न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे पती हे शेती करत होते. त्यांचे नावे मौजे नेज या ठिकाणी भू.गट क्र. 540 व 562 ही शेत मिळकत आहे. दि. 13/02/2020 रोजी तक्रारदार व त्यांची दोन मुले, व तक्रारदाराचे मयत पती कलगोंडा कांबळे हे सायंकाळी शेतामध्ये कष्ट मशागत करुन घरी येत असताना रस्त्यामध्ये मयत कलगोंडा कांबळे हे खाली पडले व त्यांचे डोक्याला दुखापत झाली. त्यांना सी.पी.आर. हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे औषधोपचार चालू असताना दि. 16/6/2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला. तक्रारदारांचे पतीचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाता विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. म्हणून तक्रारदारांनी तालुका कृषी अधिकारी हातकणंगले व जिल्हा कृषी अधिक्षक यांचेकडे दि. 18/3/20 रोजी प्रस्ताव सादर केला होता. परंतु वि.प. यांनी तक्रारदारांना आजपर्यंत क्लेमची रक्कम दिली नाही. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांना वकीलामार्फत दि. 5/7/2021 व 15/7/2021 रोजी नोटीस पाठविली. परंतु तरीही वि.प. यांनी त्यास प्रतिसाद दिलेला नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 2,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 15 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.25,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 10 कडे अनुक्रमे क्लेम फॉर्म, 7/12 उतारा, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळाचा पंचनामा, पी.एम.आर.रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र, फेरफार नोंदवही, आधार कार्ड, वि.प. यांना पाठविलेली नोटीस वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत त्रिपक्षीय कराराची प्रत, विमा पॉलिसी तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) तक्रारदार यांनी हजर केलेले पोलिस पेपर पाहता तसेच सदरकामी दाखल केलेले पंचनामा, इंक्वेस्ट पंचनामा व शवविच्छेदनासाठी पाठवावायाचा पोलिस अहवाल पाहता सदर कामातील तक्रारदार यांचे पती कलगोंडा कांबळे हे फिट येवून पडल्याचे दिसून येत आहे. विमा दाव्याच्या कागदपत्रांनुसार दि. 14/02/2020 रोजी शेतक-याचा फीट येवून डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाला होता. मृत्यूचे कारण अपघातामुळे नाही. योजनेच्या अटीनुसार अपघाती मृत्यू म्हणजे शारिरिक दुखापतीमुळे होणारा मृत्यू म्हणजेच थेट किंवा स्वतंत्रपणे उद्भवलेल्या आजाराशिवाय इतर कोणत्याही कारणामुळे किंवा अशा जखमांसाठी वैद्यकीय किंवा शस्त्रक्रिया आवश्यक असतात. अशा अपघाताच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत विमाधारकाचा मृत्यू हा अपघाती मृत्यू नसलेने सदरचे तक्रारदार हे नुकसान भरपाई घेणेस अपात्र आहेत. सबब, वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसल्याने तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचे पती हे शेती करत होते. त्यांचे नावे मौजे नेज या ठिकाणी भू.गट क्र. 540 व 562 ही शेत मिळकत आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या शेतजमीनीचे 7/12 उता-यावर तक्रारदाराचे पतीचे नाव नमूद आहे. सबब, तक्रारदाराचे पती हे शेतकरी होते ही बाब स्पष्ट होते. तक्रारदारांचे पतीचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. सदरची बाब वि.प. यांनी मान्य केली आहे. तक्रारदार या त्यांचे मयत पतीचे सरळ व कायदेशीर वारस आहेत. सबब, लाभधारक या नात्याने तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. सदरकामी वि.प. विमा कंपनीने, तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा त्यास फीट आलेने ते डोक्यावर पडले व मयत झाले, त्यामुळे तक्रारदाराचे पतीचा नैसर्गिक मृत्यू झालेने विमाक्लेम मिळणेस तक्रारदार पात्र नाहीत असे कथन केले आहे. परंतु नैसर्गिक मृत्यू झालेबाबत/फीट येवून पडलेबाबत कोणताही ठोस पुरावा याकामी वि.प. ने दाखल केलेला नाही. याउलट सदर कामातील तक्रारदाराने दाखल केले कागदपत्रांचे अवलोकन करता 7/12 उता-यावर तक्रारदाराचे पतीचे नांव आहे. सबब, तक्रारदाराचे पती हे शेतकरी आहेत हे स्पष्ट होते. तसेच Provisional P.M. Report cum medical certificate of cause of death चे अवलोकन करतरा मृत्यूचे कारण हे Head Injury असे नमूद आहे. तसेच पंचनाम्यामध्येही चक्कर येवून रस्त्यावर पडून डोक्यास गंभीर इजा झालेचे व उपचार चालू असताना मयत झालेचे स्पष्टपणे नमूद आहे. म्हणजेच तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा अपघाताने चक्कर येवून रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर दुखापत होवून झालेचे स्पष्ट होते. वि.प. यांनी तक्रारदाराचे पतीचा नैसर्गिक मृत्यू होता हे सिध्द करणेसाठी कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. सबब, वि.प यांनी चुकीच्या कारणास्तव तक्रारदाराचा विमादावा नाकारुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. सबब, तक्रारदार हे वि.प. कडून रक्कम रु. 2,00,000/- विमाक्लेमपोटी मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.3,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 2,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.