::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 02/12/2019)
1. तक्रारकर्त्याचे मय्यत वडील मारोती किसना उर्फ किसन उरकुडे याचे नांवे मौजा वरूर रोड, तह.राजूरा, जिल्हा चंद्रपूर येथे भूमापन क्र. 4, भो.वर्ग-1, क्षेत्र 3.16 हे.आर. ही शेतजमीन होती व ते शेतीचा व्यवसाय करुन शेतीच्या उत्पन्नावर संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण करीत होते. तक्रारकर्त्याच्या वडिलांचा दिनांक 30/11/2017 रोजी मौजा वरूर (रोड)तह. राजुरा जि.चंद्रपूर यथे मोटार अपघातात मृत्यु झाला. तक्रारकर्ताच्या वडिलांचा महाराष्ट्र सरकारतर्फे रु. 2 लाख चा शेतकरी अपघात विमा काढण्यात आला होता. शासनाच्या सदर विमा योजनेप्रमाणे तक्रारकर्ता हे मयत विमाधारकाचा मुलगा व वारस असल्याने सदर विम्याचे लाभार्थी आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याने वडिलांचा शेतकरी अपघात विमा लाभ मिळण्यासाठी विरूध्द पक्ष क्र. 3 मार्फत विरूध्द पक्ष क्र.1 कडे दिनांक 18/12/2017 रोजी आवश्यक दस्तावेजांसह रीतसर अर्ज सादर केला तसेच मागणीप्रमाणे वेळोवेळी दस्तावेज सादर केले. परंतु आजपर्यंत त्याच्या दाव्या संदर्भात कोणतीही माहिती तक्रारकर्त्याला मिळाली नाही. सबब तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल करून त्यात मागणी केली आहे की विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला विमा दाव्याची रक्कम रु. 2 लाख, दावा दाखल झाल्यापासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावे तसेच झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रू.85,000/- व तक्रार खर्च रू. 5,000/- देण्याचा आदेश देण्यात यावा.
2. विरूध्द पक्ष क्र. 1, 2 व 3 यांना नोटीस काढण्यात आले.
विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारीत उपस्थित होऊन लेखी उत्तर दाखल केले असून त्यात तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन नाकबूल करून पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्याला वारंवार मागणी करूनही त्याने आवश्यक दस्तावेज गाव नमूना 6क हा दस्तावेज अद्याप सादर केला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचा विमादावा अद्याप निकाली काढता आला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण नाही. अशा परिस्थितीत विमा पॉलिसी अटी व करारातील तरतुदीनुसार विरूध्द पक्ष विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यांस जबाबदार नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
3. विरूध्द पक्ष क्र. 2 ह्यांना मंचातर्फे नोटीस प्राप्त होऊन व ते प्रकरणात उपस्थीत होवूनही त्यांनी लेखी उत्तर दाखल न केल्यामुळे त्यांचे लेखी उत्तराशिवाय तक्रार पुढे चालविण्याचे आदेश दि.6/3/2019 रोजी नि.क्र.1 वर पारीत करण्यात आले.
4 विरूध्द पक्ष क्र. 3 यांनी तक्रारीत उपस्थित होऊन लेखी उत्तर दाखल केले असून त्यात तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन नाकबूल करून पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्याकडून दिनांक 18/12/2017रोजी प्राप्त झालेला विमादावा अर्ज त्यांनी दिनाक 19/12/2017 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांना सादर केला तसेच तक्रारकर्त्याच्या अर्जातील त्रुटींची पुर्ततादेखील दिनांक 9/1/2018 ला सादर केली. याशिवाय विरूध्द पक्ष क्र.2 जायका इन्श्युरंस यांचे दिनांक 16/1/2018 चे तसेच त्यानंतरच्या पत्रांचीसुध्दा पुर्तता केली आहे. त्यामुळे त्यांनी कोणतीही त्रुटीपुर्ण सेवा दिली नसून त्यांचेविरूध्द तक्रार खारीज व्हावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
5. तक्रारकर्त्याची तक्रार दस्तावेज, तक्रार व दस्तावेज यातील मजकुरालाच तक्रारकर्त्याचे पुरावा शपथपत्र समजण्यांत यावे व युक्तीवाद समजण्यांत यावा अशा अनुक्रमे नि.क्र.32 व 29 वर पुरसीस दाखल, विरूध्द पक्ष क्र. 1 यांचे लेखी कथन, रिजॉईंडर, शपथपत्र व वि.प.क्र.1 यांचे लेखी कथन, दस्तावेज व रिजॉइंडर यांनाच वि.प.क्र.1 चा लेखी युक्तीवाद समजण्यांत यावा अशी नि.क्र.33 वर पुर्सीस दाखल, लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व वि. प क्र. 1 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारकर्ता हा वि.प. यांचा ग्राहक आहे काय ? होय
2. वि.प. क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास न्युनतापूर्ण सेवा
दिली आहे काय ? विवेचनानुसार
3. आदेश काय ? अंतीम आदेशानुसार
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत :-
6. तक्रारकर्त्याचे मय्यत वडील मारोती किसना उर्फ किसन उरकुडे यांचे नांवे मौजा वरूर रोड, तह.राजूरा, जिल्हा चंद्रपूर येथे भूमापन क्र. 4, भो.वर्ग-1 ही शेतजमीन होती व ते शेतीचा व्यवसाय करुन शेतीच्या उत्पन्नावर संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण करीत होते ही बाब तक्रारकर्त्याने नि.क्र.5 वर दाखल केलेल्या दस्तावेज, 7/12 उतारा, गांव नमूना आठ अ, गांव नमूना सहा ‘क’ यांचे अवलोकन केले असता निदर्शनांस येते. तक्रारकर्त्याचे वडिलांचा महाराष्ट्र सरकारतर्फे रु. 2 लाखाचा शेतकरी अपघात विमा काढण्यात आला होता. सदर विमा हा विरूध्द पक्ष क्र.3 या शासकीय कार्यालयाने विरूध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीकडून विरूध्द पक्ष क्र.2 एजंसीमार्फत काढलेला होता ही बाब तक्रारीत दाखल दस्तावेजांवरून सिध्द होते. शासनाच्या सदर विमा योजनेप्रमाणे तक्रारकर्ता हा मयत विमाधारकाचा मुलगा व वारस असल्याने सदर विम्याचा लाभार्थी आहेत. सबब तक्रारकर्ता हे वि.प. यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत :-
8. तक्रारकर्त्याचे वडिलांचा अपघाती मृत्यु झाल्याची बाब तक्रारकर्त्याने नि.क्र.5 वर दाखल केलेल्या शवविच्छेदन अहवाल तसेच इतर दस्तावेजांवरून सिध्द होते. याबाबत तक्रारकर्त्याने वि.प.क्र.3 मार्फत विमादावा अर्ज दाखल केल्याची बाब वि.प.क्र.1 ला मान्य आहे. परंतु वि.प.क्र.1 यांचे लेखी उत्तरातील म्हणण्यानुसार, केवळ तक्रारकर्त्याने त्याचे वडिलांचे नांवाचा गाव नमुना 6 क हा दस्तावेज दाखल न केल्यामुळे तक्रारकर्त्याचा विमादावा निकाली काढता आला नाही व तक्रारकर्त्याने सदर दस्तावेज दाखल केल्यांस विमादावा तात्काळ निकाली काढण्यांत येईल असे नमूद केले आहे. मात्र वि.प.क्र.3 तालुका कृषी अधिकारी, राजूरा यांचे लेखी उत्तरात नमूद केल्यानुसार तसेच वि.प.क्र.3 ने त्यांचे लेखी उत्तरासमवेत दाखल केलेल्या जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, चंद्रपूर यांना दिनांक 27/3/2018 रोजी पाठविलेल्या पत्रातील मजकुरावरून तक्रारकर्त्याने सदर गाव नमूना 6क हा दस्तावेज सादर केला व त्याबाबतची त्रुटीपुर्तता वि.प.क्र.3 मार्फत करण्यांत आलेली होती हे स्पष्ट होते. इतकेच नव्हे तर सदर पत्रांस गाव नमुना 6 क ची प्रतदेखील जोडण्यांत आलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर त्रुटीची पुर्तता केल्यानंतरदेखील वि.प.क्र.1 यांनी अद्याप विमादावा निकाली काढलेला नाही. सबब याबाबत वि.प.क्र.1 यांचे म्हणणे ग्राहय धरता येत नाही. तक्रारकर्त्याने प्रस्तूत प्रकरणात गाव नमुना 6 क ची प्रत दाखल केलेली असून वि.प.क्र.1 हे मंचासमक्ष उपस्थीत झाल्यानंतर इतर दस्तावेजांसमवेत सदर दस्तावेजदेखील वि.प.क्र.1 यांना पुरविण्यांत आलेला आहे. याशिवाय वि.प.क्र.3 ने दिनांक 20/8/2018 रोजी प्रस्तूत प्रकरणात दाखल केलेल्या लेखी उत्तरात सदर त्रुटीपुर्ततेबाबत स्पष्ट केल्यानंतरदेखील वि.प.क्र.1 यांनी विमादावा अद्याप निकाली न काढून तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्युनता केलेली आहे व तक्रारकर्ता हे वि.प.क्र.1 यांचेकडून विमादाव्याची रक्कम मिळण्यांस पात्र आहेत.
9. याशिवाय तक्रारकर्त्याने वि.प.क्र.3 मार्फत केलेली त्रुटीपुर्तता वि.प.क्र.2 यांनी वि.प.क्र.1 कंपनीकडे सादर केली किंवा नाही याबाबत विरूध्दपक्ष क्र.2 यांनी प्रकरणात मंचासमक्ष उपस्थीत होवूनही आपली बाजू स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे वि.प.क्र.2 यांनी जाणीवपूर्वक उत्तर देण्यांस टाळाटाळ केली असल्यामुळे त्यांचेविरूध्द नकारार्थी निष्कर्ष काढणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे वि.प.क्र.2 यांनीदेखील तक्रारकर्त्यांस न्युनतापूर्ण सेवा दिली असल्यामुळे ते तक्रारकर्त्यास खर्चाची रक्कम रू.10,000/- देण्यांस जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे. मात्र विरूध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्यांस वेळोवेळी तत्पर सेवा दिली असल्याचे देखील सदर प्रकरणी स्पष्ट होते त्यामुळे त्यांचे सेवेत कोणतीही न्युनता नाही. असे मंचाचे मत आहे.सबब मुद्दा क्र.3 चे उत्तर तदनुषंगाने नोंदविण्यांत येते.
मुद्दा क्रमांक 4 बाबत ः-
10. मुद्दा क्रमांक 1 ते 3 च्या विवेचनावरून खालील आदेश पारित करण्यात येतो.
अंतिम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार क्र.107/2018 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष क्रमांक 1 यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा दावा
योजने अंतर्गत विमादावा रक्कम रुपये 2,00,000/- तक्रारकर्त्यास द्यावी.
3. विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्यास खर्चापोटी रक्कम रू.10,000/-
द्यावेत.
4. विरूध्द पक्ष क्रमांक 3 विरुद्ध कोणतेही आदेश नाहीत.
5. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ देण्यात यावी.
(श्रीमती कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.