(आदेश पारित द्वारा मा. सदस्या, कु. वर्षा ओ. पाटील)
(पारित दि. 22 मार्च, 2016)
तक्रारकर्त्यांचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा दावा विरूध्द पक्ष 1 यांनी मंजूर किंवा नामंजूर असे न कळविल्यामुळे तक्रारकर्त्यांनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम मिळण्याकरिता सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ते हे मौजा भंबोडे, पो. मुंडीकोटा, ता. तिरोडा, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्ता क्र. 1 चे वडील व तक्रारकर्ती क्र.2 चे पती श्री. प्रभुदास सुखलाल डिंकवार यांच्या मालकीची मौजा भंबोडी, पो. मुंडीकोटा, ता. तिरोडा, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 96/1 या वर्णनाची शेतजमीन असल्यामुळे ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे लाभधारक आहेत.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्याचे काम करतात.
4. तक्रारकर्ता क्र. 1 चे वडील व तक्रारकर्ती क्र. 2 चे पती श्री. प्रभुदास सुखलाल डिंकवार यांचा दिनांक 13/10/2011 रोजी रेल्वे गाडीतून पडल्यामुळे जखमी होऊन मृत्यु झाला.
5. तक्रारकर्ता क्र. 1 चे वडील व तक्रारकर्ती क्र. 2 चे पती हे शेतकरी असल्याने व त्यांचा अपघाती मृत्यु झाल्याने तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दिनांक 30/12/2011 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर विमा दावा अर्ज सादर केला. परंतु विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्यांच्या दाव्याबाबत मंजूर अथवा नामंजूर झाल्याबाबत तक्रारकर्त्यांना न कळविल्यामुळे तक्रारकर्त्यांनी विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- व्याजासह मिळण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू.30,000/- आणि तक्रारीचा खर्च रू.15,000/- मिळण्यासाठी दिनांक 11/05/2015 रोजी मंचात तक्रार दाखल केली.
6. तक्रारकर्त्यांची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 18/05/2015 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 18/05/2015 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा जबाब दिनांक 04/08/2015 रोजी दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 44 वर आहे. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचे खंडन केले असून त्यांनी आपल्या लेखी जबाबात असे म्हटले आहे की, Tri-partite Agreement नुसार इन्शुरन्सचे दस्तऐवज दिनांक 14/11/2012 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत होते. परंतु तक्रारकर्त्यांनी दिनांक 18/06/2013 रोजी कोणत्याही कारणाशिवाय दाखल केले. तसेच 7/12 उतारा, 6-क व 6-ड फेरफार हे आवश्यक असलेले दस्तऐवज सादर केले नाहीत. तसेच विरूध्द पक्ष 3 यांनी आपले कर्तव्य बरोबर पार पाडलेले नसून सर्व दस्तऐवजांची शहानिशा न करताच विरूध्द पक्ष 3 यांनी प्रस्ताव पाठविलेला असल्यामुळे त्याकरिता विरूध्द पक्ष 3 हेच जबाबदार आहेत. त्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 हे विमा दावा देण्याकरिता जबाबदार नसून विरूध्द पक्ष 3 हेच सर्वस्वी जबाबदार असल्यामुळे तक्रारकर्त्यांची प्रस्तुत तक्रार त्यांच्याविरूध्द खारीज करण्यात यावी असे विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी जबाबात म्हटले आहे.
8. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 23/06/2015 रोजी दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 42 वर आहे. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या लेखी जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्ता क्र. 1 चे वडील व तक्रारकर्ती क्र. 2 चे पती दिनांक 13/10/2011 रोजी मयत झाले असून त्यांचा दावा दिनांक 18/06/2013 रोजी त्यांच्या कार्यालयास प्राप्त झाला व पडताळणी करून दिनांक 08/07/2013 रोजी उप विभागीय कृषि अधिकारी, गोंदीया यांच्याकडे 1388/8-7/2013 अन्वये सादर करण्यात आला. तालुका कृषि अधिकारी, तिरोडा हे कार्यालय फक्त शेतक-यांचे जनता अपघात विम्याचे प्रस्ताव स्विकारते व पडताळणी करून पुढील कार्यवाहीस्तव उप विभागीय कृषि अधिकारी, गोंदीया कार्यालयास सादर करते. सदर प्रकरणात विरूध्द पक्ष 3 यांची कोणतीही त्रुटी नसल्यामुळे प्रस्तुत तक्रार त्यांच्याविरूध्द खारीज करण्यात यावी असे विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या लेखी जबाबात म्हटले आहे.
9. तक्रारकर्त्यांनी तक्रारीसोबत दस्तऐवज दाखल करण्याच्या यादीप्रमाणे एकूण 7 दस्तऐवज अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 11 ते 35 वर दाखल केलेले आहेत.
10. तक्रारकर्त्यांचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी सदरहू प्रकरणात लेखी युक्तिवाद दाखल केला असून तोंडी युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्यांनी दवा विलंबाने सादर केला ह्या कारणास्तव काही दस्तऐवज तक्रारकर्त्यांनी न दिल्याने दिनांक 20/09/2013 रोजी खारीज केल्याचे नमूद केलेले आहे. परंतु विरूध्द पक्ष 1 व 2 चे दिनांक 20/09/2013 रोजीचे कोणतेही पत्र त्यांना मिळालेले नाही आणि विरूध्द पक्ष 1, 2 व 3 यांनी सदर पत्राची पोच मंचासमोर दाखल केलेली नाही. पुढे त्यांनी युक्तिवाद केला की, मृतकाच्या मृत्युनंतर तक्रारकर्ते हे अतिशय दुःखी होते व सदर विमा योजनेबाबत त्यांना माहिती नव्हती. इतर लोकांकडून त्यांना सदर योजनेची माहिती मिळाल्यानंतर कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली. तसेच अधिकारी वेळेवर न भेटणे, वाहतूक व्यवस्था वेळेवर उपलब्ध न होणे या कारणांमुळे दावा दाखल करण्यास उशीर लागला. परंतु विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांचा दावा कारण नसतांना फेटाळून लावला व त्यांनी सेवेमध्ये कसूर केलेला असल्यामुळे तक्रारकर्त्यांचा दावा मंजूर करण्यात यावा.
11. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या वकील ऍड. इंदिरा बघेले यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 52 वर दाखल केला असून तोंडी युक्तिवाद केला की, त्रिपक्षीय करारानुसार दिनांक 14/11/2102 च्या रात्रीपर्यंत इन्शुरन्सचे कागदपत्र दाखल करावयास पाहिजे होते. परंतु तक्रारकर्त्यांनी कोणत्याही कारणाशिवाय दिनांक 18/06/2013 रोजी दस्तऐवज सादर केले. कागदपत्रांच्या त्रुटींमुळे त्यांचा दावा फेटाळण्यात आला. तसेच तक्रारकर्त्यांनी 7/12, फॉर्म 6-क व 6-ड फेरफार हे सुध्दा दाखल केलेले नाहीत. त्याचप्रमाणे विरूध्द पक्ष 3 यांनी संपूर्ण कागदपत्रांची शहानिशा करून विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयास पाहिजे होता. परंतु विरूध्द पक्ष 3 यांनी दस्तऐवजांची योग्यरित्या शहानिशा केली नाही आणि म्हणून विरूध्द पक्ष 3 हे सर्वस्वी जबाबदार आहेत. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या सेवेत कुठलीही त्रुटी नसल्यामुळे तक्रारकर्त्यांची तक्रार त्यांच्याविरूध्द खारीज करण्यात यावी.
12. तक्रारकर्त्यांचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्त्यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्यांची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ते शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहेत काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
13. तक्रारकर्ता क्र. 1 चे वडील व तक्रारकर्ती क्र. 2 चे पती यांचा मृत्यु दिनांक 13/10/2011 रोजी झाला. तक्रारकर्त्यांनी विमा दावा अर्ज सर्व कागदपत्रांसह विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे सादर केला. तक्रारकर्त्यांची त्यावेळची मानसिक स्थिती आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लागलेला वेळ या सर्व कारंणांमुळे तक्रारकर्त्यांना विमा दावा अर्ज दाखल करण्यासाठी विलंब लागल्याचे संयुक्तिक कारण आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे 90 दिवसानंतर सुध्दा विमा दावा संयुक्तिक कारण असल्यास दाखल केल्या जाऊ शकतो व तो मंजूर होण्यास पात्र आहे.
14. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांचा दावा मंजूर किंवा नामंजूर झाल्याबाबत तक्रारकर्त्यांना न कळविल्यामुळे किंवा तसा लेखी पुरावा दाखल न केल्यामुळे तक्रारकर्त्यांचे सदरहू प्रकरण मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत मृतकाच्या अपघात विम्याची रक्कम रू.1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रार दाखल करून घेतल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 18/05/2015 पासून ते संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू.5,000/- तक्रारकर्त्यांना द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्यांना रू.5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेश क्र. 2, 3, 4 चे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
7. विरूध्द पक्ष 3 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.