नि का ल प त्र:- (व्दारा- मा. श्री. शरद डी. मडके, अध्यक्ष) (दि. 31-12-2015)
1) तक्रारदार यांनी वि.प. फयुचर जनरेली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि., यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, ग्राहक सरंक्षण कायदा कलम 1986, कलम-12 अन्वये प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.
2) तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणे आहे.
(अ) तक्रारदार हिचे पती कै. मारुती सिताराम हारणे हे सिरसे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर येथील शेतकरी होते. त्यांचे नावे शेतजमीन होती. सदर जमिनीचा खाते नं. 385 असून 7/12 उता-यावर तशी नोंद आहे. तक्रारदार यांचे पतीचा “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना ”, या योजनेअंतर्गत शासनामार्फत वि.प. कडे विमा उतरवला आहे.
(ब) कै. मारुती सिताराम हारणे हे दि. 24-05-2012 रोजी दुपारी 4 वाजणेचे सुमारास त्यांचे शेताकडे कोल्हापूर-राधानगरी रोडने जात असताना कोल्हापूरहून येणा-या हिरो होंडा मोटरसायकल नं. एम.एच. 09 बी.एन. 8347 ने जोराची धडक दिलेने त्यांचे डावे पायाला जबर जखम होऊन कपाळाला मार लागला होता. त्यानंतर औषधोपचाराकरिता सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर येथे दाखल केले होते. सदर अपघाताची नोंद राधानगरी पोलिस ठाणे यांचेकडे झाली असून हिरो होंडा मोटर सायकलस्वार निलेश चंद्रकांत पाटील, रा. माळयाची शिरोली याचेविरुध्द राधनगरी पोलिस ठाणे यांचेकडे अपघाताचा गुन्हा नोंद आहे. तक्रारदार हिचे मयत पतीना अपघातात झाले जखमांचे सर्टिफिकेट सी.पी.आर. हॉस्पीटल कोल्हापूर यांनी दिले आहे. सी.पी.आर. हॉस्पीटल कोल्हापूर येथून डिसचार्ज घेतलेनंतर त्यांचेवर त्यांची गावी औषधोपचार चालू होते. त्यानंतर दि. 8-07-2012 रोजी मयत झाले आहेत.
(क) सदर घटनेचा खबरी जबाब, घटना स्थळाचा पंचनामा, मयताचा जबाब तक्रारदार यांनी सर्व कागदपत्रे अर्जासोबत दाखल केली आहेत.
(ड) तक्रारदार यांचे पतीचे दि. 8-07-2012 निधन झाल्याने “ शेतकरी अपघात विमा योजने” प्रमाणे तालुका कृषी पर्यवेक्षक, कौलव, ता. राधानगरी, यांचेकडे दि. 13-09-2012 रोजी योग्य त्या कागदपत्रांसह विमा प्रस्ताव दिलेला होता. परंतु कृषि पर्यवेक्षक, कौलव यांनी तक्रारदार हिचेकडे वयाचा पुरावा, मरणोत्तर पंचनामा, तसेच पोस्ट मार्टेम अहवाल ची मागणी केली, परंतु तक्रारदार हिचे पतीचा मृत्यू त्यांचे गावी झालेने तक्रारदार व नातेवाईकास कायदयाचे ज्ञान नसलेने तक्रारदार हिचे पतीचे मृत्यूनंतर पी.एम. व इन्क्वेस्ट पंचनामा केलेला नाही. तक्रारदार यांनी कृषि पर्यवेक्षक यांना कल्पना देऊनही तक्रारदार हिचा प्रस्ताव स्विकारणेस नकार दिला. म्हणून तक्रारदार हिने प्रस्ताव वि.प. कंपनी, कबाल जनरल इन्शुरन्स पुणे तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कोल्हापूर यांना दि. 17-12-2012 रोजी क्लेम फॉर्म भरुन योग्य त्या कागदपत्रांसह पाठविला होता. वि.प. कंपनीस प्रस्ताव मिळूनही तक्रारदारास प्रस्तावाबाबत काहीही कळविले नाही.
(इ) तक्रारदार वि.प. ची ग्राहक असून, वि.प. यांनी तक्रारदारास तात्काळ सेवा देणे बंधनकारक असूनही सेवेत त्रुटी केली आहे.
(ई) तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडून “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने”मार्फत मिळणारी रक्कम रु. 1,00,000/-, व्याज, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाची खर्चाची मागणी केली आहे.
3) वि.प. कंपनीतर्फे दि. 17-01-2015 रोजी तक्रारीस खालीलप्रमाणे म्हणणे दाखल केले आहे.
(अ) तक्रारदाराची तक्रार साफ खोटी, लबाडीची व चुकीची असून, खर्चासह नामंजूर करावी.
(ब) तक्रारदार यांनी तिचे पतीचे अपघाती मृत्यूबाबत विमा क्लेमची रक्कम मिळणेसाठी कृषी अधिकारी, राधानगरी यांचेकडे क्लेम फॉर्म भरुन दिला होता. तथापि, कृषी पर्यवेक्षक, कौलव यांनी तक्रारदार यांनी मयताचे वयाचा पुरावा, मरणोत्तर पंचनामा व पोस्ट मार्टेम रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे सादर केले नसलेने प्रस्ताव स्विकारणेस नकार दिला. तथापि, तक्रारदारांनी सदर प्रस्ताव वि. प. कंपनीकडे स्वत: पाठविला आहे.
(क) महाराष्ट्र शासन, कबाल इन्शुरन्स सर्व्हैअर व वि.प. यांचे दरम्यान कराराप्रमाणे, मयत व्यक्तीचे वारसांनी क्लेम फॉर्म व सर्व कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत छाननी होऊन कबाल इन्शुरन्स सर्व्हेअर यांचेमार्फत विमा कंपनीकडे पाठविले जातात. तक्रारदार यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे क्लेम स्विकारणेस नकार दिलेनंतर जिल्हा कृषी अधिकारी यांचेमार्फत प्रस्ताव पाठविणे योग्य होते.
(ड) तक्रारदार चुकीचे पध्दतीचा अवलंब करुन क्लेम घेऊन पाहत आहे. वि.प. नी तक्रारदारांना देणेचे सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी.
4) तक्रारदाराची तक्रार व सर्व कागदपत्रे, वि.प. यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन करता, खालील मुद्दे विचारात घेता येतात.
मुद्दे उत्तरे
1. वि.प. यांनी तक्रारदार यांना देण्यात
येणा-या सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय
2. तक्रारदार नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत का ? होय
3. काय आदेश ? तक्रार अर्ज अंशत: मंजूर.
का र ण मि मां सा –
5) तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जासोबत एकूण अठरा कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार यांनी दि. 17-12-2012 रोजी वि.प. ना दाखल केलेला अर्ज, क्लेम फॉर्म नं.1 व 2 , क्लेम फॉर्म नं. 1 चे सहपत्र, मारुती सितराम हारणे यांचे शेतजमिनीचा 7/12 चा उतारा, डायरी नं. 575, जमिनीचा खाते उतारा, 8 अ चा उतारा, , 6 क उतारा डायरी, क्लेम फॉर्म, , तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र , तक्रारदार यांचे पतीचा मृत्यूचा दाखला, खबरी जबाब, घटना स्थळाचा पंचनामा, मयताचा जबाब, मयताचे सीपी.आर हॉस्पीटल यांनी दिलेले जखमी सर्टि फिकेट, युरेका डायग्नोस्टीक सेंटर यांचा रिपोर्ट, विमा प्रस्ताव वि.प. कंपनी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडे पाठविलेला प्रस्ताव पोहच पावती इत्यादी कागदपत्रे आपले तक्रारीच्या पुराव्यासाठी दाखल केलेले आहेत.
6) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांचे वतीने अॅड. आर.जी. शेळके व वि.प. तर्फे अॅड.पी.आर. कोळेकर, यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंच्या वतीने लेखी युक्तीवाद व प्रतिज्ञापत्र दाखल केली आहेत. तक्रारदार हिचे पती हे दि. 24-05-2012 रोजी दुपारी 4 वाजणेचे सुमारास कोल्हापूर-राधानगरी रोडने शेताकडे जाताना कोल्हापूरहून येणा-या हिरो होंडा मोटरसायकल नं. एम.एच. 09 बी.एन. 8347 ने जोराची धडक दिलेमुळे त्यांचे डावे पायाला जबर जखम होऊन कपाळाला मार लागला. त्यानंतर औषधोपचाराकरिता सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर येथे दाखल केले होते. सदर अपघाताची नोंद राधानगरी पोलिस ठाणे यांचेकडे झाली असून हिरो होंडा मोटर सायकलस्वार याचेविरुध्द राधनगरी पोलिस ठाणे यांचेकडे अपघाताचा गुन्हा नोंद आहे. तक्रारदार हिचे मयत पतीना अपघातात झाले जखमांचे सर्टिफिकेट सी.पी.आर. हॉस्पीटल कोल्हापूर यांनी दिले आहे. सी.पी.आर. हॉस्पीटल कोल्हापूर येथून डिसचार्ज घेतलेनंतर त्यांचेवर त्यांची गावी औषधोपचार चालू होते. त्यानंतर दि. 8-07-2012 रोजी मयत झाले आहेत. तक्रारदार हे मयत मारुती सिताराम हारणे यांचे वारस असल्याचे प्रमाणपत्रावरुन सिध्द होते व मयत मारुती सिताराम हारणे यांचा अपघाताने मृत्यू झाला हे सिध्द होते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या संपूर्ण कागदपत्रांचे अवलोकन करता, त्यांनी तक्रारीतील मजकूर पुराव्यानिशी सिध्द केला आहे असे स्पष्ट दिसून येते.
7) वि.प. यांचे अॅडव्होकेट यांनी आपल्या लेखी व तोंडी युक्तीवादामध्ये तक्रारदार यांनी क्लेम दाखल करतांना करारानुसार जे बंधन घातले आहे त्याचे पालन केले नसल्याचे म्हटले आहे. तथापि, तालुका कृषी पर्यवेक्षक, कौलव, ता. राधानगरी, यांचेकडे दि. 13-09-2012 रोजी योग्य त्या कागदपत्रांसह विमा प्रस्ताव दिलेला होता. परंतु कृषि पर्यवेक्षक, कौलव यांनी तक्रारदार हिचेकडे वयाचा पुरावा, मरणोत्तर पंचनामा, तसेच पोस्ट मार्टेम अहवाल ची मागणी केली, परंतु तक्रारदार हिचे पतीचा मृत्यू त्यांचे गावी झालेने तक्रारदार हिचे पतीचे मृत्यूनंतर पी.एम. व इन्क्वेस्ट पंचनामा केलेला नाही. तक्रारदार यांनी कृषि पर्यवेक्षक यांना कल्पना देऊनही तक्रारदार हिचा प्रस्ताव स्विकारणेस नकार दिला. म्हणून तक्रारदार हिने प्रस्ताव वि.प. कंपनी, कबाल जनरल इन्शुरन्स पुणे तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कोल्हापूर यांना दि. 17-12-2012 रोजी क्लेम फॉर्म भरुन योग्य त्या कागदपत्रांसह पाठविला होता. वि.प. कंपनीस प्रस्ताव मिळूनही तक्रारदारास प्रस्तावाबाबत काहीही कळविले नाही. सबब, तक्रारदार यांचा अर्ज त्या कारणावरुन नाकारणे संयुक्तिक नाही.
8) तक्रारदार यांनी दि. 13-09-2012 रोजी क्लेम फॉर्म सर्व कागदपत्रासोबत व वि.प. कडे दाखल केला आहे. सदर विमा क्लेम सबंधी वि.प. कंपनीने तत्परतेने निर्णय घेणे न्यायाचे होते. वि.प. विमा कंपनीने योग्य मुदतीत निर्णय न घेणे ही सेवेतील त्रुटी आहे.
9) तक्रारदार यांचे पतीचे निधन दि. 8-07-2012 रोजी झाल्या, तदनंतर अर्ज दि. 13-09-2012 रोजी दाखल केला, पण वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराच्या क्लेम-फॉर्मचा विचार केला नसल्याचे दिसून येते. वि.प. यांनी दि. 13-11-2012 रोजीपर्यंत अर्जाच्या क्लेम फॉर्मच्यासंबंधी निर्णय घेणे उचित होते. वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्याचे दिसून येते.
10) मंचाचे मते, तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जातील मजकूर पुराव्यानिशी सिध्द केला आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना विम्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख ) देणे बंधनकारक आहे. तक्रारदार यांना विम्याच्या रक्कमेवर द.सा.द.शे. 6 % प्रमाणे दि. 13-11-2012 रोजीपासून व्याज मिळणे आवश्यक आहे. तसेच वि.प. विमा यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/-(रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
11) न्यायाचे दृष्टीने मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. सबब, आदेश.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. फयुचर जनरेली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि, यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) द.सा.द.शे. 6 % व्याजाने दि. 13-11-2012 रोजीपासून द्यावेत.
3) वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
4) वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.
5) सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.