::: न्यायनिर्णय :::
मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या
१. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
२. अर्जदार हा चंद्रपूर येथील रहिवासी असून गैरअर्जदार क्र. २ हे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचे उत्पादक असून samsung या नावाच्या मोबाईलचे उत्पादक असून निर्माते आहेत व विविध प्रतिनिधी विविध ठिकाणी नेमून त्यांच्या तर्फे सदर उत्पादनाची विक्री करतात. गैरअर्जदार क्रमांक १ गैरअर्जदार क्रमांक २ चे प्रतिनिधी असून samsung mobile ची विक्री करतात व ग्राहकाला सेवा देण्याचे काम सुद्धा चंद्रपूर येथे करतात. अर्जदाराला शैक्षणिक उपयोगाच्या दृष्टिकोनातून आधुनिक तंत्रज्ञान असलेला मोबाईल घ्यायचा असल्यामुळे त्याने गैरअर्जदार क्र. १ कडे विचारणा केल्यास गैरअर्जदाराने त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलची माहिती दिली. तसेच भविष्यात काही मोबाईलबद्दल बिघाड झाल्यास तो दुरुस्त करून किंवा दुरुस्त न झाल्यास मोबाईल बदलवून सुद्धा देण्यात येईल, असे सांगितले त्यावर विश्वास ठेऊन गैरअर्जदार क्रमांक १ मार्फत बाजारात विक्रीस असलेला मोबाईल samsung g ९०० HZKAINS या मॉडेलचा मोबाईल रुपये ३६,५००/- मध्ये अर्जदारांनी नगदी दिनांक १२.०९.२०१४ रोजी INVOICE क्रमांक ११९८ आयएमईआय नंबर ३५३२९५०६१२५४४४६ विकत घेतला. सदर मोबाईल मध्ये इतर वैशिष्ट्ये सोबतच १६ मेगापिक्सल कॅमेरा २ जी बी रम हार्ट रेटींग चेक करणे इत्यादी खास वैशिष्ट होते. अर्जदाराने सदर मोबाईल गैरअर्जदार क्रमांक १ कडून विकत दिनांक १२.०९.२०१४ रोजी घेतल्यानंतर काही दिवस सदर मोबाईल व्यवस्थितपणे चालू होता. परंतु अंदाजे एप्रिल २०१५ चे शेवटी व मे २०१५ चे पहिले आठवड्यात सदर मोबाईल मध्ये बिघाड झाला असता अर्जदार हा गैरअर्जदाराकडे गेला असता गैरअर्जदार क्रमांक १ ने अर्जदाराला सांगितले की, चंद्रपूर येथे गल्फ सर्विस या नावाने सर्विस सेंटर आहे. ते सर्विस सेंटर गैरअर्जदारामार्फत विक्री केलेल्या उत्पादनात काही दोष त्रुटी निर्माण झाल्यास ते सेंटर त्याची दुरुस्ती करून देते. त्यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदार क्रमांक १च्या सांगण्यावरून सदर मोबाईल गल्फ सर्विस सेंटर येथे दुरुस्ती करून दिला होता. त्यानंतर तो मोबाईल काही दिवस सुरळीत चालला व पुन्हा २०.०७.२०१५ रोजी मोबाईल मध्ये बिघाड निर्माण झाला व त्यावेळेस मोबाईलची touch screen योग्य प्रमाणे काम करत नव्हती. मोबाईल गरम होत होता व auto restart होत नव्हता. त्यामुळे पुन्हा मोबाईल गैरअर्जदाराकडे दुरुस्तीसाठी दिला. तेव्हा सर्विस सेंटरच्या प्रतिनिधीने सांगितले की, मोबाईल दुरुस्त होण्यास सात दिवसाचा कालावधी लागेल. परंतु सदर मोबाईल अर्जदाराला २० दिवसांनंतर म्हणजेच दिनांक ११.०८.२०१५ ला दुरुस्त झाला, असे सांगून मोबाईल दिला. परंतु सदर मोबाईल पुन्हा लगेच दुस-या दिवशी खराब झाला, मोबाईल व्यवस्थित काम करीत नव्हता व मोबाईल मध्ये जुनेच बिघाड निर्माण झाले त्यामुळे परत अर्जदाराने दिनांक १३.०८.२०१५ रोजी सदर सर्विस सेंटर कडे मोबाइल दुरुस्ती करता दिला व त्या वेळेस अर्जदाराने गल्फ सर्विस सेंटर कडून १ वर्षांची वॉरंटी रु. २,५८० दिनांक १९.०८.२०१५ ला भरून वाढवून घेतली व त्यावेळेस अर्जदाराने दिनांक १३.०८.२०१५ रोजी मोबाईल बाबतची तक्रार ऑफिस सॅमसंगला मेलद्वारे कळवली होती. तरीसुद्धा दिनांक २१.०८.२०१५ पर्यंत न करून दिल्यामुळे अर्जदाराने दिनांक २१.०८.२०१५ रोजी वकिलामार्फत कर्जदारांना नोटीस पाठवून नवीन मोबाईल किंवा मोबाईलची रक्कम रु. ३६५०० व्याजासकट परत करावी व शारीरिक, मानसिक त्रासापोटी रकमेची मागणी केली. परंतु गैरअर्जदाराने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अर्जदाराला सदर तक्रार अर्ज करणे भाग पडले. अर्जदाराने मंच समक्ष सदर तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची मागणी अशी आहे की, अर्जदाराला नवीन मोबाईल देण्यात यावा व ते शक्य नसल्यास मोबाईलची किंमत रुपये 34500 व त्यावर १२ टक्के व्याज देण्यात यावे. तसेच वाढीव warranty ची भरलेली रक्कम रुपये २८५० व तक्रारीचा खर्च व इतर खर्च रुपये १०००० गैर अर्जदाराकडून अर्जदाराला देण्यात यावे.
३. अर्जदाराची तक्रार स्वीकृत करून गैर अर्जदाराला नोटीस पाठवण्यात आली. गैरअर्जदार क्रमांक १ यांना नोटीस प्राप्त होऊन सुद्धा प्रकरणात उपस्थित न झाल्यामुळे प्रकरण त्यांच्याविरुद्ध एकतर्फा चालवण्याचे आदेश दिनांक १७.०७.२०१७ रोजी पारित करण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक २ यांनी प्रकरणात उपस्थित राहून त्यांचे उत्तर दाखल केले. त्यांनी अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेले त्यांच्याविरुद्धचे आरोप खोडून काढून प्रत्येक मोबाईल सोबत warranty card दिले जाते व त्यामध्ये स्पष्ट नमूद केलेले असते की, सदर मोबाईलबाबत warranty कशी दिली जाईल व कोणत्या परिस्थितीत दिली जाईल. अर्जदाराने सदर मोबाईल दिनांक १२.११.२०१४ रोजी विकत घेतला. त्या वेळेस सदर मोबाईल सोबत वॉरंटी कार्ड देण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक २ नमुद करतो की, अर्जदाराने सदर मोबाईल दिनांक १२.११.२०१४ रोजी विकत घेतला होता व त्या तारखेपासून २०.०७.२०१५ पर्यंत कसलाही बिघाड झाला नाही व त्यासंबंधी अर्जदाराची कसलीही तक्रार नव्हती. क्रमांक २ नमूद करतो की, २०.०७.२०१५ चे अगोदर अर्जदार सदर मोबाईल घेऊन आला त्यावेळेस सदर मोबाईल विनामूल्य त्वरित दुरुस्त करून दिला. तेव्हापासून हा आजही व्यवस्थित चालू आहे व त्यामध्ये कसलाही बिघाड नाही. सदर मोबाईल गैरअर्जदार आजही मंचासमोर आणण्यास तयार आहे. यावरून स्पष्ट होते आहे की, मोबाईलमध्ये कसलाही बिघाड नाही. तसेच सदर वॉरंटी कार्ड मधील अटी व शर्ती गैरअर्जदार क्रमांक २ वर बंधनकारक आहेत. त्याच प्रकारे अर्जदारावर सुद्धा बंधनकारक आहेत. गैरअर्जदार क्र. २ नमूद करतो की, warranty card प्रमाणे गैरअर्जदार क्र. २ विरुद्ध कोणताही वाद हा फक्त दिल्ली येथील न्यायालयात चालू शकतो. म्हणून सदर तक्रार मंचा समक्ष चालू शकत नाही, कारण सदर तक्रार मंचासमक्ष MAINTENABLE नाही. गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदाराला योग्य ती सेवा दिलेली आहे व ते देण्यासही तयार आहेत. म्हणूनच अर्जदारांनी रुपये २८५० देऊन सदर सेवा वाढवून घेतली. यावरून स्पष्ट होते की गैरअर्जदार क्र. २ ने योग्य सेवा दिलेली आहे. मोबाईल फोन बंद पडत होता हे दाखवण्यासाठी अर्जदाराने कसलाही पुरावा जोडलेला नाही. तसेच अर्जदाराने सदर मोबाईल दिनांक १२.०९.२०१४ रोजी विकत घेतला होता व त्या तारखेपासून २०.०७.२०१५ पर्यंत कसलाही बिघाड झाला नाही व त्यासंबंधित अर्जदाराची कसलीही तक्रार नाही. तसेच दिनांक २०.०७.२०१५ रोजी अर्जदार सदर मोबाईल घेऊन आला त्यावेळेस सदर मोबाईल विनामूल्य त्वरित दुरुस्त करून दिला नाही, अशी खोटी तक्रार योग्य तो दंड आकारून खरिज करण्यात यावी. गैरअर्जदार क्र. २ पुढे नमूद करतात की, अर्जदार सदर मोबाईल घेऊन जाण्यासाठी कधीही आला नाही. गैरअर्जदार अर्जदारास मोबाईल परत करण्यास तयार आहे. म्हणूनच अर्जदाराच्या चुकीसाठी गैरअर्जदार जबाबदार राहत नाही. सबब, अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
४. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवादाची पुरशीस, यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मोबाईल विक्री
कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात
कसूर केल्याची बाब अर्जदार सिद्ध करतात काय ? होय
२. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मोबाईल विक्री
कराराप्रमाणे सेवासुविधा न दिल्याने नुकसान भरपाई
अदा करण्यास पात्र आहेत काय ? होय
३. आदेश ? अंशत: मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ बाबत :
५. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. २ निर्मित samsung g ९०० HZKAINS मोबाईल रक्कम रु. ३६,५०० नगदी दिनांक १२.०९.२०१४ रोजी विकत घेतला, ही बाब तक्रारीत दाखल बिलावरून सिध्द होते. सदर मोबाईल विकत घेतल्यानंतर मोबाईल व्यवस्थित चालू होता. परंतु नंतर त्यात बिघाड झाल्यामुळे अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. १ कडे तो दाखवला असता त्यांनी गैरअर्जदार क्र. २ सर्विस सेंटर यांच्या सल्ल्यानुसार तो अर्जदाराने गैरअर्जदार कडून restart करून घेतला. त्यानंतर काही दिवस सुरळीत चालल्यानंतर दिनांक २०.०७.२०१५ रोजी मोबाईल touch screen मध्ये बिघाड होऊन मोबाईल गरम होत असल्याने व हंग होणे व start न होणे अशा तक्रारी असल्यामुळे मोबाईल हा वॉरंटी कालावधी मध्ये येत असल्यामुळे गैरअर्जदार क्र. २ यांनी सदर मोबाइल दुरुस्त करून दिला. त्याबद्दल दस्तावेज तक्रारीत दाखल आहेत व ही बाब वादातीत नाही. परंतु सदर मोबाइल दुरुस्त करून दिल्यानंतर त्यात पुन्हा वारंवार बिघाड झाल्यामुळे तक्रार दाखल करावी लागली. याप्रमाणे दिनांक १०.०८.२०१५ रोजी पुन्हा अर्जदाराने गैरअर्जदार क्र. २ यांना ई मेल पाठवून नेहमीच मोबाईल मध्ये बिघाड येतो, त्यामुळे मोबाइलची रक्कम परत करावी अशी मागणी केली आणि वकिलामार्फत नोटीस पाठविली असता गैरअर्जदाराने अर्जदाराचा मोबाइल दुरुस्त झाला असे कळवले तसेच मोबाईलची वॉरंटी वाढवून घेण्यासाठी गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून रक्कम स्वीकारली ही बाब मान्य असून त्याबद्दल दस्तावेज कागदोपत्री दाखल केलेले आहेत. अर्जदारने दाखल केलेले दस्त व गैरअर्जदार यांच्या लेखी उत्तर यावरून सिद्ध होते कि, अर्जदाराच्या मोबाईलमध्ये बिघाड होणे सुरू झाले, याबद्दल अर्जदाराने warranty कार्डद्वारा अर्जदाराकडून दुरुस्ती करून घेतली की, ही बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. परंतु अर्जदाराने दुरुस्तीला दिलेल्या दिनांकापासून सदर मोबाईल हा गैरअर्जदार कडेच आहे. मोबाईल खरेदी केल्या पासून warranty कालावधीमध्ये असतानाच त्यामध्ये वारंवार दोष निर्माण झाले व गैरअर्जदारकडे दुरुस्तीसाठी दिल्यानंतरही दोष दूर झाले नाही. हे अर्जदाराने दस्तऐवजांसह सिद्ध केलेले आहे. गैरअर्जदार क्रमांक १ यांनी हजर होऊन अर्जदारांचे म्हणणे खोडून काढले नाही. गैरअर्जदार क्र. २ यांनी सदर तक्रारीतील मोबाईल मध्ये दोष असल्याने तो गैरअर्जदार क्र. २ कडे आहे हे सिद्ध होत आहे. तसेच गैरअर्जदार क्र. २ ह्यांनी अर्जदाराला सदर मोबाइल दुरुस्त करून दिला नाही अथवा या मोबाईलची रक्कमही अर्जदाराला परत केली नाही. ही गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती केलेली अनुचित व्यापार पद्धती आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. १ व २ अर्जदारास नुकसान भरपाई अदा करण्यास पात्र आहेत. सबब, मुद्दा क्रमांक हे १ व २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्र. ३ बाबत :
६. सबब मुद्दा क्र. १ व २ च्या विवेचनावरून मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. १८९/२०१५ अंशत: मान्य करण्यात येते.
२. गैरअर्जदार क्र.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे अर्जदारास ग्राहक संरक्षण अधिनीयम तरतुदी प्रमाणे मोबाईल विक्री कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यामध्ये कसुर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
३. गैरअर्जदार क्र.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे अर्जदाराचा Samsung G ९०० HZKAINS या मॉडेलचा मोबाईल या आदेश प्राप्ती दिनांकापासुन ३० दिवसात विनामोबदला दुरुस्त करुन द्यावा.
४. गैरअर्जदार क्र.१ व २ यांना वैयक्तिक व संयुक्तीकपणे, वर नमूद क्र. ३ ची पूर्तता विहित मुदतीत करणे शक्य नसल्यास, गैरअर्जदार क्र.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे अर्जदारास रक्कम रु. ३६,५००/- या आदेश प्राप्ती दिनांकापासुन ६० दिवसात अदा करावे.
५. गैरअर्जदार क्र.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे यांनी अर्जदारास मानसिक, शारीरीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. १०,०००/- या आदेश प्राप्ती दिनांकापासुन ३० दिवसात अदा करावी.
६. न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती कल्पना जांगडे श्रीमती किर्ती गाडगीळ श्री. उमेश वि.जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)