये.
- प्रस्तुतची तक्रार तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35(1)(a) प्रमाणे विरुध्द पक्ष यांनी दोषपूर्ण सेवा दिली असा आरोप करून तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्ता यांच्या तक्रारीचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे आहे:-
- तक्रारकर्त्याची आई श्रीमती बेबीबाई कवडू भोयर हिचा अपघाती मृत्यू दिनांक 11/07/2020 रोजी मुलाचे दुचाकी वाहनावर मागे बसलेल्या असतांना खाली पडून डोक्याला मार लागल्याने जखमी होऊन झाला. तसेच तक्रारकर्त्याची आई ही शेतकरी होती व संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबलेले होते.
- महाराष्ट्र शासनाने सन 2019 - 2020 या दरम्यान राज्यातील शेतकरी हितासाठी व कल्याणकारी योजना म्हणून शेतकरी कुटुंबातील व्यक्ती जखमी झाल्यास अथवा मरण पावल्यास त्यांना तात्काळ मदत म्हणून इन्शुरन्स पॉलिसी, क्लेम देणेबाबत जाहीर केले होते. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यामधील संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने प्रीमियमची रक्कम भरली.
- सदर माहिती तक्रारकर्त्यास मिळाल्यावर त्याने विलेज रेवेन्यू ऑफिसर तलाठी यांच्या तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये विमा क्लेम फॉर्म सोबत इतर महत्त्वाची कागदपत्रे जमा केलीत.
- परंतु विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याचा विमा दाव्याची दखल घेतली नाही. त्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक 1 च 2 यांना वारंवार विचारणा केली व कायदेशीर नोटीस पाठवली परंतु विरुध्द पक्षांनी उत्तर दिले नाही.
6) याप्रमाणे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास दोषयुक्त सेवा दिलेली आहे. सबब तक्रारकर्त्याने प्रस्तुतची तक्रार आयोगामध्ये दाखल करून विनंती कलमांमध्ये केलेली मागणी पूर्ण होऊन मिळण्यास विनंती केली आहे ती पुढील प्रमाणे :-
A. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला विमा दाव्याची रक्कम रुपये 2,00,000/- द्यावे. विरुध्द पक्ष यांनी प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून संपूर्ण रक्कम फितेपावेतो 18 टक्के व्याजाने तक्रारकर्ता यास देण्यात यावे.
B. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक त्रासापोटी 50,000/- व तक्रारीचा खर्च रु.20,000/- द्यावा.
C) सदर इतर योग्यते न्यायोचित आदेश हे तक्रारकर्ती यांचे बाजुने व्हावेत.
तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत निशाणी क्रमांक चार वर दाखल केलेल्या कागदपत्राची यादी प्रमाणे कागदपत्रेच्या सत्यप्रति दाखल केलेली आहेत.
7) तक्रार दाखल झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांना आयोगाची नोटीस पाठवण्यात आली. विरुध्द पक्ष क्रमांक 4 हे गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरुद्ध एकतर्फा आदेश पारित करण्यात आला. विरुध्द पक्ष क्रमांक 1, 2 व 3 यांनी हजर होऊन तक्रारकर्त्याने केलेल्या आरोपाचे खंडन करून त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल करून खालील प्रमाणे बचाव घेतला आहे.
A. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे कथनः- तक्रारकर्ता हा निष्काळजीपणाने वाहन चालवित होता व त्याचेकडे अधिकृत वाहन परवाना नव्हता तरीसुध्दा ते वाहन निष्काळजीपणाने चालवित होते. ज्याव्दारे तक्रारकर्त्याने मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केलेले आहे. तक्रारकर्त्याची आई ही दुचाकीवर काळजी न घेता बसली होती, त्यामुळे हा अपघात नसुन त्याच त्यांचे मृत्यूस कारणीभूत आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याचे मयत आईचा विमा दावा हा विम्याचे अटी व शर्टींप्रमाणे देता येणार नाही. सदर विमा दावा हा 45 दिवसांत दाखल केलेला नाही त्यामुळे सदरची तक्रार खारी करण्यांत यावी.
B. विरुध्द पक्ष क्र.3 यांचे कथनः- तक्रारकर्त्याचा विमा दावा हा विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकडे दि.04.11.2020 रोजी प्राप्त झाला व त्यांचेकडून तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे दि.13.11.2020 रोजी प्राप्त झाला व विरुध्द पक्ष क्र.3 यांना दि.26.11.2020 रोजी प्राप्त झाला. सदर अर्ज व सोबतचे कागदपत्र विरुध्द पक्ष क्र.3 यांनी दि.03.03.2021 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकडे पाठविला.व दि.26.03.2021 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी सदरचा विमादावा पॉलिसीच्या अटी व शर्टींप्रमाणे नामंजूर केला. याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.3 यांनी त्यांचेवरील जबाबदारी व्यवस्थीत व चोखपणे पार पाठलेली आहे.
8) तक्रारकर्ता यांनी प्रतिउत्तर/ प्रतिज्ञापत्र, तसेच लेखी युक्तिवाद दाखल केला, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी लेखी युक्तिवादाबाबत पुरसीस दाखल केली. तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला.
9) तक्रारीचा गुणवत्तेवर निकाल होणेकामी तक्रारीचा निवारणार्थ खालील प्रमाणे मुद्दे या आयोगाच्या विचारार्थ उद्भवल्याने त्यावर खालील प्रमाणे कारणमीमांसा व निष्कर्ष देण्यात आले.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1. | विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कमतरता केली हे तक्रारकर्त्याने सिद्ध केले आहे काय ? | ...होय.... |
2. | मागितलेली दाद मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरतात काय ? | होय. |
3. | आदेशबाबत काय? | अंतिम. आदेशाप्रमाणे |
| | | | |
- // कारणमिमांसा व निष्कर्ष // -
मुद्दा क्रमांक -1 ः-
10) तक्रारकर्त्याच्या युक्तिवादाप्रमाणे तक्रारकर्त्याची आई ही शेतकरी होती व तिचा मृत्यू दिनांक 11/07/2020 रोजी झालेला आहे. सरकारने शेतकऱ्यास मदत म्हणून काढलेल्या गोपीनाथ मुंडे, शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य विमा योजना दिनांक 31/08/2019 प्रमाणे तक्रारकर्त्याने दावा दाखल केला आहे. विरुध्द पक्ष यांनी बचाव घेतला आहे की, तक्रारकर्ता हा निष्काळजीपणाने वाहन चालवित होता व त्याचेकडे अधिकृत वाहन परवाना नव्हता तरीसुध्दा ते वाहन निष्काळजीपणाने चालवित होते. ज्याव्दारे तक्रारकर्त्याने मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केलेले आहे. तक्रारकर्त्याची आई ही दुचाकीवर काळजी न घेता बसली होती, त्यामुळे हा अपघात नसुन त्याच त्यांचे मृत्यूस कारणीभूत आहेत. त्यामुळे सदर दावा नामंजूर करून विरुध्द पक्षाने कोणतीही दोषयुक्त सेवा तक्रारकर्त्यास दिली नाही या कारणास्तव तक्रार फेटाळण्यात यावी.
11) सदर वादासंबंधी अभिलेखावर दाखल कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याची आई श्रीमती बेबीबाई कवडूजी भोयर यांचे गाव नमुना 7/12, उतारा तसेच फेरफार उतारा पत्रक, दाखल केलेले आहे. यावरून तक्रारकर्त्याची आई यांचे शेत जमिनीवर नाव आहे, त्याप्रमाणे ती शेतकरी होती व दिनांक 11/07/2020 रोजी मोटार सायकल अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे दाखल पुरावा घटनास्थळ पंचनामा, इंक्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवालावरून दिसून येते.
12) विरुध्द पक्ष क्र.3 यांनी दाखल केलेल्या अंतिम अस्विकारपत्र दि.27.03.2021 प्रमाणे झालेला मृत्यू हा विम्याच्या अटी व शर्तींमध्ये येत नसल्याने सदरचा विमा दावा नामंजूर करण्यांत आला असे नमुद करण्यांत आले आहे. त्यामुळे कायद्याची स्थापीत स्थिती विचारात घेता विरुध्द पक्षाने विमा दावा नाकारतांना नमूद केेल्या कारणांच्या बाहेर जाऊन तक्रारकर्ता यांचेकडे वैध वाहन परवाना नसल्याबाबतचा बचाव विचारात घेता येणार नाही.
तक्रारकर्त्याचे आईच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालामध्ये हेड इंज्युअरी असल्याचे नमुद आहे, तर तक्रारकर्त्याची आई चक्कर येऊन खाली पडल्या याबाबतचा कोणताही पुरावा विरुध्द पक्षाने दाखल केलेला नाही. तसेच त्या आजारी होत्या वाहनावर बसल्याने त्यांना चक्कर आली किंवा त्यांना वारंवार चक्कर यायची ही वस्तूस्थिती नव्हती, तर त्या दुचाकीवरुन जात असतांना खाली पडल्या व डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट होते. विरुध्द पक्षाने घेतलेला बचाव हा तथाकथीत असुन सदर बाब ही अपवर्जन कलम (exclusion clause) मध्ये येत नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या त्याचे आईच्या मृत्यूबाबतची आकस्मीत मृत्यूची समरी व घटनास्थळ पंचनामा हा घटनेसंबंधी प्रत्यक्ष पुरावा नसल्यामुळे तक्रारकर्त्याची आई चक्कर येऊन खाली पडल्या हे सिध्द होत नाही. तसेच त्या दुचाकी वाहनावर काळजीपूर्वक बसल्या नव्हत्या याबाबतचा कागदोपत्री पुरावा विरुध्द पक्षांनी दाखल केलेला नाही. सबब विरुध्द पक्ष यांनी घेतलेला आक्षेप येथे लागू होणार नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारण्याकरीता दाखल केलेले कारण हे योग्य नाही या निष्कर्षावर आयोग आलेले आहे.
13) वरील प्रमाणे पुराव्याचे विवेचनावरून व शासनाच्या निर्देशानुसार, तक्रारकर्त्याची आई शेतकरी असल्याने तक्रारकर्त्याचा विमा दावा हा शासन निर्णय दिनांक 31/08/2019 रोजी काढलेल्या जीआर प्रमाणे दाखल केला असल्याने तक्रारकर्त्याचे आईचा विमा दाव्याप्रमाणे तक्रारकर्ता लाभ मिळण्यास पात्र आहे. तक्रारकर्ता हा लाभार्थी आहेत हे सिद्ध झाल्याने विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारून दोषयुक्त सेवा दिली. या निष्कर्षावर आम्ही आलेले आहोत. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्रमांक -2 व 3ः-
14) मुद्दा क्रमांक 1 चा निष्कर्ष होकारार्थी आल्याने तक्रारकर्त्याने मागितलेली दाद मिळण्यास तो पात्र ठरतो. सबब तक्रारकर्त्याने केलेली विनंती मागणीप्रमाणे विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 विमा कंपनी यांनी तक्रारकर्त्यास विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- व त्यावर द.सा.द.शे.9% दराने विमा दावा नाकारल्याचे दि.27.03.2021 पासुन येणारी संपूर्ण रक्कम तक्रारकर्त्यास अदा करावी. तक्रारर्त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला व मागणी मंजूर होण्याकरीता सदरची तक्रार दाखल करावी लागली. सबब मानसिक त्रासाकरता रक्कम रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 5,000/-विरुध्द पक्षाने तक्रारदारांना अदा करणे बाबतचा आदेश देणे योग्य व न्यायोचीत ठरेल. सबब मुद्दा क्रमांक 2 व 3 चे उत्तर होकारर्थी देण्यात येते. वरील विवेचनावरून पुढील प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात आला.
- // अंतिम आदेश // -
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्यास विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- व त्यावर द.सा.द.शे.9% दराने विमा दावा नाकारल्याचे दि.27.03.2021 पासुन येणारी संपूर्ण रक्कम तक्रारकर्त्यास आदेश पारीत दिनांकापासुन 45 दिवसात अदा करावी.
3) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्यास मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाईची रक्कम रु.10,000/- व न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.5,000/- दयावी.
4) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या प्रस्तूत आदेश पारीत दिनांकापासुन 45 दिवसाच्या कालावधीत वरील आदेशाचे पालन करावे.
5) आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क पुरविण्यात याव्यात.