Maharashtra

Osmanabad

CC/14/176

Shri Vikas Vishwanath Khadake - Complainant(s)

Versus

Manager Babusing Dhamaji Rathod Marketing Officer Maharashtra - Opp.Party(s)

N.M.Wagholikar

19 Jul 2016

ORDER

DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD
Aria of Collector Office Osmanabad
 
Complaint Case No. CC/14/176
 
1. Shri Vikas Vishwanath Khadake
R/o Wagholi Ta. Osmanabad Dist.Osmanabad
Osmanabad
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager Babusing Dhamaji Rathod Marketing Officer Maharashtra
Vestern Agri Seeds ltd.Gandhi Nagar Gujrat
Gandhi Nagar
gujrat
2. Prop. Vishnudas sharma
Krashi Vastu Bhandar Barashi Naka Road Osmanabad Tq.& Dist.Osmanabad
osmanabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.V. Kulkarni. PRESIDENT
 HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN MEMBER
 HON'BLE MR. M.B. Saste MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 19 Jul 2016
Final Order / Judgement

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्‍मानाबाद.

 

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 176/2014.

तक्रार दाखल दिनांक : 27/08/2014.

                                                           तक्रार आदेश दिनांक : 19/07/2016.                                निकाल कालावधी: 01 वर्षे 10 महिने 22 दिवस   

 

 

 

श्री. विकास पि. विश्‍वनाथ खडके, वय 39 वर्षे,

व्‍यवसाय : शेती, रा. वाघोली, ता.जि. उस्‍मानाबाद.                  तक्रारकर्ता

                   विरुध्‍द                          

 

(1) व्‍यवस्‍थापक बाबुसिंग धुमाजी राठोड, मार्केटींग ऑफीसर

    (महाराष्‍ट्र), वेस्‍टर्न अॅग्रो सिडस् लि., 802/11, वेस्‍टर्न हाऊस,

    जी.सी.आय.डी.सी. (eng) इस्‍टेट, सेक्‍टर 28,

    गांधीनगर (गुजरात).

(2) प्रोप्रा. विष्‍णूदास शर्मा, कृषि वस्‍तू भांडार,

    बार्शी नाका, बार्शी रोड, उस्‍मानाबाद.                           विरुध्‍द पक्ष

 

 

                   गणपुर्ती  :-   श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी, अध्‍यक्ष

                     सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्‍य                                श्री. मुकूंद बी. सस्‍ते, सदस्‍य 

 

                   तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ :  एन्.एन्. वाघोलीकर

                   विरुध्‍द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : एन्.डी. पाटील

 

न्‍यायनिर्णय

 

श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.    तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्‍यात असा आहे की, ते व्‍यवसायाने शेतकरी असून मौजे वाघोली येथे त्‍यांचे मालकी व कब्‍जेवहिवाटीची सर्व्‍हे नं. 187/3, क्षेत्र 1 हे. 17 आर. शेतजमीन आहे. सन 2013-2014 चे रब्‍बी हंगामामध्‍ये त्‍यांनी तीळ पीक घेण्‍याचे ठरवले आणि दि.16/1/2014 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 (यापुढे संक्षिप्‍त रुपामध्‍ये ‘वेस्‍टर्न अॅग्रो’) यांनी उत्‍पादीत व प्रमाणित केलेले ‘तीळ वेस्‍टर्न 11’ (यापुढे संक्षिप्‍त रुपामध्‍ये ‘वादविषयक बियाणे’) हे प्रत्‍येकी 500 ग्रॅम असणारे 4 पॅाकेट खरेदी केले. त्‍या बियाण्‍याचा लॉट नं. WRS 2013-31 असून बील क्र.KYB/6109 अन्‍वये रु.1,020/- किंमत देऊन विरुध्‍द पक्ष क्र.2 (यापुढे संक्षिप्‍त रुपामध्‍ये ‘कृषि वस्‍तू भांडार’) यांच्‍याकडून खरेदी केले होते. तक्रारकर्ता यांनी दि.18/1/2014 रोजी वादविषयक बियाणे त्‍यांच्‍या शेतजमिनीतील 80 आर. क्षेत्रावर पेरणी केले. पेरणी केल्‍यानंतर वादविषयक बियाण्‍याची 10 ते 12 दिवसापर्यंत उगवण होणे अपेक्षीत होते. बियाण्‍याची उगवण होण्‍यास पोषक वातावरण असूनही वादविषयक बियाण्‍याची उगवण झाली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता यांनी कृषि वस्‍तू भांडार यांची भेट घेतली असता त्‍यांच्‍या तक्रारीची दखल घेण्‍यात आली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता यांनी दि.5/2/014 रोजी तालुका कृषि अधिकारी, पंचायत समिती, उस्‍मानाबाद यांचेकडे तक्रार केली. त्‍यांच्‍या तक्रारीनंतर उपविभागीय अधिकारी (‍कृषि), उस्‍मानाबाद यांचे अध्‍यक्षतेखाली 5 सदस्‍यीय समितीने दि.18/2/2014 रोजी पेरणी क्षेत्राची पाहणी केली आणि बियाणे सदोष असल्‍यामुळे उगवण झाली नसल्‍याचा अहवाल दिला आहे. वेस्‍टर्न अॅग्रो यांनी उत्‍पादीत केलेले बियाणे सदोष असल्‍यामुळे रु.2,00,000/- अपेक्षीत उत्‍पन्‍नापासून तक्रारकर्ता यांना वंचित रहावे लागले. तसेच मशागत, खते, बियाणे इ. रु.26,020/- खर्च करावा लागला आहे. उपरोक्‍त वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी रु.2,00,000/- नुकसान भरपाईसह मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- नुकसान भरपाई व मशागत, खते, बियाणे इ. रु.26,020/- खर्च विरुध्‍द पक्ष यांचेकडून मिळावा, अशी विनंती केलेली आहे.

 

2.    वेस्‍टर्न अॅग्रो यांनी अभिलेखावर लेखी उत्‍तर दाखल केले असून तक्रारीतील विधाने व मजकूर अमान्‍य केला आहे. त्‍यांच्‍या कथनाप्रमाणे कोणतेही बियाणे विक्री करण्‍यापूर्वी सुसज्‍य प्रयोगशाळेमध्‍ये सर्व तपासणी करुन वितरक व विक्रेत्‍याकडे उपलब्‍ध करुन दिले जाते. वादविषयक बियाणे हे शासकीय बियाणे चाचणी प्रयोगशाळा, गांधीनगर, गुजरात येथे उत्‍पादकता, अनुवंशिकता, शुध्‍दता इ. चाचण्‍या पूर्ण करुन व तपासणी अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर बाजारामध्‍ये विक्रीसाठी खुले केले होते. बियाणे चांगले असले तरी बियाण्‍यांची उवगण होण्‍याकरिता जमिनीचा पोत, गुणवत्‍ता, प्रकार, हवामान, वातावरणातील आर्द्रता, पाणी देण्‍याची पध्‍दत व प्रमाण, पावसाचे प्रमाण, तापमान, खते, औषधांचा वापर, मशागत इ. बाबींचा परिणाम होतो. वेस्‍टर्न अॅग्रो पुढे असे कथन करतात की, तक्रारकर्ता यांनी वादविषयक बियाण्‍याच्‍या उगवणीबाबत त्‍यांना माहिती दिलेली नाही. तसेच तक्रारकर्ता किंवा बियाणे समितीने पीक पाहणी करताना त्‍यांना कळवलेले नाही. नियमानुसार समितीमध्‍ये 7 तज्ञ सदस्‍यांचा समावेश असताना 5 सदस्‍यांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत. त्‍यांनी समितीचा अहवाल अमान्‍य केला आहे. बियाण्‍याची खोलवर पेरणी किंवा पुरेसा ओलावा नसल्‍यास बियाण्‍याच्‍या उगवणशक्‍तीवर परिणाम होतो. बियाण्‍याची प्रयोगशाळेमध्‍ये तपासणी न करता, शास्‍त्रीय पध्‍दतीचा अवलंब न करता व प्रत्‍यक्ष बियाणे न पाहता बियाण्‍यामध्‍ये दोष असल्‍याचा समितीने दिलेला अहवाल चूक आहे. समितीने बियाणे प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवलेले नाही. तक्रारकर्ता यांची तक्रार चूक, खोटी व तथ्‍यहीन असल्‍यामुळे रद्द करण्‍यात यावी, अशी विनंती वेस्‍टर्न अॅग्रो यांनी केलेली आहे.

 

3.    कृषि वस्‍तू भांडार यांनी अभिलेखावर लेखी उत्‍तर दाखल केले असून तक्रारीतील मजकूर व विधाने अमान्‍य केले आहेत. तक्रारकर्ता यांची तक्रार खोटी असल्‍यामुळे खर्चासह रद्द करण्‍याची विनंती केलेली आहे.

 

4.    तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे लेखी उत्‍तर व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्‍ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                                 उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना विक्री केलेले वादविषयक

   बियाणे दोषयुक्‍त असल्‍याचे सिध्‍द होते काय ?                        होय.          

2. तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?      होय.

3. काय आदेश ?                                     शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

कारणमीमांसा

 

5.    मुद्दा क्र. 1 व 2 :- वेस्‍टर्न अॅग्रो यांनी उत्‍पादीत केलेले वादविषयक बियाणे तक्रारकर्ता यांनी कृषि वस्‍तू भांडार यांचेकडून खरेदी केल्‍याबाबत उभय पक्षांमध्‍ये विवाद नाही आणि त्‍याप्रमाणे खरेदी पावती अभिलेखावर दाखल आहे. तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या शेतजमिनीमध्‍ये वादविषयक बियाण्‍याची पेरणी केली असता 10 ते 12 दिवसांचा अवधी उलटूनही वादविषयक बियाण्‍याची उगवण झाली नाही. उलटपक्षी वेस्‍टर्न अॅग्रो यांच्‍या प्रतिवादाप्रमाणे शासनाची बियाणे चाचणी प्रयोगशाळा, गांधीनगर, गुजरात येथे वादविषयक बियाण्‍याची उत्‍पादकता, अनुवंशिकता, शुध्‍दता इ. चाचण्‍या पूर्ण करुन व तपासणी अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर बाजारामध्‍ये विक्रीसाठी खुले केले होते. बियाणे चांगले असले तरी बियाण्‍यांची उवगण होण्‍याकरिता जमिनीचा पोत, गुणवत्‍ता, प्रकार, हवामान, वातावरणातील आर्द्रता, पाणी देण्‍याची पध्‍दत व प्रमाण, पावसाचे प्रमाण, तापमान, खते, औषधांचा वापर, मशागत इ. बाबींचा परिणाम होतो, असा त्‍यांचा प्रतिवाद आहे. 

 

6.    ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13 (1) (सी) तरतुदीकडे पाहता, ज्‍यावेळी वस्‍तुमध्‍ये दोष असल्‍याची मंचाकडे तक्रार प्राप्‍त होते, त्‍यावेळी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13 (1) (सी) अन्‍वये दोषयुक्‍त वस्‍तु उचित प्रयोगशाळेकडे परिक्षणासाठी पाठविणे आवश्‍यक आहे.  निर्विवादपणे मंचासमोर वादविषयक बियाण्‍याच्‍या गुणवत्‍तेबाबत  तक्रार दाखल आहे आणि वादविषयक बियाण्‍याच्‍या गुणवत्‍तेबाबत वाद निर्माण झाल्‍यामुळे उपरोक्‍त निर्देशीत तरतुदीनुसार ते बियाणे तपासणीसाठी उचित प्रयोगशाळेकडे पाठविणे अत्‍यावश्‍यक होते. आमच्‍या मते, भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकरी जे बियाणे खरेदी करतो, त्‍याची किंमत निश्चितच जास्‍त असते आणि तसेच ते बियाणे मर्यादीत स्‍वरुपात असल्‍यामुळे भविष्‍यामध्‍ये उदभणारे तथाकथित अनिष्‍ठ परिणाम लक्षात घेऊन त्‍यापैकी काही बियाणे जतन केले जावे, अशी अपेक्षा करणे संयुक्तिक व उचित ठरणार नाही. उलटपक्षी ज्‍यावेळी बियाण्‍याची तक्रार प्राप्‍त होते, त्‍यावेळी संबंधीत उत्‍पादक कंपनीने तक्रारयुक्‍त बियाणे तात्‍काळ प्रयोगशाळेकडे तपासणीची कार्यवाही करणे गरजेचे आहे. या ठिकाणी आम्‍ही मा. सर्वोच्‍च न्‍यायालय व मा. राष्‍ट्रीय आयोगांच्‍या खालील निवाडयांचा आधार घेऊन इच्छितो आणि ज्‍यामध्‍ये निवाडयात  बियाण्‍यांमध्‍ये दोष असल्‍याची तक्रार असल्‍यानंतर परिक्षण करण्‍याची जबाबदारी तक्रारकर्ता  / शेतक-यावर येत नाही, असे स्‍पष्‍ट न्‍यायिक निरीक्षण नोंदवलेले आहे. 

 

(1) मा.राष्‍ट्रीय आयोग :- 'साऊथ इस्‍टर्न सीड्स कार्पोरेशन /विरुध्‍द/ आर. शेखर उर्फ श्रीधर', 1 (2008) सी.पी.जे. 158 (एन.सी.)

     

(2) मा.राष्‍ट्रीय आयोग :- 'इंडिया सीड हाऊस /विरुध्‍द/ रणजीलाल शर्मा व इतर', 2008 सी.टी.जे. 696 (सी.पी.) (एनसीडीआरसी)

     

(3) मा.राष्‍ट्रीय आयोग :-  ''नॅशनल सिड्स कार्पोरेशन लि. /विरुध्/ नेम्‍मी पती नागी रेड्डी'', 1 (2003) सी.पी.जे. 241 (एन.सी.)

 

(4) मा.राष्‍ट्रीय आयोग :- ''शाम बीज भांडार /विरुध्/ दरिया सिंग'', 1 (2003) सी.पी.जे. 263 (एन.सी.)

 

(5) मा.सर्वोच् न्यायालय :- ''मे. महाराष्ट्र हायब्रीड सिड्स कं. लि. /विरुध् / अलवलापतीचंद्रा रेड्डी'', 3 (1998) सी.पी.जे. 8 (एस.सी.)

 

(6) मा.राष्‍ट्रीय आयोग :- ''.आय.डी. पॅरी (इं) लि. /विरुध्‍द/ गौरीशंकर व इतर'', 4 (2006) सी.पी.जे. 178 (एन.सी)

 

(7) मा.राष्‍ट्रीय आयोग :- ''श्री. रामा एंटरप्रायजेस व इतर /विरुध्‍द/ व्‍यंकट रेड्डी'',      3 (2003) सी.पी.जे. 14 (एन.सी.)

 

      (8) मा.सर्वोच्‍च न्यायालय :- नॅशनल सीड्स कार्पोरेशन लिमिटेड /विरुध्‍द/ मे. मधुसुधन रेड्डी व इतर, (2012) 2 एससीसी 506

 

      (9) मा. राष्‍ट्रीय आयोग :- रिलायन्‍स लाईफ सायन्‍सेस प्रा.लि. /विरुध्‍द/ प्रकाश काशीनाथ ननवरे, 4 (2014) सी.पी.जे. 1 (एन.सी.)

     

7.    उपरोक्‍त निवाडयांमध्‍ये नमूद न्‍यायिक तत्‍वाप्रमाणे तक्रारकर्ता शेतक-यावर वादविषयक बियाणे परिक्षणाची जबाबदारी टाकता येत नाही, हे स्‍पष्‍ट होते. त्‍या अनुषंगाने दखल घेतली असता तक्रारकर्ता यांनी खरेदी केलेल्‍या बियाण्‍याची वैधता दि.28/8/2014 पर्यंत असल्‍याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ता यांच्‍या शेतजमिनीतील पीक पाहणी दि.18/2/2014 रोजी करण्‍यात आलेली आहे. त्‍यावेळी कृषि वस्‍तू भांडार यांचे प्रतिनिधी उपस्थित असल्‍याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ता किंवा बियाणे समितीने वेस्‍टर्न अॅग्रो यांना बियाणे समितीने पीक पाहणी करताना कळवले नसल्‍याचे काही क्षण ग्राह्य धरले तरी कृषि वस्‍तू भांडार हे वादविषयक बियाण्‍यांचे विक्रेते असल्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून वादविषयक बियाण्‍याची तक्रार ज्ञात झाली असावी, ही शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच तक्रारकर्ता यांनी वादविषयक बियाण्याची उगवण न झाल्‍यामुळे समिती अहवालातील निष्‍कर्ष नमूद करुन नुकसान भरपाई मिळण्‍याकरिता दि.15/4/2014 रोजी वेस्‍टर्न अॅग्रो यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठवलेली आहे. वादविषयक बियाण्‍याची वैधता दि.28/8/2014 पर्यंत होती आणि नोटीस दि.15/4/2014 रोजी पाठवल्‍यामुळे वेस्‍टर्न अॅग्रो यांना वादविषयक बियाण्‍याची शुध्‍दता व गुणवत्‍ता तपासून घेण्‍याची योग्‍य संधी उपलब्‍ध होती. परंतु त्‍यांचेद्वारे उत्‍पादीत वादविषयक बियाण्‍याच्‍या उगवणशक्‍तीची तक्रार असतानाही त्‍या लॉटचे बियाणे उचित प्रयोगशाळेकडून तपासणी करुन घेण्‍याचा कोणताही प्रयत्‍न केलेला नाही, असे निदर्शनास येते.

 

8.    तक्रारकर्ता यांनी वादविषयक बियाण्‍याचा तालुकास्‍तरीय चौकशी समितीचा अहवाल अभिलेखावर दाखल आहे. त्‍यामध्‍ये असे नमूद केले आहे की,

 

 

      तालुकास्‍तरीय समिती दि.18/2/2014 रोजी तीळ बियाणे न उगवलेल्‍या क्षेत्रास भेट देऊन क्षेत्राची पाहणी केली असता पेरणी शेत भिजवून केल्‍याचे दिसून आली. पेरणी ओलावा असताना केल्‍याचे दिसते. पेरणी रब्‍बी हंगामात केली आहे. उगवण झालेली नसलेचे दिसून आहे. सदर बियाणे इतर शेतकरी श्री. शामराव छगनराव देशमुख, रा. ढोकी, राम मनोहर देशमुख, ढोकी, शिवाजी संभाजी घाडगे, रा. गोवर्धनवाडी, ता.‍ उस्‍मानाबाद यांनी सदर तीळ बियाणे पेरणी केलेल्‍या क्षेत्राची पाहणी केली. तेथेही बियाणेची उगवण झाली नसल्‍याचे दिसून आले. यावरुन सदर बियाणे उगवणीसाठी अनुकूल परिस्थिती असतानादेखील बियाणेची उगवण झालेली दिसून आली नाही. त्‍यामुळे बियाणेमध्‍ये दोष असल्‍याचे दिसून आले आहे.  

 

9.    प्रस्‍तुत अहवालावर (1) सदस्‍य सचिव, कृषि अधिकारी, पंचायत समिती, उस्‍मानाबाद (2) सदस्‍य, तालुका कृषि अधिकारी, उस्‍मानाबाद (3) सदस्‍य, विद्यापीठ प्रतिनिधी, कृषि महाविद्यालय, उस्‍मानाबाद (4) सदस्‍य, जिल्‍हा व्‍यवस्‍थापक, महाबीज, उस्‍मानाबाद व (5) अध्‍यक्ष तथा उपविभागीय कृषि अधिकारी, उस्‍मानाबाद यांच्‍या  स्‍वाक्ष-या आहेत. विरुध्‍द पक्ष यांनी नियमानुसार समितीमध्‍ये 9 सदस्‍य असल्‍याचे नमूद करुन त्‍याबाबत कृषि खात्‍याचे परिपत्रक व शासनाचे दि.19/3/2005 रोजीचे परिपत्रक दाखल केलेले आहे. वास्‍तविक पाहता महाराष्‍ट्र शासनाचे कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागाने दि.17/10/2013 रोजी काढलेल्‍या परिपत्रकानुसार बियाणे, खते, किटकनाशके इ. निविष्‍ठांच्‍या गुणवत्‍ता/नियंत्रणाच्‍या अनुषंगाने कार्यवाहीबाबत तालुकास्‍तरीय तक्रार निवारण समितीची फेररचना केलेली असून ज्‍यामध्‍ये (1) उपविभागीय कृषि अधिकारी (2) तालुका कृषि अधिकारी (3) कृषि विद्यापीठ / कृषि संशोधन केंद्र / कृषि विज्ञान केंद्र प्रतिनिधी (4)  महाबीज प्रतिनिधी (5) कृषि अधिकारी, पंचायत समिती (संबंधीत तालुका) असे सदस्‍य अंतर्भूत आहेत. तक्रारकर्ता यांच्‍या पीक पाहणीमध्‍ये ते सर्व सदस्‍य उपस्थित असल्‍यामुळे योग्‍य तक्रार समिती असल्‍याचे  ग्राह्य धरणे भाग पडते. तसेच तक्रार समितीचा अहवाल तयार करणा-या समितीचे अधिकारी कृषि क्षेत्रातील तज्ञ असून त्‍यांच्‍या निरीक्षणाप्रमाणे बियाण्‍याची उगवणशक्‍ती झालेली नाही आणि बियाणे सदोष असल्‍याचे स्‍पष्‍टपणे नमूद केलेले आहे.

 

10.   वेस्‍टर्न अॅग्रो यांच्‍या प्रतिवादाप्रमाणे बियाण्‍यांची उवगण होण्‍याकरिता जमिनीचा पोत, गुणवत्‍ता, प्रकार, हवामान, वातावरणातील आर्द्रता, पाणी देण्‍याची पध्‍दत व प्रमाण, पावसाचे प्रमाण, तापमान, खते, औषधांचा वापर, मशागत इ. बाबींचा परिणाम होतो.  वास्‍तविक पाहता तक्रार समितीच्‍या अहवालाप्रमाणे वादविषयक बियाण्‍याची पेरणी ओलावा असताना केल्‍याचे व बियाणे उगवण होण्‍यासाठी अनुकूल परिस्थिती असतानाही बियाण्‍याची उवगण झालेली नाही. वेस्‍टर्न अॅग्रो यांनी ज्‍या उपरीनिर्दीष्‍ठ बाबींचा ऊहापोह केलेला आहे, त्‍या बाबी वादविषयक बियाण्‍याची उगवणशक्‍ती न होण्‍याकरिता कशाप्रकारे कारणीभूत होत्‍या, हे सबळ व योग्‍य पुराव्‍याद्वारे सिध्‍द केलेले नाही. तक्रारकर्ता यांनी पेरणी केली त्‍यावेळी त्‍यापैकी कोणती बाब निर्माण झाल्‍यामुळे बियाण्‍याच्‍या उवगणशक्‍तीवर परिणाम झाला, हे सिध्‍द करण्‍यात आलेले नाही. त्‍यामुळे वेस्‍टर्न अॅग्रो यांचा प्रस्‍तुत बचाव मान्‍य करता येणार नाही, असे या मंचाचे मत आहे.

 

11.   वादविषयक बियाण्‍यांमध्‍ये दोष नाही, असा प्रतिवाद करुन वेस्‍टर्न अॅग्रो यांना जबाबदारीतून मुक्‍त होता येणार नाही. तसेच बियाण्‍याची प्रयोगशाळेमध्‍ये तपासणी न करता, शास्‍त्रीय पध्‍दतीचा अवलंब न करता व प्रत्‍यक्ष बियाणे न पाहता बियाण्‍यामध्‍ये दोष असल्‍याचा समितीने दिलेला अहवाल चूक ठरतो, असेही ग्राह्य धरता येणार नाही. उलटपक्षी वेस्‍टर्न अॅग्रो यांनी उत्‍पादीत केलेले वादविषयक बियाणे निर्दोष व दोषविरहीत असल्‍याचे सिध्‍द करण्‍याची संधी असताना त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आलेले आहे. वेस्‍टर्न अॅग्रो यांनी दाखल केलेला बियाणे विश्‍लेषण अहवाल दि.2/12/2013 रोजी दिलेला आहे. त्‍यानंतर वादविषयक बियाण्‍याच्‍या गुणवत्‍तेचा वाद निर्माण झाल्‍यामुळे तो अहवाल त्‍यावेळी सत्‍यतादर्शक असल्‍याचे ग्राह्य धरले तरी तक्रारकर्ता यांच्‍या तक्रारीनंतर बियाणे तपासणी करुन घेण्‍याची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आणि वादविषयक बियाणे उचित प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवलेले नाही, असे निदर्शनास येते.

 

12.   मा. महाराष्ट्र राज् आयोगाने 'नोव्हार्टीज इंडिया लि. इतर /विरुध्/ अनिल संभाजीराव कोडरे', 2 (2004) सी.पी.जे. 283 मध्‍ये नमूद निवाडयात असे नमूद केले आहे की,

 

       Para. 10 : However, District Forum accepted the Report of the Expert Committee of the Zilla Parishad and in our view rightly since the said committee is a Statutory Committee duly authorised and empowered to render such reports.

 

      मा.राष्‍ट्रीय आयोगाने 'नॅशनल सिड्स कार्पोरेशन लि. /विरुध्‍द/ भीम रेड्डी मल्‍ली रेड्डी', 1 (2008) सी.पी.जे. 492 (एन.सी.) या निवाडयामध्‍ये असे म्‍हटले आहे की,

 

      Para.7 : What we see is that both the lower Forums have, in our view, rightly relied upon the reports of the Agriculture Officers after visiting the field of the respondent/complainat indicating loss of crop on account of seed supplied by the petitioner.

 

मा. राष्‍ट्रीय आयोगाने 'प्रथम बायोटेक प्रा.लि. /विरुध्‍द/ सईद जावेद सईद अमीर व इतर', 4 (2008) सी.पी.जे. 119 (एन.सी.) या निवाडयामध्‍ये असे नमूद केले आहे की,

 

 

     In any set of circumstances, the procedure prescribed under the Seeds Act is followed and the District Seeds Committee had held the necessary inquiry and had given its report. That report cannot be brushed aside on the contention that the seeds were not sent for testing to a laboratory.

 

13.   तक्रारीची वस्‍तुस्थिती व उपरोक्‍त निवाडयांतील तत्‍व पाहता, बियाणे तक्रार चौकशी समितीचा अहवाल उचित पुराव्‍याअभावी अमान्‍य करता येणार नाही आणि तो ग्राह्य धरणे भाग पडते. वेस्‍टर्न अॅग्रो हे वादविषयक बियाण्‍याचे निर्दोषत्‍व सिध्‍द करण्‍यास असमर्थ ठरले आहेत. परिणामी वादविषयक बियाणे दोषपूर्ण असल्‍याचे ग्राह्य धरले असता तक्रारकर्ता यांना देय नुकसान भरपाईची जबाबदारी त्‍यांच्‍यावर येते.

 

14.   वेस्‍टर्न अॅग्रो यांनी मा. राष्‍ट्रीय आयोग व मा. राज्‍य आयोगांच्‍या काही निवाडयांचा संदर्भ दाखल केलेला आहे. परंतु त्‍यातील वस्‍तुस्थिती व प्रश्‍न या तक्रारीशी सुसंगत नसल्‍यामुळे त्‍यांचा विचार करता येणार नाही.

 

15.   तक्रारकर्ता यांनी तीळ पिकापासून मिळणा-या अपेक्षीत रु.2,00,000/- उत्‍पन्‍नाकरिता नुकसान भरपाई मागणी केलेली आहे. वास्‍तविक पाहता तक्रारकर्ता यांनी प्रतिएकर मिळणारे अपेक्षीत उत्‍पादन व तत्‍कालीन दर याबाबत कोणताही ऊहापोह केलेला नाही. त्‍यांची नुकसान भरपाईची मागणी अत्‍यंत संदिग्‍ध व मोघम स्‍वरुपाची आहे. नुकसान भरपाईच्‍या मागणीसाठी त्‍यांनी कोणताही उचित व निर्णायक पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. तसेच तक्रारकर्ता ज्‍यावेळी पिकाच्‍या नुकसान भरपाईची मागणी करतात, त्‍यावेळी त्‍यांनी केलेला मशागत व बियाण्‍याचा खर्च मिळण्‍यास ते हक्‍कदार ठरणार नाहीत. तक्रारकर्ता हे रु.2,00,000/- नुकसान भरपाई मिळवण्‍यास पात्र असल्‍याचे सिध्‍द होत नाही. परंतु बियाण्‍याची उगवण न झाल्‍यामुळे त्‍यांना तीळ पिकापासून वंचित रहावे लागले आहे, ही वस्‍तुस्थित आहे. त्‍या अनुषंगाने विचार केला असता तक्रारकर्ता यांचे पेरणी क्षेत्र 80 आर. असल्‍याचे ग्राह्य धरुन तक्रारकर्ता हे रु.40,000/- नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र राहतील, असे या मंचाचे मत झाले आहे.  

 

16.   तक्रारकर्ता यांचे वादकथनाप्रमाणे त्‍यांनी वेस्‍टर्न अॅग्रो यांनी उत्‍पादीत केलेल्‍या वादविषयक बियाण्‍याबाबत तक्रार उपस्थित केलेली आहे. कृषि वस्‍तू भांडार हे वादविषयक बियाण्‍याचे केवळ विक्रेते आहेत. ज्‍यावेळी बियाण्‍याच्‍या गुणवत्‍तेचा प्रश्‍न निर्माण होतो, त्‍यावेळी उचित पुराव्‍याअभावी वितरक किंवा विक्रता त्‍याकरिता जबाबदार ठरणार नाही, असे या मंचाचे मत झाले आहे. त्‍यामुळे कृषि वस्‍तू भांडार यांना देय नुकसान भरपाईच्‍या दायित्‍वातून मुक्‍त करणे न्‍यायोचित ठरते.

 

17.   उपरोक्‍त विवेचनावरुन मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देऊन आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश  देत आहोत.

 

आदेश

 

      1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

      2. विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना रु.40,000/- (रुपये चाळीस हजार फक्‍त) नुकसान भरपाई द्यावी.

      3. विरुध्‍द पक्ष क्र.1 तक्रारकर्ता यांना तक्रार खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.

4. विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी उपरोक्‍त आदेशांची अंमलबजावणी आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत करावी.  

      5. विरुध्‍द पक्ष क्र.2 यांचे विरुध्‍द कोणतेही आदेश नाहीत.

      6. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्‍क द्यावी.

 

                                                                               

(श्री. मुकूंद बी. सस्‍ते)         (सौ. व्‍ही.जे. दलभंजन)      (श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी)

       सदस्‍य                     सदस्‍य                   अध्‍यक्ष

       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्‍मानाबाद.

       -00-

 (संविक/स्‍व/27516)

 
 
[HON'BLE MR. M.V. Kulkarni.]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN]
MEMBER
 
[HON'BLE MR. M.B. Saste]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.