जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 55/2016.
तक्रार दाखल दिनांक : 01/02/2016.
तक्रार आदेश दिनांक : 05/10/2016. निकाल कालावधी: 00 वर्षे 08 महिने 04 दिवस
(1) काकासाहेब आण्णासाहेब पाटील, वय 55 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. वडगांव (सि.), ता.जि. उस्मानाबाद.
(2) दादासाहेब लालासाहेब पाटील (मयत) :- वारस
(2/1) राजेंद्र दादासाहेब पाटील, वय 40 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. वडगांव (सि.), ता.जि. उस्मानाबाद.
(2/2) अमोल दादासाहेब पाटील, वय 37 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. वडगांव (सि.), ता.जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादीत,
महाबीज भवन, कृषि नगर, अकोला – 444 204.
(2) जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादीत,
महाबीज कार्यालय, समता नगर, उस्मानाबाद – 413 501. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ : डी.डी. शिंदे
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : ए.पी. जगताप
न्यायनिर्णय
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, ते शेतकरी असून त्यांची मौजे वडगांव (सि.), ता.जि. उस्मानाबाद येथे गट क्र.120 व 121, अनुक्रमे क्षेत्र 3 हे. 50 आर व 2 हे. 43 आर शेतजमीन आहे. सन 2013-2014 च्या खरीप हंगामाकरिता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 (यापुढे संक्षिप्त रुपामध्ये ‘महाबीज’) यांच्याकडून तुर BSMR-736 या वाणाचा बिजोत्पादन कार्यक्रम घेतला होता. त्यांनी रितसर नोंदणी करुन व चलन भरणा करुन दि.3/6/2013 रोजी महाबीज कंपनीचे प्रतिबॅग 2 किलो असणा-या प्रत्येकी 6 बॅगप्रमाणे एकूण 12 बॅग खरेदी केल्या. त्याकरिता बील क्र.6183 व 6184 नुसार महाबीज कंपनीचे खाते क्र.20158302961 चलनाद्वारे भरणा केली. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी शेतजमिनीची मशागत करुन व योग्य पाऊस झाल्यानंतर दि.6/6/2013 रोजी महाबीज तुर BSMR-736 हे बियाणे एकूण 1 हे. 60 आर. क्षेत्रामध्ये पेरणी केले. त्यांनी पेरणी केलेले बियाणे पूर्णपणे उगवून आले. महाबीजच्या मार्गदर्शनाखाली पिकाची आंतरमशागत, किड नियंत्रण फवारणी, विलगीकरण, तांबडया रंगाची झाडे व रोगट बांडाळलेली झाडे उपटून नष्ट करणे इ. कामे केली. तुरीच्या प्लॉटमध्ये तुर शेंगाची भरणी होऊन पक्व होत असताना महाबीजच्या अधिका-यांनी दि.7/1/2014 रोजी तुर पिकाची तपासणी केली. त्यावेळी त्यांनी पिकामध्ये 25 ते 30 टक्के भेसळयुक्त बियाणे असल्यामुळे बिजोत्पादन मंजूर होत नाही, असे सांगितले. त्याबाबत विचारणा केली असता पिकातील दृष्य स्वरुपातील भेसळ काढून टाकली असली तरी अदृष्य स्वरुपातील भेसळ ही पीक पक्व झाल्यानंतर दिसून येते आणि ती पक्व होण्याच्या अवस्थेत काढता येत नाही आणि ती बियाण्यात असलेल्या गुणसुत्रामुळे होते, असे सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी दि.15/1/2015 रोजी सदस्य सचिव तथा कृषि अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद व तालुका कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांच्यासह महाबीजकडे बियाणे भेसळीबाबत तक्रार-अर्ज केले. त्यांच्या तक्रारीवरुन उपविभागीय अधिकारी (कृषि), उस्मानाबाद यांचे अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय समितीने दि.31/1/2014 रोजी तक्रारकर्ता यांच्या पिकाची प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा केला. त्यानुसार 23 टक्के भेसळयुक्त बियाणे असल्याचा अहवाल देण्यात आला. तक्रारकर्ता यांचा बिजोत्पादन कार्यक्रम नामंजूर झाल्यामुळे महाबीजने बियाणे स्वीकारले नाही आणि 32 क्विंटल तुरीचे प्रतिक्विंटल रु.5,000/- प्रमाणे त्यांचे 1,60,000/- चे आर्थिक नुकसान झाले. उपरोक्त वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी पिकाचे आर्थिक नुकसानीसह मशागत खर्च व इतर नुकसानीकरिता एकूण रु.2,10,800/- ची मागणी केली आहे. तसेच मानसिक व शारीरिक त्रासाकरिता व तक्रार खर्चाकरिता रु.50,000/- देण्याचा महाबीजला आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष महाबीजतर्फे अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील विधाने व मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारकर्ता यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळास आवश्यक पक्षकार केले नाही आणि तक्रारकर्ता हे ‘ग्राहक’ संज्ञेत येत नाहीत. उस्मानाबाद तालुक्यामध्ये गेल्या 3 वर्षापासून सतत अवर्षणामुळे अत्यल्प पाऊस झालेला आहे आणि पुरेशी ओल नसल्यास बियाणे नष्ट होऊन परिणाम होतो. त्यांनी बी.एस.एम.आर.736 वाणाचे बियाणे बीज प्रमाणीकरण यंत्रणेने मुक्तता अहवाल दिल्यानंतर व गुणवत्तेची चाचणी केल्यानंतर विक्रीस उपलब्ध करुन दिले आहे. तक्रारकर्ता यांनी घेतलेल्या बियाण्याची तपासणी प्रयोशाळेतून करुन घेणे बंधनकारक असताना ती न केल्यामुळे तक्रार फेटाळण्यात यावी. तक्रारकर्ता यांची तक्रार मुदतबाह्य आहे. शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती महाबीजतर्फे करण्यात आली आहे.
3. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. महाबीजने तक्रारकर्ता यांना विक्री केलेले वादविषयक
तुर बियाणे दोषयुक्त असल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमीमांसा
4. मुद्दा क्र. 1 व 2 :- विरुध्द पक्ष महाबीजतर्फे उत्पादीत केलेले वादविषयक तुर BSMR-736 हे बियाणे तक्रारकर्ता यांनी खरेदी केल्याबाबत उभय पक्षांमध्ये विवाद नाही. तक्रारदार यांनी वादविषयक बियाण्याची पेरणी केली असता बियाणे पूर्णपणे उगवून आले; परंतु तुर पिकामध्ये 25 ते 30 टक्के भेसळयुक्त बियाणे निदर्शनास आले. उलटपक्षी महाबीजच्या प्रतिवादाप्रमाणे उस्मानाबाद तालुक्यामध्ये गेल्या 3 वर्षापासून सतत अवर्षणामुळे अत्यल्प पाऊस झालेला आहे आणि पुरेशी ओल नसल्यास बियाणे नष्ट होऊन परिणाम होतो. तसेच त्यांनी बी.एस.एम.आर.736 वाणाचे बियाणे बीज प्रमाणीकरण यंत्रणेने मुक्तता अहवाल दिल्यानंतर व गुणवत्तेची चाचणी केल्यानंतर विक्रीस उपलब्ध करुन दिले आहे.
5. उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर तक्रारकर्ता यांनी महाबीजकडून खरेदी केलेले बियाणे पेरणी केल्याबाबत व ते संपूर्ण उगवण झाल्याबाबत उभयतांमध्ये वाद नाही. प्रामुख्याने पेरणी केलेल्या बियाण्याची उगवण झाल्यानंतर 25 ते 30 टक्के भेसळयुक्त बियाणे उगवल्यामुळे त्यांचे बिजोत्पादन मंजूर होत नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. महाबीजतर्फे असा प्रतिवाद करण्यात आला की, तक्रारकर्ता यांनी बियाण्याची तपासणी प्रयोगशाळेतून करुन घेतली नसल्यामुळे तक्रार रद्द करण्यात यावी. निर्विवादपणे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13 (1) (सी) तरतुदीकडे लक्ष वेधले असता ज्यावेळी वस्तुमध्ये दोष असल्याची मंचाकडे तक्रार प्राप्त होते, त्यावेळी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13 (1) (सी) अन्वये दोषयुक्त वस्तु उचित प्रयोगशाळेकडे परिक्षणासाठी पाठविणे आवश्यक आहे. प्रस्तुत तक्रारीतील वादविषयाप्रमाणे तुर बियाण्याच्या गुणवत्तेबाबत तक्रार दाखल आहे आणि वादविषयक बियाण्याच्या गुणवत्तेबाबत वाद निर्माण झाल्यामुळे उपरोक्त निर्देशीत तरतुदीनुसार ते बियाणे तपासणीसाठी उचित प्रयोगशाळेकडे पाठविणे अत्यावश्यक होते. आमच्या मते, भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकरी जे बियाणे खरेदी करतो, ते गरजेनुसार व मर्यादीत स्वरुपात असल्यामुळे भविष्यामध्ये उदभणारे तथाकथित अनिष्ठ परिणाम लक्षात घेऊन त्यापैकी काही बियाणे जतन केले जावे, अशी अपेक्षा करणे संयुक्तिक व उचित ठरणार नाही. उलटपक्षी ज्यावेळी बियाण्याची तक्रार प्राप्त होते, त्यावेळी संबंधीत उत्पादक कंपनीने तक्रारयुक्त बियाणे तात्काळ प्रयोगशाळेकडे तपासणीची कार्यवाही करणे गरजेचे आहे. या ठिकाणी आम्ही मा. सर्वोच्च न्यायालय व मा. राष्ट्रीय आयोगांच्या खालील निवाडयांचा आधार घेऊन इच्छितो आणि ज्यामध्ये निवाडयात बियाण्यांमध्ये दोष असल्याची तक्रार असल्यानंतर परिक्षण करण्याची जबाबदारी तक्रारकर्ता / शेतक-यावर येत नाही, असे स्पष्ट न्यायिक निरीक्षण नोंदवलेले आहे.
(1) मा.राष्ट्रीय आयोग :- 'साऊथ इस्टर्न सीड्स कार्पोरेशन /विरुध्द/ आर. शेखर उर्फ श्रीधर', 1 (2008) सी.पी.जे. 158 (एन.सी.)
(2) मा.राष्ट्रीय आयोग :- 'इंडिया सीड हाऊस /विरुध्द/ रणजीलाल शर्मा व इतर', 2008 सी.टी.जे. 696 (सी.पी.) (एनसीडीआरसी)
(3) मा.राष्ट्रीय आयोग :- ''नॅशनल सिड्स कार्पोरेशन लि. /विरुध्द/ नेम्मी पती नागी रेड्डी'', 1 (2003) सी.पी.जे. 241 (एन.सी.)
(4) मा.राष्ट्रीय आयोग :- ''शाम बीज भांडार /विरुध्द/ दरिया सिंग'', 1 (2003) सी.पी.जे. 263 (एन.सी.)
(5) मा.सर्वोच्च न्यायालय :- ''मे. महाराष्ट्र हायब्रीड सिड्स कं. लि. /विरुध्द / अलवलापतीचंद्रा रेड्डी'', 3 (1998) सी.पी.जे. 8 (एस.सी.)
(6) मा.राष्ट्रीय आयोग :- ''इ.आय.डी. पॅरी (इं) लि. /विरुध्द/ गौरीशंकर व इतर'', 4 (2006) सी.पी.जे. 178 (एन.सी)
(7) मा.राष्ट्रीय आयोग :- ''श्री. रामा एंटरप्रायजेस व इतर /विरुध्द/ व्यंकट रेड्डी'', 3 (2003) सी.पी.जे. 14 (एन.सी.)
(8) मा.सर्वोच्च न्यायालय :- ‘नॅशनल सीड्स कार्पोरेशन लिमिटेड /विरुध्द/ मे. मधुसुधन रेड्डी व इतर’, (2012) 2 एससीसी 506
(9) मा. राष्ट्रीय आयोग :- ‘रिलायन्स लाईफ सायन्सेस प्रा.लि. /विरुध्द/ प्रकाश काशीनाथ ननवरे’, 4 (2014) सी.पी.जे. 1 (एन.सी.)
6. उपरोक्त निवाडयांमध्ये नमूद न्यायिक तत्वाप्रमाणे तक्रारकर्ता शेतक-यावर वादविषयक बियाणे परिक्षणाची जबाबदारी टाकता येत नाही, हे स्पष्ट होते. त्या अनुषंगाने दखल घेतली असता तक्रारकर्ता यांनी खरेदी केलेल्या वाण व लॉटचे बियाण्याची शुध्दता व गुणवत्ता तपासून घेण्याची महाबीजला योग्य संधी उपलब्ध होती. परंतु त्यांचेद्वारे उत्पादीत वादविषयक बियाण्यामध्ये भेसळ असल्याची तक्रार असतानाही त्या लॉटचे बियाणे उचित प्रयोगशाळेकडून तपासणी करुन घेण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही, असे निदर्शनास येते.
7. तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर बियाणे उगवण / भेसळ तक्रार – तपासणी अहवाल दाखल आहे. त्यामध्ये सरासरी 23 टक्के भेसळीचे प्रमाण दर्शवलेले आहे. प्रस्तुत अहवालावर (1) सदस्य सचिव, कृषि अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद (2) सदस्य, तालुका कृषि अधिकारी, उस्मानाबाद (3) सदस्य, विद्यापीठ प्रतिनिधी, कृषि महाविद्यालय, उस्मानाबाद (4) सदस्य, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, उस्मानाबाद व (5) अध्यक्ष तथा उपविभागीय कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांच्या स्वाक्ष-या आहेत. या ठिकाणी प्रकर्षाने ही बाब नमूद करणे भाग आहे की, ज्या महाबीजच्या बियाण्याची तक्रारकर्ता यांनी तक्रार केलेली आहे, त्या बियाण्याच्या तपासणीकरिता नियुक्त समितीमध्ये महाबीजचे प्रतिनिधी हजर आहेत. तपासणीच्या वेळी महाबीजच्या प्रतिनिधीने अहवालामध्ये बियाण्यामध्ये भेसळ असल्याबाबत स्पष्ट दुजोरा दिलेला आहे. तसेच तक्रार समितीचा अहवाल तयार करणा-या समितीचे अधिकारी कृषि क्षेत्रातील तज्ञ असून त्यांच्या निरीक्षणाप्रमाणे बियाण्यामध्ये भेसळ होती, असे ग्राह्य धरावे लागते.
8. मा. महाराष्ट्र राज्य आयोगाने 'नोव्हार्टीज इंडिया लि. व इतर /विरुध्द/ अनिल संभाजीराव कोडरे', 2 (2004) सी.पी.जे. 283 मध्ये नमूद निवाडयात असे नमूद केले आहे की,
Para. 10 : However, District Forum accepted the Report of the Expert Committee of the Zilla Parishad and in our view rightly since the said committee is a Statutory Committee duly authorised and empowered to render such reports.
मा.राष्ट्रीय आयोगाने 'नॅशनल सिड्स कार्पोरेशन लि. /विरुध्द/ भीम रेड्डी मल्ली रेड्डी', 1 (2008) सी.पी.जे. 492 (एन.सी.) या निवाडयामध्ये असे म्हटले आहे की,
Para.7 : What we see is that both the lower Forums have, in our view, rightly relied upon the reports of the Agriculture Officers after visiting the field of the respondent/complainat indicating loss of crop on account of seed supplied by the petitioner.
मा. राष्ट्रीय आयोगाने 'प्रथम बायोटेक प्रा.लि. /विरुध्द/ सईद जावेद सईद अमीर व इतर', 4 (2008) सी.पी.जे. 119 (एन.सी.) या निवाडयामध्ये असे नमूद केले आहे की,
In any set of circumstances, the procedure prescribed under the Seeds Act is followed and the District Seeds Committee had held the necessary inquiry and had given its report. That report cannot be brushed aside on the contention that the seeds were not sent for testing to a laboratory.
9. तक्रारीची वस्तुस्थिती व उपरोक्त निवाडयांतील तत्व पाहता, बियाणे उगवण / भेसळ तक्रार – तपासणी अहवाल उचित पुराव्याअभावी अमान्य करता येणार नाही आणि तो अहवाल ग्राह्य धरणे भाग पडते. तसेच महाबीज हे वादकथित बियाण्याचे निर्दोषत्व सिध्द करण्यास असमर्थ ठरले आहेत. परिणामी वादकथित बियाणे तुर बियाणे दोषयुक्त असल्याचे ग्राह्य धरले असता तक्रारकर्ता यांना देय नुकसान भरपाईची जबाबदारी त्यांच्यावर येते.
10. तक्रारकर्ता यांनी तुर पिकाची नुकसान भरपाई व इतर खर्चाकरिता महाबीजकडून एकूण रु.2,10,800/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे प्रतिएकर 10 क्विंटल उत्पादन मिळणे अपेक्षीत असताना भेसळयुक्त बियाण्यामुळे त्यांना केवळ 2 क्विंटल तुरीचे उत्पादन झाले. त्यावेळी प्रतिक्विंटल रु.5,000/- दर असल्यामुळे त्यांचे रु.1,60,000/- चे नुकसान झाले आहे. तसेच त्यांना मिळालेल्या 8 क्विंटल तुरीकरिता रु.3,000/- दर मिळून रु.24,000/- उत्पन्न मिळाले आहे. तक्रारकर्ता यांनी मशागत खर्च, खते, औषधे, वाहतूक इ. खर्चाची सुध्दा मागणी केलेली आहे. विरुध्द पक्ष यांच्या प्रतिवादाप्रमाणे तक्रारकर्ता यांनी नुकसान भरपाईची मागणी अवास्तव व खोटी आहे. नुकसान भरपाईचा विचार करता तक्रारकर्ता यांच्या वादकथनाप्रमाणे व दाखल पुराव्यांवरुन तुर पिकामध्ये 23 टक्के भेसळीचे प्रमाण आढळून आले आहे. तक्रारकर्ता यांची तुर पिकाची उगवण व उत्पादनाबाबत विशेष तक्रार नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांना 100 टक्के उत्पादन मिळालेले असून त्यापैकी 77 टक्के मुळ वाणाचे व 23 टक्के भेसळयुक्त वाणाचे तुर उत्पादन मिळाले असावे, असे ग्राह्य धरावे लागते. त्यामुळे या ठिकाणी असा मुद्दा उपस्थित होतो की, मुळ व भेसळयुक्त तुरीचे उत्पादन स्वतंत्रपणे काढता येणे अशक्य असल्यामुळे ते एकत्रित काढण्यात आल्यामुळे त्याकरिता केवळ दर कमी मिळू शकला असावा, हीच एकमेव शक्यता आहे. तक्रारकर्ता यांनी प्रतिएकर 10 क्विंटल उत्पादन गृहीत धरले आहे. योग्य विचाराअंती त्यांना प्रतिएकर 8 क्विंटल उत्पादन व त्यावेळी असणारा प्रतिक्विंटल रु.5,000/- दर गृहीत धरला असता तक्रारकर्ता यांना प्रतिएकर रु.40,000/- उत्पन्न मिळू शकले असते. परंतु भेसळयुक्त तुर उत्पादनामुळे त्यांना सर्वसाधरणपणे रु.4,000/- दर मिळाला असावा आणि प्रतिक्विंटल रु.1,000/- प्रमाणे त्यांचे नुकसान झाल्याचे गृहीत धरुन रु.8,000/- प्रतिएकर नुकसान झाले, त्या 4 एकराची रु.32,000/- भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. वरील विवेवचनावरुन मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
ग्राहक तक्रार क्रमांक : 55/2016.
आदेश
1. तक्रारकर्ता यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 महाबीज यांनी तक्रारकर्ता यांना रु.32,000/- (रुपये बत्तीस हजार फक्त) नुकसान भरपाई द्यावी.
3. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 महाबीज यांनी तक्रारकर्ता यांना तक्रार खर्चापोटी रु.5,000/- द्यावेत.
4. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 महाबीज यांनी उपरोक्त आदेशांची अंमलबजावणी आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
5. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क द्यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (सौ. व्ही.जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
(संविक/स्व/41016)