| Complaint Case No. CC/22/42 | | ( Date of Filing : 04 Mar 2022 ) |
| | | | 1. Smt.Ranjana Avinash Madavi | | Palebarsa Tah.Sawali,Dist.Chandrapur | | Chandrapur | | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
| Versus | | 1. Universal Sampo Insurance Company Ltd. Through Branch Manager | | Block no.3 A,Bajaj wing,Manglwari complex,Sadar,Nagpur | | Nagpur | | MAHARASHTRA | | 2. Taluka Krushi Adhikari Office Sawali | | Sawali,Tah.Sawali,Dist.Chandrapur | | CHANDRAPUR | | MAHARASHTRA | | 3. Jayaka Insurance Sallagar Company, Nagpur | | Dusara mala Jayaka building,Commercial road,civil line Nagpur | | Nagpur | | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
| Final Order / Judgement | :: निकालपत्र :: (द्वारे - श्री. नितीनकुमार चं. स्वामी, मा. अध्यक्ष) (आदेश पारीत दि. 17/12/2024 ) तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ च्या कलम ३५ (१) अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे- - तक्रारकर्तीचा पती मयत अविनाश मडावी याच्या मालकीची मौजे– रा. पालेबारसा तह. सावली जि. चंद्रपूर येथे सर्वे क्र. २०८/१ शेतजमीन आहे व तो शेतकरी होता. दि. २७/०२/२०२० रोजी तक्रारकर्तीचा पती शेतात तणीस काढत असताना अंदाजे सुमारे १.०० वाजता विषारी सापाने त्याला दंश केला व त्यामुळे उपचाराकरिता त्याला उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी, जि. गडचिरोली येथे दवाखान्यात भरती केले असता, त्याला दि. २७/०२/२०२० रोजी मृत घोषित करण्यात आले. त्याच्या मृत्युनंतर तक्रारकर्तीने सर्व आवश्यक कागदपत्रांसह शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी, विरुद्ध पक्ष क्र. २ यांच्याकडे विमा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर सदर प्रस्ताव विरुद्ध पक्ष क्र. ३ मार्फत विरुद्ध पक्ष क्र. १ विमा कंपनी याना सादर करण्यात आला होता. विरुद्ध पक्ष क्र. ३ यांनी दि. ३०/०९/२०२१ रोजी तक्रारकर्तीला पत्र पाठवून सदर विमा दावा नामंजूर केला व नामंजुरीचे कारण असे दिले की, प्रस्तावामध्ये व्हीसरा रिपोर्टमध्ये विष आढळले नसल्याने जायका इन्शुरन्स कंपनीने आपला दावा नामंजूर केला आहे. त्यामुळे विरुद्ध पक्ष क्र. १ ते ३ दावा नामंजूर करून तक्रारकर्तीस त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे. त्यामुळे व्यथित होऊन तिने प्रस्तुत तक्रार दाखल करून, विमा रक्कमेचे रु. २,००,०००/- दि. ३०/०९/२०२१ पासून द.सा.द.शे. १२% व्याजासह मिळण्याची, तसेच तिला झालेला शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु. १०,०००/- व तक्रार खर्च रु. १०,०००/- सर्व विरुध्द पक्ष यांच्याकडून मिळण्याची विनंती केली आहे.
- तक्रारकर्तीने निशाणी क्र. २ नुसार ११ दस्ताऐवज दाखल केलेले आहे. तक्रारकर्तीची तक्रार दाखल (स्वीकृत) करून घेण्यात आली व विरूध्द पक्षास नोटीस काढण्यात आली. विरूध्द पक्ष क्र. १ हे प्रकरणात हजर होऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केलेले नाही. त्यामुळे प्रकरण त्यांच्या लेखी उत्तराविना चालविण्यात आले. विरुद्ध पक्ष क्र. ३ हे प्रकरणात हजर न झाल्याने त्यांच्याविरुद्ध प्रकरण एकतर्फी चालविन्यात आले. विरुद्ध पक्ष क्र. २ यांनी त्यांचे लेखी उत्तर दि. २०/०४/२०२२ रोजी दाखल केले आहे.
- विरूध्द पक्ष क्र. २, तालुका कृषी अधिकारी, सावली यांनी त्यांच्या लेखी उत्तरात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्तीने त्यांच्याकडे प्रस्ताव दि. ०९/०३/२०२० रोजी दाखल केला होता, जो त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दि. ३०/०३/२०२० रोजी सादर केला. पुढे त्यांचे म्हणणे असे की, वेळो वेळी त्रुटीची पूर्तता करुन कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. पुढे त्यांचे म्हणणे असे की, विमा कंपनी यांनी व्हिसेरा अहवालात विष आढळले नसल्याने दावा नामंजूर केल्याबाबत कळविण्यात आले. त्यांचे म्हणणे असे की, प्रकरणाची शहानिशा करून दावा मंजूर अथवा नामंजूर करण्याचे निर्णय घेणे हे विमा कंपनीच्या अखत्यारीत आहे. विरुद्ध पक्ष क्र. २ याने विमा दावा नामंजूर झालेल्या प्रकरणाची यादी दाखल केली.
- तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार व दस्तऐवज, विरूध्द पक्ष क्र. २ यांनी दाखल केलेले लेखी उत्तर, दस्तऐवज, तक्रारकर्तीचे व विरूध्द पक्ष क्र. १ यांनी दाखल केलेले शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवादावरून प्रस्तुत तक्रारीच्या निवारणार्थ खालील मुद्दांवर निर्णय देणे आवश्यक आहे.
अ.क्र | मुद्दा | निःष्कर्ष | 1. | तक्रारकर्ती ही विरूध्द पक्ष क्र. १ व ३ ची ग्राहक आहे काय? | नाही. | 2. | विरूध्द पक्ष क्र. १ व ३ यांनी तक्रारकर्ती प्रती दिलेल्या सेवेत त्रृटी आहे काय? | नाही. | 3. | तक्रारकर्ती ही विरूध्द पक्ष क्र. १ व ३ कडून विमा लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? | नाही. | 4. | अंतिम आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा - मुद्दा क्र १ बाबत :- प्रस्तुत प्रकरण जरी विरुद्ध पक्ष क्र. १ यांच्या लेखी उत्ताराविना व विरुद्ध पक्ष क्र. ३ यांच्या विरुद्ध एकतर्फी चालविण्यात आले असले, तरी त्यामुळे तक्रारदाराची तक्रार मान्य करता येणार नाही. हे प्रस्थापित न्यायतत्व आहे की, तक्रारदाराने त्याचा दावा आयोगात पुराव्यानिशी सिद्ध केला पाहिजे. तक्रारकर्तीने मृतक हा शेतकरी असल्याचा दावा सिद्ध करण्यासाठी पान क्र. ३२ शेत जमिनीच्या ७/१२ उताऱ्याची प्रत दाखल केली आहे. परंतु ही प्रत संकेतस्थळावरून काढण्यात आली असल्याने व शासकीय किंवा कायदेशीर बाबींसाठी वापर करता येणार नसल्याने, ग्राह्य धरता येणार नाही. तसेच सदर उतारा हा १६/०३/२०२० रोजी निर्गामीत केला गेला आहे. त्यामुळे मृतकाचे नाव ७/१२ उताऱ्यावर कधी घेतले गेले याचा बोध होत नाही. शासन निर्णय १९/०९/२०१९ नुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठी पॉलिसी लागू झालेल्या दिनांकास शेतकऱ्याचे नावाची नोंद ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक आहे. प्रस्तुत प्रकरणात मृतकाचा मृत्यू हा दि. २७/०२/२०२० रोजी झाला असल्याने, सन २०१९-२०२० यावर्षीची पॉलिसी (कालावधी दि. १०/१२/२०१९ ते ०९/१२/२०२०) लागू झालेल्या दिनांकास म्हणजेच दि. १०/१२/२०१९ रोजी, शेतकऱ्याच्या नावाची नोंद ७/१२ वर होती किंवा कसे हे पाहणे आवश्यक आहे. तक्रारकर्तीने याबाबत ईतर कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. दाखल केलेल्या ७/१२ उता-यावरुन हे सिद्ध होत नाही की, मृतक अविनाश चे नाव हे दि, १०/१२/२०१९ या दिनांकाच्या पूर्वी ७/१२ उता-यावर घेतले गेले होते. तक्रारकर्तीने याबाबत फेरफार क्र. ३२४ चा उतारा ६- ड, (ज्या फेरफार क्रमांकानुसार अविनाश च्यां नावाची नोंद ७/१२ उताऱ्यावर झाली) तो दाखल करणे आवश्यक होते. त्यामुळे तक्रारकर्ती हे सिद्ध करू शकलेली नाही की मृतक हा पॉलिसी लागू झालेल्या दिनांका रोजी शेतकरी होता. त्यामुळे त्याचा या योजनेंतर्गत विमा उतरविल्याचे सिद्ध होत नाही. त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुद्ध पक्ष क्र. १ व ३ यांची ग्राहक नाही असे या आयोगाचे मत झाले आहे. सबब मुद्दा क्र. १ चे उत्तर नाकारार्थी देण्यात येत आहे.
- मुद्दा क्र २ व ३ बाबत :- तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे तक्रारकर्तीचे म्हणणे आहे. तक्रारकर्तीने हे सिध्द करण्यासाठी सदर घटनेचा अप्रकृतिक मृत्यू पंजीकरण (पान क्र. ०९ ते १२ ), व शवविच्छेदन अहवाल(पान क्र. १३ ते २०), मर्ग समरी (पान क्र. २१ ते २२) घटनास्थळ पंचनामा (पान क्र. २३ ते २६ ), इंक्वेस्ट अहवाल (पान क्र. २७ ते २८) या दस्तऐवजच्या प्रती दाखल केलेले आहेत. सदर अप्रकृतिक पंजीकरण व मर्ग समरी अहवाल यांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदर दोन्ही दस्त अनुक्रमे २१/०४/२०२० (मृत्यू दि. २७/०२/२०२० च्या दोन महिन्यानंतर) व दि. ३१/१०/२०२० (मृत्यू दि. २७/०२/२०२० च्या आठ महिन्यानंतर) रोजीचे असल्याचे दिसून येते. त्यामुळे मृत्युनंतर इतक्या विलंबाने हे दस्तऐवज अस्तित्वात आल्याने घटनेच्या सत्यतेबाबत शंका निर्माण होते. शवविच्छेदन अहवालात देखील पान क्र. १६ वर परिच्छेद ७ Surface wounds and injuries या समोर नमूद नोंदी मध्ये खाडाखोड असल्याचे दिसून येते. यात “No any mark of bite on dorsal aspect of wrist of Lt hand” या वाक्यातील No any हे शब्द खोडल्याचे दिसून येते व याबाबत संबंधिताची स्वाक्षरी दिसून येत नाही. त्यामुळे याबाबत शंका निर्माण होते. तसेच या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण सर्प दंश आहे याबाबत शंका व्यक्त केली गेली आहे व व्हिसेरा अहवालाच्या निष्कर्षाचा विचार व्हावा असे नमूद आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवालावरून मृत्यूचे कारण सिद्ध होत नाही. तक्रारकर्तीने वरील कागदपत्रात असलेल्या दोषांबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. या सर्व कारणांमुळे “मृतकाचा मृत्यू सर्प दंशाने झाला” या तक्रारकार्तीच्या दाव्यावर शंका निर्माण होते. तक्रारकर्ती मृतकाचा मृत्यू सर्प दंशाने झाला हा तिचा दावा विश्वासार्ह पुराव्यानिशी सिद्ध करू शकलेली नाही. त्यामुळे विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्ती हिला दिलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही व तक्रारकर्ती ही विमा लाभ मिळण्यास पात्र नाही, असे या आयोगाचे मत झालेले आहे. सबब मुद्दा क्र. २ व ३ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्र ४ बाबत :- मुद्दा क्र. १, २ व ३ चे विवेचनावरून पुढीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे. अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- तक्रारीच्या खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
- उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामूल्य देण्यात यावी.
- प्रकरणाच्या “ब” व “क” संचिका तक्रारकर्तीला परत करण्यात याव्यात.
| |