निकाल
दिनांक- 12.11.2013
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार सचिन अंबादासराव आबुज यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी विनाकारण मोबाईल नंबरवर खोटे संदेश पाठवूनव मोबाईल सिम खात्यामधील पैसे कमी करुन सेवेत कसूर केल्यामुळे नुकसान भरपाई मिळणेबाबत दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे, तक्रारदार व्यवसायाने वकील आहे. व्यवसायाच्या संपर्क साधण्याकरता सामनेवाला यांचे कंपनीचे मोबाईलचे सिम कार्ड घेतले आहे. सदर मोबाईल सिम कार्डचा नंबर 9405458615 असा आहे. मागील दोन वर्षापासून तक्रारदार हा सदर मोबाईल नंबर वापरत आहे.सामनेवाला हे सदर मोबाईल कंपनीचे जबाबदार अधिकारी आहे.
तक्रारदार हे मोबाईल वापरत असताना दि.06.04.2012 रोजी Thanks for subscribing FEVER offer from Handy go at 06/04/2012 02.32 p.m. for Rs.3 valid till 09/04/2012 to unsubscribe send UNSUB FEVER, to 55678 अशा प्रकारचा संदेश आल्यानंतर मोबाईल सिम खात्यामधून रु.3 कपात झाले. तसेच संदेश परत दि.09.04.12 रोी आला व पुन्हा 3 रु कपात झाले. सदर सेवा बंद करण्यासाठी तक्रारदार याने सामनेवाला यांच्याकडे जाऊन वेळोवेळी तोडी तक्रार केली, त्यावेळेस सामनेवाला यांनी आश्वासन दिले की, आम्ही सदर सेवा लवकरच बंद करु. तक्रारदार याने दि.10.04.2012 रोजी सामनेवाला यांनी सांगितल्याप्रमाणे UNSUB FEVER हा संदेश पाठविला परंतू संदेश पाठविल्यानंतर Your reqest could not be accepted due to incorrect keyword, please send correct keyword, thankes you. असा संदेश येऊन परत मोबाईल खात्यातून 2 रुपये कपात झाले. सदर संदेश वाचून तक्रारदारास प्रचंड मनस्ताप झाला. तक्रारदार यांने कोणतीही सेवा कार्यान्वित न करता विनाकारण त्रास होईल अशा प्रकारची सेवा सामनेवाला यांच्याकडून देण्यात आली. सदर अहचूक संदेश पाठवून देखील सामनेवाला यांनी तक्रारदाराने न सुरु केलेली सेवा बंद केली नाही तक्रारदार यांच्या खात्यामधून दररोज 1 रु.प्रमाणे आजपर्यंत रुपये कमी होत गेले.
सदर प्रकार हा दि.06.04.2012 सतत पुढे चालू असून तक्रारदाराच्या खात्यातून दररोज 1 रुपये प्रमाणे रक्कम कमी होत आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना अनेकदा तोंडी तक्रार दिली, परंतू आजपर्यत त्याची कोणतीही दखल सामनेवाला यांनी घेतली नाही. सामनेवाला यांनी विनाकारण सुरु केलेली सेवा ताबडतोब बंद न केल्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास झाला आहे म्हणून तक्रारदार याने सामनेवाला यांच्याकडून विनाकारण झालेल्या मानसिक त्रास व मनस्तापापोटी रक्कम रु.10,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु.2,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
सामनेवाला हे मंचात हजर झाले, त्यांनी आपले लेखी निवेदन नि.10 वर दाखल केले आहे. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे ही बाब मान्य आहे. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार यांनी चुकीचा कि वर्ड वापरला त्यामुळे तो सर्वस्वी जबाबदार आहे. असे कथन केले आहे. तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर सामनेवाला यांनी ताबडतोब कार्यवाही करुन सदरील सेवा दि.28.06.2012 रोजी बंद केली व तक्रारदारास रु.45/- दि.02.07.2012 रोजी परत केले. त्यामुळे तक्रारदारास मनस्ताप झाला आहे हे सर्वस्वी चुकीचे आहे. तक्रारदार हा सतत एसएमएस करणे, मोबाईल वापर करणे याला जिम्मेदार असून त्या कृत्यास तक्रारदार स्वतः जिम्मेदार आहे.
सामनेवाला यांच्या कथनेनुसार सर्वोच्च न्यायालय यांच्या न्याय निवाडयाप्रमाणे सदरील तक्रार ही हया मंचास चालविण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारच्या तक्रारी इंडियन टेलिग्राफ कायद्यानुसार आरबिट्रेशन सेक्शन 7(बी) प्रमाणे सामनेवाला यांच्या आरबिट्रेटरकडे चालवावे लागतात त्यामुळे सदरचे प्रकरण मंचास चालविण्याचा अधिकार नाही. सबब तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व सामनेवाला यांचा लेखी जबाब याचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे वकील श्री.धांडे व सामनेवाला यांचे वकील श्री.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. त्यावरुन न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) तक्रारदार यांना सामनेवाला यांनी सेवा
देण्यामध्ये त्रुटी ठेवली आहे काय? होय.
2) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र नि 12 वर दाखल केले आहे. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्यांचा मोबाईल फोन आलेल्या संदेशाची यादी याची छायांकित प्रत नि 5 वर दाखल केली आहे. सामनेवाला यांनी आपले लेखी जबाब नि 11 वर दाखल केले व त्यासोबत दाखल केलेले शपथपत्र नि 12 वर आहे.
तक्रारदार याने दाखल केलेले कागदपत्र व शपथपत्र याचे अवलोकन केले. तक्रारदार हे सामनेवाला यांच्या कंपनीचे मोबाईल सिम कार्ड वापरत होते. सदर सिम कार्डचा नं.9405458615 असा आहे ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहे ही बाब सिध्द होते.
तक्रारदार यांचे वकील श्री.धांडे यांनी युक्तीवाद केली.त्यांनी युक्तीवादात सांगितले की, तक्रारदार हे सदर मोबाईल वापरत असताना सामनेवाला यांच्याकडून तक्रारदाराच्या मोबाईलवर दि.06.04.2012 आणि 09.04.2012 रोजी खालील प्रकारचा संदेश आला. Thanks for subscribing FEVER offer from Handygo at 06/04/2012 02.32 p.m. for Rs.3 valid till 09/04/2012 to unsubschibe send UNSUB FEVER, व तक्रारदाराच्या मोबाईलच्या सिम खात्यातून 3 रुपये प्रमाणे पैसे कपात करण्यात आले. तक्रारदार याने सदर सेवेबाबत सामनेवाला यांना वेळोवेळी सुचना दिली व तोडी तक्रार केली तरी सामनेवाला यांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही व तात्काळ सेवा बंद करावी म्हणून समर्थता दर्शविली नाही म्हणून तक्रारदारास मनस्ताप झाला आहे.
सामनेवाला यांचे वकील श्री.कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला. त्यांनी युक्तीवादात सांगितले की, दि.26.01.12 रोजी सदर सेवा बंद करुन व कपात केलेले पैसे तक्रारदारास परत केले आहे. त्यामुळे तक्रारदारास कोणताही मनस्ताप झाला हे चुकीचे आहे. सामनेवाला यांनी युक्तीवादात सांगितले की, सदर प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडयानुसार हया मंचास प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही. सदर प्रकरण हे इंडियन टेलिग्राफ अक्ट नुसार आरबिट्रेशन सेक्शन 7 (बी)प्रमाणे आरबिट्रेटरकडे चालवावे लागतात. त्याबाबत सामनेवाला यांनी General manager, Telecom v/s Krishnan & Anr. या केसचा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा सादर केला आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व तसेच त्यांच्या वकीलाचे युक्तीवाद व सामनेवाला यांच्या वकीलाचे युक्तीवाद याचे अवलोकन केले. त्यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे काय? हे ठरविणे महत्वाचे आहे.
तक्रारदार हे सामनेवाला कंपनीचे सिम कार्ड वापरत आहे ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहे ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी दाखल केलेले नि 5 ची यादी याचे अवलोकन केले. तर दि.06.04.2012 पासून तक्रारदारास सदर संदेश येत होते व त्या बाबतची तक्रार तक्रारदार यांनी वेळोवेळी सामनेवाला यांच्याकडे केली, तरी सामनेवाला यांनी त्याबाबत कोणतीही अशी योग्य कार्यवाही केली नाही व जी सेवा तक्रारदाराने सुरु केली नाही, ती बंद करण्याची तसदी घेतली नाही. त्यावरुन सामनेवाला यांनी निष्काळजीपणाने तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांच्या वकीलांनी युक्तीवादाच्यासमर्थनार्थ मा.राज्य आयोग सर्कीट बेंच औरंगाबाद यांनी दिलेल्या न्यायनिवाडयाचा हवाला दिला.
MAHARASHTRA STATE CONSRMER DISPUTE REDRESSAL COMMISSION, MUMBAI, CIRCUIT BENCH AT AURANGABAD. FIRST APPEAL NO. 1216/2008 M/s Bhart Sanchar Nigam Ltd V/s Dattatraya Waman Patil
The ratio given in the case of “General Manager, Telecom V/s M.Krishnan and Anr. by the Hon’ble Appex Court, as referred by the appellant’s Ld. Counsel is not applicable to the present case as facts and circumstances are different. The case under citation pertain to dispute about FA/1216/2008 5
The telephone bill whereas the present complaint is about non providing of STD service.
वर नमुद केलेल्या केसमध्ये दिलेल्या निकालाचा विचार केला व या मंचासमोरील केसचा विचार केला असता मा.राज्य आयोगानी दिलेल्या निकालावर सदरील तक्रार आधारीत आहे.
यावरुन मंचाचे असे मत आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी ठेवली आहे. त्यामुळे तक्रारदारास मानस्ताप सहन करावा लागला. त्यासाठी तक्रारदार हे रक्कम रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.500/- मिळण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारास
मनस्तापापोटी रक्कम रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी
रु.500/- निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावे.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष