श्री. मनोहर चिलबुले, मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक – 15 सप्टेंबर, 2015)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण असे की, वि.प. फिटजी लिमि. ही विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तयारी करुन घेण्यासाठी शिकवणी वर्ग चालविणारी संस्था आहे.
तक्रारकर्त्याचा मुलगा कुमार गौरव 10 व्या वर्गात जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असतांना वि.प.चे प्रतिनीधी सदर शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांनी भविष्यात कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा याबाबत त्यांची संस्था विद्यार्थ्यांची शास्त्रीय पध्दतीने बौध्दीक कुवत (IQ), आवड व गुणवत्तेवर आधारीत योग्य मार्गदर्शन करणार असल्याचा दावा केला. तक्रारकर्त्याचा मुलगा 10 वी उत्तीर्ण झाल्यावर त्याला वि.प.संस्थेत पुढे कोणत्या विषयासाठी त्याने प्रवेश घ्यावा याबाबतच्या मार्गदर्शनासाठी (counseling) पाठविले असता वि.प.ने तक्रारकर्त्याच्या मुलाने 11 वीत सायन्ससाठी प्रवेश घ्यावा आणि IIT-JEE तयारीसाठी वि.प.संस्थेत दोन वर्षाचा इंटेग्रेटेड स्कूल प्रोग्राम लावावा असे सांगितले. तसेच जैन इंटरनॅशनल स्कूल त्यांच्या प्रोग्रामशी संलग्न असल्याने सदर शाळेत सायन्स विषयासाठी प्रवेश घेण्याचा सल्ला दिला.
वि.प.ने तक्रारकर्त्याच्या मुलाची बुध्यांक चाचणी घेऊन दिलेल्या सल्यावर विसंबून मुलाला जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायन्स विषयात, तसेच IIT-JEE च्या प्रींसीपल प्रोग्रामसाठी वि.प. संस्थेत प्रवेश घेतला. त्याचा नोंदणी क्र. 1110491350031 असा होता. प्रत्यक्ष प्रवेश देण्यापूर्वी वि.प.ने दि.12.05.2013 रोजी पुन्हा तक्रारकर्त्याच्या मुलाची चाचणी घेतली. प्रवेशासाठी वि.प.ने तक्रारकर्त्याकडून धनादेश क्र. 554055 व 554056 द्वारे अनुक्रमे रु.1,70,855/- आणि रु.21,100/- असे एकूण रु.1,91,955/- दि.06.06.2013 रोजी घेतले. सदर रकमेशिवाय उर्वरित फीच्या सुरक्षेसाठी वि.प.ने तक्रारकर्त्याकडून धनादेश क्र. 000890 आणि 000891 अनुक्रमे रु.77,736/- आणि रु.14,100/- घेतले. सदर प्रवेशाचे वेळी वि.प.ने तक्रारकर्त्याकडून काही फोटो आणि को-या फॉर्मसवर सह्या घेतल्या व ते नंतर भरुन घेऊ असे सांगितले.
वि.प.ने शिकवणी वर्ग दि. 10 जून, 2014 रोजी सुरु केले आणि तक्रारकर्त्याच्या मुलास काही पुस्तके स्टडी मटेरीयल म्हणून दिले. तक्रारकर्त्याचा मुलगा केवळ 5 दिवस शिकवणी वर्गास गेला. परंतू वर्गातून परत येत असतांना मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व थकलेला दिसत होता. तक्रारकर्त्याने चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याला सदर विषयाचे मुळीच आकलन होत नाही आणि सायंस विषय शिकण्यात आवड वाटत नाही. तक्रारकर्त्याने वि.प.च्या प्रतिनीधींची भेट घेतली आणि त्यांना वस्तूस्थिती समजाऊन सांगितली. त्यानंतर तक्रारकर्त्याच्या मुलास पुन्हा मार्गदर्शन करण्याचा (Re counseling) सल्ला दिला. त्याप्रमाणे वि.प. आणि जैन इंटरनॅशनल स्कूलचे प्रतिनीधीचे हजेरीत रिकौंसिलींग करण्यात आले आणि वि.प.ने त्यांचा पुर्वीचा सल्ला परत घेऊन तक्रारकर्त्याचे मुलाचे नाव सायन्स विद्याशाखेतून काढून कॉमर्स विद्याशाखेत टाकण्याचा सल्ला दिला, कारण इंजिनियरींग हा विषय मुलाच्या आवडीचा नव्हता आणि सदर विषयात भविष्यातही त्याची प्रगती होण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने त्याचे भविष्यात नुकसान होण्याची शक्यता होती.
वि.प. आणि जैन इंटरनॅशनल स्कूल ऑथारीटीसोबत विचार विनिमय करुन तक्रारकर्त्याच्या मुलाचे नाव सायंसमधून काढून कॉमर्स विद्याशाखेत टाकण्यात आले. तक्रारकर्त्याने त्याच्या मुलास कॉमर्स विद्याशाखेत संबंधित विषयात कोचिंग द्यावे म्हणून वि.प.कडे विनंती केली असता श्री. डेविड जे नागपूर केंद्राचे प्रमुख आहेत, त्यांनी कॉमर्स विद्याशाखेच्या शिकवणीसाठी त्यांच्याकडे सोय नसल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारकर्त्याने वि.प.कडे घेतलेली फी परत करण्याची मागणी केली. वि.प.च्या प्रतिनीधींने त्याबाबत मुख्य कार्यालयाशी चर्चा करुन रु.1,91,955/- परत करण्याचे आश्वासन दिले. परंतू त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा करुनही पैसे परत केले नाही. म्हणून दि.01.07.2013 रोजी नोटीस पाठविली, ती वि.प.ला 04.07.2013 रोजी मिळाली. वि.प.ने दि.29.07.2013 रोजी वकिलामार्फत नोटीसला उत्तर दिले आणि कळविले की, तक्रारकर्त्याने शिकवणी वर्गास प्रवेश घेतांना दिलेल्या डिक्लेरेशनप्रमाणे ते भरलेली फीची रक्कम मिळण्यास पात्र नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदरची तक्रार दाखल केली असून त्यात खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.
1) वि.प.कडे भरलेली फी रु.1,91,155/- परत मिळावी.
2) सदर रकमेवर मे 2013 पासून 18 टक्के व्याजाप्रमाणे रु.30,000/- मिळावे.
3) कार्यवाहीच्या खर्चाबाबत रु.20,000/- मिळावे.
4) मानसिक त्रासाबाबत व वि.प.ने चुकीचा सल्ला दिल्याने भरपाईबाबत रु.1,50,000/- मिळावे.
आपल्या तक्रारीचे पुष्टयर्थ तक्रारकर्त्याने कायदेशीर नोटीस, पोस्टाच्या पावत्या व पोचपावती, नोटीसला मिळालेले उत्तर, इनरोलमेंट फॉर्मची प्रत आणि वि.प.इंस्टीटयुटचे उत्तर यांच्या प्रती सादर केलेल्या आहेत.
2. मंचाकडून वि.प.ला नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आला. सदरचा नोटीस वि.प.ला मिळाल्यानंतरही वि.प. मंचासमोर हजर झाले नाही आणि तक्रारकर्त्याचे शपथपत्रावरील कथन नाकारले नाही. म्हणून सदर प्रकरणी त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
3. प्रकरणाच्या निर्णितीसाठी खालिल मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले, त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहे काय ? अंशतः.
3) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
4. मुद्दा क्र. 1 बाबत – सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने वि.प.कडे मुलाच्या प्रवेशाकरीता धनादेश क्र. 554055 व 554056 द्वारे अनुक्रमे रु.1,70,855/- आणि रु.21,100/- असे एकूण रु.1,91,955/- दि.06.06.2013 रोजी भरल्याबाबत एनरोलमेंट फॉर्ममध्ये नोंद आहे. तक्रारकर्त्याकडून घेतलेल्या वरील धनादेशाची रक्कम मिळाली नाही असे वि.प.चे म्हणणे नाही. सदर एनरोलमेंट फॉर्म दस्तऐवज क्र. 4 वर आहे. दस्तऐवज क्र. 1 प्रमाणे तक्रारकर्त्याने मुलाच्या 11 वीतील प्रवेशाकरीता जैन इंटरनॅशनल स्कूल यांचेकडे दि.01.06.2013 रोजी रु.1,17,000/- आणि दस्तऐवज क्र. 2 प्रमाणे दि.08.06.2013 रोजी पुस्तक आणि स्टेशनरीसाठी रु.1,975/- भरणा केल्याची पावती दाखल केली आहे. याशिवाय, तक्रारकर्त्याचे मुलाने वि.प.च्या सल्यावरुन सायंन्स सोडून कॉमर्समध्ये 11 वीत प्रवेश घेतल्याबाबत पहिल्या आणि दुस-या टर्मची जैन इंटरनॅशनल स्कूलची मार्कशिट अनुक्रमे दस्तवेज क्र. 3 व 4 वर दाखल केली आहे. वि.प.ने तक्रारीतील तक्रारकर्त्याच्या शपथपत्रावरील कथन नाकारलेले नाही. त्यामुळे वि.प.ने तक्रारकर्त्याच्या मुलाचा बुध्यांक आणि त्याचा कोणत्या विषयाकडे कल आहे, याबाबत चाचणी घेऊन त्यास सायंस विद्याशाखेत प्रवेश घेण्याचा, तसेच IIT आणि JEE च्या प्रवेशासाठी तयारी करण्याकरीता FIITJEE संस्थेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिला आणि त्यावर विसंबून तक्रारकर्त्याने वि.प.च्या FIITJEE संस्थेत IIT आणि JEE च्या प्रवेशाच्या तयारीसाठी प्रवेश घेतला. परंतू प्रत्यक्षात तक्रारकर्त्याच्या मुलाचा कल इंजिनियरींगकडे नसल्याने आणि त्याला सायंन्स विद्याशाखेत शिक्षण घेण्यात रस नसल्याने, सदरचा अभ्यासक्रम त्याला झेपत नव्हता म्हणून वि.प.ने कॉमर्स शाखेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिला व त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने त्याच्या मुलास सायंस शाखेतून काढून कॉमर्स शाखेत प्रवेश दिला हे तक्रारकर्त्याचे म्हणणे खोटे ठरविण्यासाठी कोणतेही कारण दिसत नाही. वि.प.ने प्रथम तक्रारकर्त्याच्या मुलास सायंस शाखेत प्रवेश देण्याबाबत मार्गदर्शन केले व त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने मुलासाठी जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये 11 वी सायंसला प्रवेश घेतला. तसेच वि.प.कडे रु.1,91,955/- भरुन IIT आणि JEE च्या तयारीसाठी प्रवेश घेतला, परंतू सदर अभ्यासक्रम तक्रारकर्त्याच्या मुलास झेपत नसल्याचे कारण लक्षात घेऊन वि.प.ने त्यास कॉमर्स शाखेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. तक्रारकर्त्याने त्याच्या मुलास कॉमर्स शाखेत शिकवणी देण्यासाठी वि.प.ला विनंती केली, परंतू त्याच्याकडे कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यासाठी शिकवणीची सोय उपलब्ध नसल्याने तक्रारकर्त्याच्या मुलास कोणतीही शिकवणी दिली नसतांना तक्रारकर्त्याकडून घेतलेले पैसे तक्रारकर्त्याने मागणी करुन तसेच वकिलामार्फत नोटीस पाठवूनही परत केले नाही. प्रत्यक्षात वि.प.ने तक्रारकर्त्यास शिकवणीची कोणतीही सेवा पुरविली नसून तक्रारकर्त्याच्या मुलाचा बुध्यांक व विषयातील रस सायंसकडे नसतांना त्यास सायंसमध्ये प्रवेश घेण्यासाठी चुकीचा सल्ला देऊन आपल्या संस्थेत IIT आणि JEE च्या प्रवेशासाठी तयारी करण्याकरीता शिकवणी वर्गास प्रवेश घेण्यासाठी तक्रारकर्त्याला प्रवृत्त केले आणि तक्रारकर्त्याचा मुलगा सदर अभ्यासक्रमास प्रतिसाद देत नसल्याने नंतर त्यास कॉमर्स शाखेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तक्रारकर्त्याचा मुलगा वि.प.च्या शिकवणी वर्गाचा कोणताही लाभ घेऊ शकला नाही म्हणून तक्रारकर्ता वि.प.कडे भरलेली फीची रक्कम परत मिळण्यास पात्र असतांनादेखील तक्रारकर्त्यास ती परत न करणे ही निश्चितच सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – सदर प्रकरणात वि.प.च्या सल्याप्रमाणे तक्रारकर्त्याने वि.प.कडे मुलाच्या शिकवणीसाठी रु.1,91,955/- भरलेले असून पुढे वि.प.चा सल्ला अयोग्य असल्याचे निष्पन्न झाल्याने मुलाला कॉमर्स शाखेत प्रवेश द्यावा लागला. त्यामुळे शिकवणी वर्गाचा लाभ तक्रारकर्त्याचा मुलगा घेऊ शकला नाही. म्हणून तक्रारकर्ता वि.प.कडे भरलेली फीची रक्कम रु.1,91,955/- परत मिळण्यास पात्र आहे. तसेच सदर रकमेवर वि.प.ने दि.29.07.2013 रोजी दस्तऐवज क्र. 3 प्रमाणे उत्तर देऊन ती परत करण्याचे नाकारल्यापासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. याशिवाय, शारिरीक व मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई रु.5,000/- अाणि तक्रारीचा खर्च रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार वि.प. विरुध्द खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1) वि.प.ला आदेश देण्यात येतो की, त्याने तक्रारकर्त्याला फीची रक्कम रु.1,91,955/- परत करावी. तसेच सदर रकमेवर वि.प.ने दि.29.07.2013 पासून दस्तऐवज क्र. 3 प्रमाणे उत्तर देऊन ती परत करण्याचे नाकारल्यापासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने परत करावी.
2) वि.प.ने तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई रु.5,000/- अाणि तक्रारीचा खर्च रु.3,000/- द्यावे.
3) विरुध्द पक्षाने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासून 1 महिन्याचे आंत करावी.
4) उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
5) तक्रारकर्त्यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.