निकालपत्र : (दिनांक: 26-11-2013 ) (व्दाराः- मा. श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
1. तक्रारदार पतसंस्था यांनी सामनेवाले श्री धर्मनाथ जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या, जयसिंगपूर, शाखा- अ. लाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर या पतसंस्थेत मुदत ठेव स्वरुपात गुंतवलेल्या रक्कमांची मागणी करुनही परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदार पतसंस्था यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार संस्था ही महाराष्ट्र सहकार कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेली पतसंस्था असून सामनेवाले श्री धर्मनाथ जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या, जयसिंगपूर, शाखा- अ. लाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर (यापुढे संक्षिप्तेसाठी “पतसंस्था” असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत “मुदत ठेवी” स्वरुपात रक्कमा गुंतविल्या होत्या त्याचा तपशील खालीलप्रमाणेः-
| अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम रुपये | ठेव ठेवलेची दिनांक | ठेवीची मुदत व ठेवीचा व्याज दर % |
| 1 | 7448 | 1,00,000 | 14-03-2006 | 91 दिवस, 10 टक्के |
| 2 | 7454 | 50,000 | 16-03-2006 | 13 महिनेपुढे, 11 टक्के |
| 3 | 7455 | 50,000 | 16-03-2006 | 13 महिनेपुढे, 11 टक्के |
| 4 | 7485 | 75,000 | 19-04-2006 | 91 दिवस, 10 टक्के |
| 5 | 7508 | 1,00,000 | 05-05-2006 | 91 दिवस, 10 टक्के |
| 6 | 7597 | 50,000 | 11-07-2006 | 91 दिवस, 10 टक्के |
| 7 | 18696 | 49,814 | 31-03-2007 | 91 दिवस, 10 टक्के |
| 8 | 18697 | 25,000 | 27-10-2006 | 91 दिवस, 10 टक्के |
3. तक्रारदार पतसंस्था यांनी सामनेवाले क्र.1-पतसंस्थेकडे मुदत व पावत्यांची मुदत संपलेनंतर रक्कमेची मागणी व्याजासह केली असता सामनेवाला पतसंस्थेने रक्कमा दिल्या नाहीत तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांची फसवणुक केली. तक्रारदारांना ठेवींच्या रक्कमांची निकड होती तेव्हा तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे मुदत संपलेनंतर रक्कमांची मागणी केली असता, सामनेवाले पतसंस्था यांनी तक्रारदार पतसंस्था यांना ठेवीच्या रक्कमा दिल्या नाहीत. तथापि तक्रारदारांनी दि. 30-04-2012 रोजी वकिलामार्फत रजि.ए.डी. ने नोटीस पाठवून देखील सामनेवाले यांनी वर नमूद ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सामनेवाले पतसंस्था यांनी वर नमूद ठेवीच्या रक्कमा देण्यास टाळाटाळ केली अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारास सामनेवाले यांचेकडून ठेव पावत्याच्या रक्कमा तसेच त्यावरील व्याजाची मागणी केली. तक्रारदारांनी त्यांचे वर नमूद परिच्छेद कलम-2 नुसार आज अखेर होणारी एकूण ठेव रक्कम + व्याज तसेच त्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी व रु. 25,000/- व या तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 5,000/- अशा रक्कमा तक्रारदारांना वसुल होऊन मिळाव्यात अशी मागणी केलेली आहे.
4. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीसोबत मुदत ठेवींच्या पावत्या व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस दि. 30-04-2012 व पोस्टाचे नोटीसीचे “नॉट क्लेम्ड“ शे-यानिशी परत आलेले लखोटे व तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे.
5. वि.पक्ष क्र. 5, 6 व 13 यांनी म्हणणे दाखल केले. वि.प. यांचे म्हणणेनुसार तक्रारीतील मजकूर खोटा असून मान्य नाही. वि.प. 13 रावसाहेब पाटील हे ठेवीच्या वेळेस संस्थेमध्ये संचालक नव्हते. त्यांची निवड दि. 22-12-2005 रोजी झालेली असून सध्या ते संचालक नाहीत. प्रस्तुत वि.प. यांचा संस्थेच्या दैनंदीन कारभाराशी काहीही संबंध नाही. तक्रारदारांनी तक्रार अर्जात नवीन संचालकांना पक्षकार करणे आवश्यक आहे. सन 2008 पासून 2010 पर्यंत संस्थेवर प्रशासक होते व तदनंतर आजअखेर नवीन संचालक मंडळ कार्यरत आहे. वि.प. 13 यांना विनाकारण तक्रार अर्जात पार्टी केले आहे. तक्रारदाराचे काही येणे देणेस असल्यास त्यांनी कायद्यानुसार नवीन संचालक मंडळाकडून वसुल करणे आवश्यक आहे. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज रद्द व्हावा अशी विनंती वि.प. यांनी केली आहे.
6. वि. पक्ष क्र. 4, 10 व 14 यांनी म्हणणे दाखल केले. वि.प. यांचे म्हणणेनुसार तक्रारीतील मजकूर खोटा असून मान्य नाही. प्रस्तुत वि. प. हे संस्थेचे संचालक नाहीत. तक्रारदार हे ग्राहक होऊ शकत नसलेमुळे तक्रारदारांची तक्रार चालणेस पात्र नाही. तक्रारदारांनी तक्रार दाखल करतेवेळी कायद्यानुसार सहकार खात्याची परवानगी घेतली नाही. प्रस्तुतची तक्रार मुदतीत नाही. वि.प. संस्थेचे संचालक मंडळ निवडून आलेनंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 60 मधील तरतुदीनुसार 60 दिवसांच्या आत बंधपत्र लिहून देणे आवश्यक असते तसे संचालकांनी दिलेले नाही. वि.प. यांची संचालक म्हणून कोणतीही जबाबदारी येत नाही. वि.प. 4 व 10 यांना सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे विभागीय कार्यालय कोल्हापूर यांनी दि. 07-09-2007 चे आदेशाने संचालक म्हणून नाव वगळून दि. 01-09-2007 रोजी संचालक पदाचा राजिनामा दिलेला आहे. तक्रारदार यांची रक्कम देणेस वि.प. पतसंस्थेबरोबर जबाबदार नाहीत. ना. उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ रिट पिटीशन नं. 5223/2009 सौ. वर्षा ईसाई वि. राजश्री चौधरी मध्ये संचालकांना जबाबदारीतून वगळले आहे. सहकार कायद्यातील कलम 88 अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत तक्रार अर्जात पुरावा नाही. त्यामुळे वि.प. यांना वैयक्तीक अथवा संयुक्तिकरित्या ठेवीच्या रक्कमा देणेस जबाबदार धरता येणार नाही. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज रद्द व्हावा अशी विनंती वि.प. यांनी केली आहे. वि.प. 4,10 व 14 यांनी आपले म्हणणेसोबत संस्थेवर प्रशासक नेमलेबाबत दि. 07-09-2007 रोजीच्या आदेशाची प्रत दाखल केली आहे.
7. वि. पक्ष 2, 7 व 12 यांनी दि. 5-08-2013 रोजी पुरसीस दाखल करुन वि.प. 4, 10 व 14 यांनी दिलेले म्हणणे तेच वि.प. 2, 7 व 12 यांचे म्हणणे वाचणेत यावे अशी पुरसीस दिली आहे. तसेच उर्वरीत वि.प. यांना मंचाची नोटीस लागू होऊनही त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही.
8. तक्रारदार संस्था यांची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच अनुषांगिक कागदपत्रे व तक्रारदार यांचा युक्तीवादचा विचार करता, तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे मंचापुढे उपस्थित होतात.
| अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
| 1 | तक्रारदार हे ग्राहक आहेत काय ? | होय |
| 2 | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
| 3 | तक्रारदार कोणता मानसिक त्रासापोटी / अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
| 4 | आदेश काय ? | तक्रार अंशतः मंजूर |
विवेचन-
मुद्दा क्र. 1 - तक्रारदार संस्था यांनी मुदत ठेव स्वरुपात गुंतविलेल्या रक्कमांच्या पावत्याच्या छायांकित प्रतीं सादर केलेल्या आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची ठेव स्वरुपात भरलेल्या रक्कमा नाकारलेल्या नाहीत. ठेव स्वरुपात गुंतविलेल्या रक्कमांचा विचार होता, तक्रारदार पतसंस्था यांनी सदरच्या मुदत ठेवींच्या पावत्या नफा कमविण्याच्या उद्देशाने ठेवल्या सदरची बाब ही सामनेवाला पतसंस्था यांनी शाबीत केलेली नाही. म्हणून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे, म्हणुन मुद्दा क्र.1 चे उत्तर मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2 - प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार संस्थेने यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता, तक्रारदार पतसंस्था यांनी पतसंस्थेत मुदत ठेवीच्या स्वरुपात रक्कमा गुंतविलेल्या आहेत ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे मुदत ठेवीच्या स्वरुपात गुंतविलेल्या रक्कमा परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतु मागणी करुनही रक्कम न देणे ही सामनेवाले यांची तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे, म्हणुन मुद्दा क्र. 2 चे उत्तर मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3 – तक्रारदार संस्थेने यांनी दाखल केलेली मुदत ठेव रक्कमेवर व्याजासह होणारी रक्कम सामनेवाले क्र.1 ते सामनेवाले क्र. 18 यांच्याकडून मिळावी अशी विनंती केली आहे. या संदर्भात मा. मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाई विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढीलप्रमाणे मत व्यक्त केले आहे.
“As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors of members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies”.
वरील न्यायिक निवाडयामध्ये संचालकांना ठेवीच्या रक्कमा देण्यासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे सामनेवाले क्र. 2 ते 18 यांना वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे सामनेवाले श्री धर्मनाथ जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या, जयसिंगपूर, शाखा- अ. लाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यांच्याकडून वर परि. क्र. 2 मध्ये नमूद मुदत ठेवीमध्ये गुंतविलेल्या रक्कमा मुदत संपेपर्यंत ठरलेल्या व्याज दरानुसार द्यावेत व त्यानंतर द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे संपूर्ण रक्कम मिळण्यास पात्र आहेत. तसेच मुदत ठेवीच्या रक्कमा परत देण्यास सामनेवाले पतसंस्था हे जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे.
तसेच, तक्रारदार यांना सामनेवाले यांनी मुदत ठेव खात्यातील रक्कमा न दिल्याने सेवेत त्रुटी केली आहे, त्यामुळे तक्रारदार संस्थेस सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. त्यामुळे सामनेवाले पतसंस्था यांच्याकडून तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब, मंच पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1 . तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2 . सामनेवाले श्री धर्मनाथ जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या, जयसिंगपूर, शाखा- अ. लाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यांनी तक्रारदार पतसंस्था यांना न्यायनिर्णयातील परिच्छेद कलम- 2 मध्ये नमुद असलेल्या मुदत ठेवीमध्ये गुंतविलेल्या रक्कमा मुदत संपेपर्यंत ठरलेल्या व्याज दरानुसार द्यावेत व त्यानंतर द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे संपूर्ण रक्कम मिळेपावेतो अदा करावेत.
3. सामनेवाले श्री धर्मनाथ जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या, जयसिंगपूर, शाखा- अ. लाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यांनी तक्रारदार पतसंस्था यांना तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) अदा करावेत.
4. सामनेवाले श्री धर्मनाथ जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या, जयसिंगपूर, शाखा- अ. लाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यांनी तक्रारदार पतसंस्था यांना त्यांच्या ठेवींच्या व्याजापोटी काही रक्कमा अदा केल्या असलेस त्या व्याजाच्या रक्कमा ठेवींच्या रक्कमेतून वजा करण्याची मुभा सामनेवाले यांना राहील.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.