तक्रारकर्त्यातर्फे अधिवक्ता ः- श्री. पी.पी.थेर
विरूध्द पक्ष क्र. 1 तर्फे अधिवक्ता ः- श्री. आय.के.होतचंदानीच्या वतीने प्रतिनीधी अधिवक्ता श्री. दिपम बी.पोपट हजर
विरूध्द पक्ष क्र. क्र 2 व 3 ः- गैरहजर.
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः- श्री. भास्कर बी. योगी अध्यक्ष, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 15/06/2019 रोजी घोषीत )
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी आणि इतर विरुध्द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्याच्या आईच्या मृत्यू संबधात विमा दावा संबधाने दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून त्याची मृतक आई श्रीमती. लक्ष्मीबाई अर्जुन मेंढे हि व्यवसायाने शेतकरी होती व तिचे मालकीची मौजा पदमपूर, तालुका- आमगांव जिल्हा- गोंदिया येथे गट क्रं-243 व 241 ही शेत जमीन असून त्यावर तिच्या आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्दपक्ष क्रं-1) ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात व विरूध्द पक्ष क्र 2 हे विरूध्द पक्ष क्र 3 कडून दस्ताऐवज घेऊन विरूध्द पक्ष क्र 1 कडे विमा दावा सादर करतात. परंतू सदरच्या तक्रारीत तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 3 यांचेमार्फत दि. 29/08/2017 रोजी विरूध्द पक्ष क्र 1 व 2 कडे दावा सादर केला. तक्रारकर्त्याने त्यांच्या वकीलामार्फत विरूध्द पक्षाला दि. 20/06/2018 रोजी नोटीस पाठवून विमा दाव्याबद्दल विचारणा केली असता, विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी नोटीसला उत्तर दिले नाही. विमा दाव्याबद्दल काही न सांगता, आजपर्यंत मंजूर किंवा नामंजूर केला आहे याबाबत तक्रारकर्त्याला कळविले नाही.
तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत परिच्छेद क्र 2 व 3 मध्ये असे नमूद केले आहे की, त्याच्या आईच्या नावाने शेतजमिन असल्याकारणाने ती शेतकरी होती. दि. 22/04/2017 रोजी ग्रामीण रूग्णालय आमगांव येथून रस्त्यावर चालत जात असतांना एक अनोळखी मोटर सायकल चालकाने तिला धडक दिलयामूळे ती रस्त्यावर पडून गंभीर जखमी अवस्थेत के.टी.एस रूग्णालय गोंदिया येथे उपचाराकरीता दाखल केलेले असून त्याच दिवशी गंभीर जखमामूळे तिचा मृत्यु झाला. मर्ग खबरी, इन्ववेस्ट पंचनामा व शवविच्छदेन अहवाल अभिलेखावर दाखल करण्यात आला आहे. शवविच्छदेन अहवालानूसार मृत्युचे कारण “Hemorrhage shock due to injuries sustained” असे नमूद आहे. विरूध्द पक्षाने त्याचा विमा दावा मंजूर किंवा नामंजूर केल्याचा तक्रारकर्त्याला कळविले नाही. म्हणून सदरची तक्रार दाखल करून तक्रारकत्या्रनी विम्याची रक्कम रू. 2,00,000/-,द.सा.द.शे 12 टक्के व्याजाने अपघात झाल्याच्या दिनांकापासून देईपर्यत तसेच तक्रारीचा खर्च रू. 5,000/-,व मानसिक व शारिरिक त्रासाकरीता रू. 50,000/-,ची मागणी केली आहे.
3. विरूध्द पक्ष क्र 1 यांनी आपला लेखीजबाब दाखल करून तक्रारीत नमूद मजकुर त्याला मान्य नाही व आपल्या विशेष कथनामध्ये त्यांनी हे नमूद केलें आहे की, सदरची तक्रार कारण घडण्याच्या अगोदर दाखल केलेली आहे, या मंचाला हि तक्रार ऐकण्याचा अधिकार नाही. सदरची तक्रार हि कालबाहय आहे. तसेच त्यांना तक्रारकर्त्याचा कोणताही विमा दावा प्रस्ताव मिळाला नाही म्हणून तक्रारकर्त्याला विम्याची रक्कम देण्याचा प्रश्नच उद्दभवत नाही.
विरूध्द पक्ष क्र 2 यांनी आपला लेखीजबाब दाखल करून, विरूध्द पक्ष क्र 1 च्या कथनाच्या उलट परिच्छेद क्र 3 विमा दावा प्रस्ताव मिळालेला असून विरूध्द पक्ष क्र 1 यांनी दि. 08/05/2018 च्या पत्रान्वये मृतक श्रीमती. लक्ष्मीबाई अर्जुन मेंढे हे औषधाच्या अंमलाखाली असल्याकारणाने त्यांचा अपघात झालेला आहे म्हणून विमा दावा नामंजूर केला आहे.
विरूध्द पक्ष क्र 3 यांनी सुध्दा तक्रारीचा मजकुर मान्य करून, विरूध्द पक्ष क्र 1 यांनी दि. 18/05/2018 च्या पत्रान्वये विमा दावा नामंजूर केल्याची बाब स्विकारली आहे व त्याकरीता नामंजूर पत्र सुध्दा अभिलेखावर दाखल केले आहे.
4. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, त्यासोबत जोडलेले कागदपत्रे तसेच शपथपत्रावरती पुरावा व लेखीयुक्तीवाद तसेच विरूध्द पक्ष क्र 1,2 व 3 यांनी सुध्दा आपआपला लेखीजबाब दाखल केलेला आहे. त्यांचा साक्षपुरावा व लेखीयुक्तीवाद या मंचाने अवलोकन केले. तक्रारकर्त्यातर्फे अधिवकता श्री. पी.पी.थेर तसेच विरूध्द पक्ष क्र 1 त्यांचे जेष्ठ वकील श्री. आय.के. होतचंदानी यांचे वतीने वकील श्री. दिपम बी. पोपट यांनी तोंडीयुक्तीवाद केला. विरूध्द पक्ष क्र 2 व 3 गैरहजर. तक्रराकर्त्याचे अधिवक्ता व विरूध्द पक्ष क्र 1 च्या अधिवक्तांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच या मंचाने अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाच्या आधारे खालील मुद्दे कायम करून आपला निःष्कर्ष खालीलप्रमाणे नोंदवित आहोत.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | विरूध्द पक्षकारांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केली ही बाब तक्रारकर्ता सिध्द करत आहे काय? | होय. |
2. | तक्रारकर्ता हा विमा दावा मिळण्यास तसेच नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे का ? | होय. |
3 | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
:- निःष्कर्ष -:
5. मुद्दा क्र. 1 व 2 ः-
तक्रारकर्ता यांनी ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी विमा योजनेचा दावा विरूध्द पक्ष क्र 2 व 3 मार्फत विरूध्द पक्ष क्र 1 ला पाठविले आहे. विरूध्द पक्ष क्र 2 व 3 तक्रार दाखल झाल्यानंतर आपल्या लेखीजबाबामध्ये असे नमूद केले आहे की, विरूध्द पक्ष क्र 1 यांनी तक्रारकर्त्याचा दावा दि. 08/05/2018 च्या पत्रान्वये नामंजूर केलेला आहे. पॉलीसीच्या अटीनूसार क्लेम अपात्र ठरविणारे कारणः- डोळयांच्या उपचाराच्या औषधाच्या अंमलाखाली परंतू विरूध्द पक्ष क्र 1 यांनी आपल्या लेखीजबाबात या संदर्भात कोणताही खुलासा केला नाही फक्त उडवाउडवीचे कथन केले आहे.
विरूध्द पक्ष क्र 1 यांनी आपल्या लेखीजबाबात काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. विरूध्द पक्ष क्र 2 व 3 यांनी दाखल केलेले दस्ताऐवजावरून हे स्पष्ट आहे की, तक्रारकर्तीचा दावा दि. 08/05/2018 च्या पत्रान्वये फेटाळला आहे. हे सर्व माहित असून सुध्दा त्यांनी आपल्या विशेष कथनामध्ये विरोधभाषी कथन केलेले आहे. एका जागी असे नमूद आहे की, सदरची तक्रार कालबाहय आहे आणि लगेच त्याउलट असे नमूद केले आहे की, सदरची तक्रार कारण घडल्याशिवाय दाखल केली आहे. त्याचबरोबर आपला कांऊटर अॅपीडेवीटमध्ये सुध्दा त्यांनी विरूध्द पक्ष क्र 2 व 3च्या कथनाचा खंडन केलेले नाही. यावरून हे स्पष्ट आहे की, कोणतेही कारण देऊन ते तक्रारर्त्याला विमा दाव्याची रक्कम देण्यास तयार नाही आणि जर दि. 08/05/2018 च्या पत्रामध्ये नमूद कारण लक्षात घेतले तर ते कारण म्हणजे मृतक श्रीमती. लक्ष्मीबाई अर्जुन मेंढे औषधाच्या अंमलाखाली होते तसा कोणताही फोरनसीक/तज्ञांचा अहवाल मंचापुढे दाखल केलेला नाही. म्हणून विरूध्द पक्ष क्र 1 यांनी घेतलेले आक्षेप फेटाळण्यात येत आहे. हे सर्व असून सुध्दा विरूध्द पक्ष क्र 1 यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारल्याने त्यांना भरपूर आर्थिक अडचणींना तोंड दयावे लागले आणि या मंचापुढे सदर तक्रार दाखल करावी लागले. विरूध्द पक्ष क्र 1 ने घेतलेले आक्षेप चुकीची असून त्यांनी तक्रारकर्त्याला विमा दावा खोटे कारण दाखवून नामंजूर केल्याने त्यांनी ग्रा.सं.कायदयानूसार सेवा पुरविण्यात कसुर केला आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे हे सिध्द होते आहे. म्हणून हा मंच मुद्दा क्र 1 व 2 चा निःष्कर्ष होकारार्थी नोंदवित आहे.
6. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्त्याचा आईचा अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- दावा फेटाळण्याच्या दिनांकापासून म्हणजेच -08/05/2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-20,000/-(अक्षरी रुपये वीस हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) ती विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(2) जायका इंन्शुरंन्स ब्रोक्रेज प्रा.लि. कंपनी व विरूध्द पक्ष क्र. (3) तालुका कृषी अधिकारी, गेांदिया, जिल्हा गोंदिया यांचे काम फक्त विमा दावा करीता लागणारे कागदपत्र स्विकारून विरूध्द पक्ष क्र 1 कडे सादर करण्याचा असतो. त्यांनी आपले कर्तव्याचे पालन केले असून त्यांचे विरूध्दची तक्रार खारीज करणे योग्य व न्यायोचित होईल असे या मंचाचे मत आहे.
7. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याचा आईचा अपघाती मृत्यू संबधाने ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) दावा फेटाळण्याच्या दिनांकापासून म्हणजेच -08/05/2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्त्याला द्यावे.
(03) विरुध्दपक्ष क्र 1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-20,000/-(अक्षरी रुपये वीस हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीने तक्रारकर्त्याला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष – (2) व (3) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) यांना निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. वरील आदेश क्र 2 व 3 ची 30 दिवसांत पालन न केल्यास, द.सा.द.शे 12 टक्के व्याज देय राहिल.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्त्याची “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.