न्यायनिर्णय
(न्यायनिर्णयाचा दिनांक आज दि. 05 डिसेंबर, 2018)
न्यायनिर्णय द्वारा- मा.अध्यक्ष श्री. रा.गो. वानखडे.
1. तक्रारीची हकीकत थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारदार यांनी दोन बेडरुमचा अपार्टमेंट फ्लॅट नं.307, पहिला माळा, बिल्डींग क्रमांक-22, महाविर गॅलक्सी बारबाव , जिल्ह—ठाणे येथे ता.15.01.2015 रोजी रक्कम रु.3,09,270/- भरुन नोंद करुन घेतली होती. परंतु सामनेवाले यांनी आज पर्यंत त्या सदनिकेचे बांधकाम केलेले नाही व ताबा दिला नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे वेळोवेळी विचारणा केली, व त्यांनी दिलेली रक्कम बॅंकेच्या 7.5 टक्के व्याजाने परत करावी म्हणून मागणी केली. परंतु त्यांनी रक्कम सुध्दा परत केली नाही म्हणून ही तक्रार दाखल करावी लागली.
3. सामनेवाले यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल करुन तक्रारीतील मजकूर नाकबूल केला. परंतु सदनिका त्यांच्याकडे नोंद केल्याची गोष्ट कबुल केली. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, इमारतीचे बांधकाम 18 ते 24 महिन्यांत पुर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले नव्हते. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, जमिन ही भिवंडी येथे असल्याने या मंचास अधिकारक्षेत्र नाही. तक्रारदारास या तक्रारीतून कोणताही लाभ देता येणार नाही. म्हणून तक्रार खारीज करावी.
4. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेली कैफीयत तसेच दाखल कागदपत्रे, यासर्वांचे सखोल अवलोकनार्थ खालील प्रमाणे न्याय निर्णय करण्यात येत आहे.
5. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे दोन बेडरुमचा फ्लॅट क्रमांक-307, पहिला मजला, बिल्डींग क्रमांक-22 मध्ये रक्कम रु.3,09,270/- इतकी रक्कम भरुन ता.15.01.2015 रोजी नोंद केली होती. सामनेवाले यांनी तक्रारदार यांनी दिलेल्या रकमेच्या पावत्या दिल्या आहेत. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे यात वाद नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना पुर्ण रक्कम देऊन सुध्दा इमारतीचे बांधकाम सुरु केले नाही, व तक्रारदारास दिलेल्या सदनिकेसाठी करारनामा करुन दिला नाही, व ताबा सुध्दा दिलेला नाही.
6. सामनेवाले यांनी इमारतीचे बांधकाम सुरु न केल्याने व सदनिकेचा ताबा मिळण्याची शक्यता धुरुर असल्याने तक्रारदार यांनी दिलेली रक्कम ता.30.04.2017 पर्यंत द.सा.द.शे.7.5 टक्के व्याजाप्रमाणे व नंतर द.सा.द.शे.18 टक्के व्याजाप्रमाणे मागणी केली, तसेच झालेल्या त्रासामुळे रक्कम रु.50,000/- ची नुकसानभरपाई मागीतली आहे. तक्रारदार यांनी पत्रव्यवहार करुन सुध्दा तक्रारदार यांस त्याची रक्कम व व्याज परत केले नाही. सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये तक्रारदाराची रक्कम परत न करण्याचे व करारनामा न करुन देण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. अशा परिस्थितीत सामनेवाले यांना तक्रारदार यांची रक्कम ठेवण्याचा कोणताही अधिकार पोहोचत नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी केलेली मागणी मान्य करण्यास कोणतीही अडचण येत नाही. म्हणून तक्रार ही मंजुर करावी लागेल. म्हणून आम्ही खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
- आ दे श -
(1) सामनेवाले यांनी तक्रारदारास रक्कम रु.3,09,270/- (अक्षरी रुपये तीन लाख नऊ हजार दोनशे सत्तर) व त्यावर द.सा.द.शे 7.5 टक्के प्रमाणे व्याज ता.30.04.2017 पर्यंत एकूण रक्कम रु.53,156/- (अक्षरी रुपये त्रेपन्न हजार ऐकशे छपन्न) दयावेत.
(2) नुकसानभरपाई पोटी तक्रारदारास सामनेवाले यांनी रक्कम रु.50,000/- (अक्षरी रुपये पन्नास हजार) दयावेत.
(3) सामनेवाले यांनी रक्कम रु.3,09,270/- (अक्षरी रुपये तीन लाख नऊ हजार दोनशे सत्तर) वर ता.01.05.2017 पासुन द.सा.द.शे.18 टक्के प्रमाणे व्याज संपुर्ण रक्कम वसुल होईपर्यंत दयावे.
(4) सामनेवाले यांनी वरील आदेशांचे पालन आज पासुन तीन महिन्यांचे आंत करावे.
(5) अंतिम न्यायनिर्णयाची प्रत तक्रारदार व सामनेवाले यांना ग्राहक संरक्षण नियम, 2005 मधील नियम 18 (6) मधील तरतुदीनुसार शेवटच्या पृष्ठावर सदर नोंदीसह साधारण टपालाने पाठविण्यात यावी.
(6) अंतिम न्यायनिर्णयाची साक्षांकित सत्यप्रत उभय पक्षकारांना त्यांचे अर्जान्वये ग्राहक संरक्षण नियम, 2005 मधील नियम 21 मधील तरतुदीनुसार देण्यात यावा.
(7) सदस्य संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
दिनांकः 05 डिसेंबर, 2018.
ठिकाणः वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051.
जरवा/