तक्रारदारातर्फे :- वकील -अँड. ए.एस. पावसे.
सामनेवालेतर्फे :- वकील –अँड. ए.पी. कुलकर्णी.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे पती मारोती बाबाजी बनकर यांचा मृत्यु तारीख 28/04/2008 रोजी अपघाताने झाला.
सदर घटनेची माहिती तक्रारदाराने आष्टी पोलीस स्टेशनला दिली. पोलीसांनी घटनेची चौकशी, तपास करुन मृत्युची नोंद केली. तसेच पोलीसांनी मयत व्यक्तीचा पंचनामा करुन मयताचे प्रेत शवविच्छेदनासाठी संबंधीत वैद्यकीय अधिका-याकडे सुपूर्द करुन संबंधित अर्जदाराचे जबाब नोंदवले व त्यानंतर साक्षीदारांच्या सहया घेऊन मयताचे प्रते अंत्यसंस्कारासाठी तक्रारदाराकडे सोपवले. मयत मारोती बाबाजी बनकर हे व्यवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाच्या शेतक-यांसाठी असलेल्या शेतकरी व्ययक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत त्यांचा विमा शासनाने घेतलेला होता.
तक्रारदाराने वरील विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी, आष्टी जि. बीड मार्फत सामनेवाले नं. 1 व 2 कडे रितसर दिनांक 28/7/2008 रोजी दाखल केला. परंतू सामनेवाले नं. 1 व 2 यांनी विमा दावा आजपर्यंत मंजूर केलेला नाही. सामनेवाले नं. 1 व 2 यांनी सेवेत कसूर केलेला आहे म्हणून सामनेवाले तक्रारदारांना मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/-, दावा खर्चापोटी रु. 2,000/- देण्यास जबाबदार आहेत.
विनंती की, वरील रक्कम रु. 1,00,000/- 18 टक्के व्याजासह सामनेवालेंनी तक्रारदारांना देण्याबाबत आदेश व्हावा. तसेच मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व दावा खर्चापोटी रु. 2,000/- तक्रारदारांना देण्याबाबत आदेश व्हावा.
सामनेवाले नं. 1 यांनी त्यांचा खुलासा तारीख 04/09/2010 रोजी दाखल केला. सदर खुलाशात तक्रारदाराच्या तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदाराने दावा फार्म ‘अ ते ग’ योग्यरितीने दाखल केलेले नाहीत. सदरचा दावा योग्य एजन्सी मार्फत सादर केला नाही. म्हणून सामनेवालेंनी सदरचा दावा मंजूर केला नाही. कारण दावा विमापत्रातील अटीनुसार योग्य एजन्सीकडून आलेला नाही, त्यामुळे सामनेवाले नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. सदरचा दावा अपरिपक्व आहे. सामनेवालेंनी दावा नाकारलेला नाही. तक्रारदारांना तक्रार करण्यास कोणतेही कारण नाही. तक्रार खर्चासह रदृ करण्यात यावी व तक्रारदाराकडून सामनेवालेंना रु.5,000/- देण्याचा आदेश व्हावा.
सामनेवाले नं. 2 यांनी त्यांचा खुलासा पोस्टाने तारीख 03/08/2010 रोजी पाठवला. त्यांचा खुलासा थोडक्यात की, मारोती बाबाजी बनकर यांचा अपघात तारीख 26/04/2008 रोजी झाला. त्याचा दावा तारीख 08/08/2008 रोजी अपूर्ण कागदपत्र 8-अ, मृत्यु प्रमाणपत्र, फेरफार, एफ आय आर, इन्क्वेस्ट, शवविच्छेदन अहवाल, इत्यादी कागदपत्रांची अपूर्णता असल्याने सदरची कागदपत्रे मिळाल्यावर सदरचा दावा हा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मुंबई यांच्याकडे ता. 26/6/2009 रोजी मंजूरीसाठी पाठविण्यात आला. अनेक स्मरणपत्रे देवून देखील सदरचा दावा हा निकालासाठी प्रलंबित आहे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाले नं. 1 चा खुलासा, शपथपत्र, सामनेवाले नं. 2 चा खुलासा यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान अँड. पावसे व सामनेवाले नं; 1 चे विद्वान अँड. ए. पी. कुलकर्णी यांचा युक्तिवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदार हिचे पती मयत मारोती बाबाजी बनकर यांना मृत्यु तारीख 28/4/2008 रोजी अपघाताने झाला. सदर अपघाताच्या संदर्भातील पोलीस पेपर्स व वैद्यकीय कागदपत्रे, शवविच्छेदन अहवाल, तक्रारदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत सामनेवाले नं. 2 कबाल विमा कंपनी यांच्याकडे पाठवला. सदरची कागदपत्रे अपूर्ण असल्याने सदर विमा कंपनीने सदर कागदपत्रांची पूर्तता करुन घेवून त्यांच्या खुलाशानुसार तारीख 26/6/2009 रोजी सदरचा दावा हा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी सामनेवाले नं. 1 यांच्याकडे पाठवलेला आहे.
यासंदर्भात सामनेवाले नं. 1 यांचा खुलासा त्रोटक व अत्यंत मोघम स्वरुपाचा आहे. त्यात सदरचा दावा मिळाल्याचे त्यांनी नमूद केलेले नाही व सदरचा दावा हा त्यांच्याकडे अंतिम निकालासाठी प्रलंबित असल्याचे मान्य केलेले नाही. परंतू तारीख 26/6/2009 रोजी कबाल विमा कंपनीने सर्व तपासणी करुन दावा सामनेवाले नं; 1 कडे पाठवलेला आहे व सदर दाव्याच्या कामी कागदपत्र कमी असल्याबाबत सामनेवाले नं. 1 कडून कोणतेही पत्र तक्रारदार किंवा सामनेवाले नं; 2 कबाल इन्शुरन्स कंपनी यांना मिळालेले नाही. याउलट सामनेवाले नं. 2 हे देखील सदर दाव्याच्या निकालाची वाट पाहत आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, सामनेवाले नं. 1 यांनी सदरची तक्रार ही अपरिपक्व व कुठल्याही कारणाशिवाय दाखल झाली आहे, अशी हरकत घेतलेली आहे. ती या ठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही. तारीख 26/6/2009 पासून सामनेवाले नं. 1 यांनी सदरचा दावा मंजूर केला नाही किंवा नामंजूरही केला नाही, त्यामुळे सामनेवाले नं. 1 यांची सदरची कृती ही सेवेत कसूर या सदरात मोडते. त्यामुळे सामनेवाले नं. 1 यांनी तक्रारदारांना मयत मारोती बनकर यांच्या मृत्यु दाव्याची रक्कम रु. 1,00,000/- देणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे. तसेच झालेल्या मानसिक त्रासाबाबत रक्कम रु. 5,000/- व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु. 3,000/- सामनेवाले नं. 1 यांनी तक्रारदारांना देणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
सामनेवाले नं. 2 यांनी सदरचा दावा हा योग्य ती पूर्तता करुन सामनेवाले नं. 1 कडे पाठवलेला असल्याने त्यांनी त्यांच्या सेवेत कसूर केल्याची बाब कोठेही स्पष्ट होत नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2. सामनेवाले नं. 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना मयत मारोती बनकर यांच्या मृत्यु विमा दाव्याची रक्कम रु. 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) आदेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत अदा करावी.
3. सामनेवालेंना आदेश देण्यात येतो की, त्यांनी वरील रक्कम विहीत मुदतीत तक्रारदारांना अदा न केल्यास त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराप्रमाणे तक्रार दाखल तारीख 28/06/2010 पासून व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
4. सामनेवाले नं. 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु. 5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) आदेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत अदा करावी.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
चुनडे/- स्टेनो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड