जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 334/2011.
तक्रार दाखल दिनांक : 25/07/2011.
तक्रार आदेश दिनांक : 19/06/2014. निकाल कालावधी: 02 वर्षे 10 महिने 25 दिवस
(1) सुभाष परशुराम जाधव, वय 60 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. वडशिंगे, ता. माढा.
(2) सौ. गोदावरी सुभाष जाधव, वय 55 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. वरीलप्रमाणे.
(3) राणी संतोष जाधव, वय 27 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. वरीलप्रमाणे.
(4) युवराज संतोष जाधव, वय 10 वर्षे, व्यवसाय : शिक्षण,
रा. वरीलप्रमाणे, अ.पा.क. तक्रारदार क्र.3.
(5) अविराज संतोष जाधव, वय 6 वर्षे, व्यवसाय : शिक्षण,
रा. वरीलप्रमाणे, अ.पा.क. तक्रारदार क्र.3.
तक्रारदार
विरुध्द
(1) कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण
कंपनी लिमिटेड विभाग, बार्शी, जि. सोलापूर.
(2) सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
लिमिटेड, उपविभाग, कुर्डूवाडी ग्रामीण, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
श्री. ओंकारसिंह जी. पाटील, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : यु.डी. फरतडे
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : एस.एस. कालेकर
आदेश
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य यांचे द्वारा :-
1. विरुध्द पक्ष यांच्या निष्काळजीपणा व त्रुटीयुक्त सेवेमुळे संतोष सुभाष जाधव यांचा मृत्यू झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळविण्यासाठी तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार मंचापुढे दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, तक्रारदार क्र.1 व 2 हे मयत संतोष सुभाष जाधव यांचे अनुक्रमे वडील व आई असून तक्रारदार क्र.3 पत्नी व तक्रारदार क्र.4 व 5 हे मुले आहेत. तक्रारदार यांची मौजे वडशिंगे, ता.माढा येथे गट नं. 459 वडिलोपार्जित अविभक्त हिंदु कुटूंबाच्या मालकीची शेतजमीन आहे. त्या शेतजमिनीतील विहिरीकरिता विरुध्द पक्ष यांच्याकडून वीज जोडणी घेतलेली असून ग्राहक क्र.343420005843 आहे. दि.14/6/2010 रोजी सकाळी मयत संतोष सुभाष जाधव हे शेतातील ऊस पिकास पाणी देत असताना शेतजमिनीतील खांबावरील विद्युत तार तुटून संतोष यांच्या अंगावर पडली. प्रस्तुत घटनेमुळे मयत संतोष सुभाष जाधव हे गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्व त्यांचा मृत्यू झाला. पोलीस स्टेशन, माढा येथे घटनेची अ.मयत नं. 19/10 प्रमाणे नोंद झालेली असून इन्क्वेस्ट पंचनामा व घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. तसेच मयत संतोष सुभाष जाधव यांचे शवविच्छेदन करण्यात आलेले असून त्यामध्ये विद्युत धक्क्यामुळे मृत्यू झाल्याचे कारण नमूद आहे. तक्रारदार यांनी विद्युत निरीक्षक, सोलापूर यांना कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन व जबाब घेऊन मयत संतोष सुभाष जाधव यांच्या प्राणांतिक अपघाताकरिता विरुध्द पक्ष यांना जबाबदार ठरविले आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे नुकसान भरपाई मिळण्याकरिता प्रयत्न केले असता दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.18,00,000/- नुकसान भरपाई व्याजासह मिळावी आणि शारीरिक व मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.
3. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत आणि त्यांच्यामध्ये ‘ग्राहक’ व ‘सेवा पुरवठादार’ असे नाते नाही. मयत संतोष सुभाष जाधव यांचा मृत्यू एल.टी. विद्युत तार अंगावर पडून झाल्याचे कथन विरुध्द पक्ष यांनी अमान्य केले आहे. घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा व शवविच्छेदन अहवालाबाबत विरुध्द पक्ष यांना माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी विद्युत निरीक्षकांचा अहवाल अमान्य केला आहे. तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नसल्याचे कथन करुन शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच उभय विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारीतील वाद निवारनार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत काय ? होय.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिल्याचे सिध्द होते काय ? होय.
3. तक्रारदार नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
4. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
5. मुद्दा क्र. 1 :- तक्रारदार क्र.1 यांचे नांवे विरुध्द पक्ष यांच्याकडून शेतजमिनीतील विद्युत पंपाकरिता ग्राहक क्र.34342005843 अन्वये वीज पुरवठा घेण्यात आल्याचे कथन विरुध्द पक्ष यांनी अमान्य केलेले नाही. तक्रारदार क्र.1 यांचे नांवे 7/12 उतारा दाखल करण्यात आला आहे आणि वीज आकार देयकावर तक्रारदार क्र.1 यांचे नांव आहे. प्रामुख्याने, विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत आणि त्यांच्यामध्ये ‘ग्राहक’ व ‘सेवा पुरवठादार’ असे नाते नसल्याचा आक्षेप नोंदविला आहे. परंतु तक्रारदार यांच्या कथनाप्रमाणे गट नं. 459 ही तक्रारदार यांची संयुक्त वाडवडिलोपार्जित व अविभक्त हिंदु कुटुंबाचे मालकीची शेतजमीन असून मयत संतोष सुभाष जाधव यांचाही शेतजमिनीमध्ये अविभक्त हिस्सा असल्याचे नमूद केले आहे. प्रस्तुत कथनाची दखल घेता, ज्या शेतजमिनीकरिता विरुध्द पक्ष यांच्याकडून वीज पुरवठा घेण्यात आलेला आहे, त्या शेतजमिनीमध्ये मयत संतोष सुभाष जाधव यांचा हिस्सा असल्यामुळे वीज पुरवठयाचा वापर मयत संतोष सुभाष जाधव यांनाही लागू होतो. केवळ वीज जोडणी तक्रारदार क्र.1 यांच्या नांवे असली तरी कुटुंबातील इतर व्यक्ती विद्युत वितरण कंपनीचे ग्राहक होऊ शकत नाहीत, हे मान्य करता येणार नाही. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2 (1) (डी) असे स्पष्ट करते की,
(d) "consumer" means any person who—
(ii) hires or avails of any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who 'hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person but does not include a person who avails of such services for any commercial purposes;
Explanation.— For the purposes of this clause, “commercial purpose” does not include use by a person of goods bought and used by him and services availed by him exclusively for the purposes of earning his livelihood by means of self-employment;
6. वरील तरतुदीनुसार वस्तु किंवा सेवा घेणारा व्यक्ती ग्राहक ठरतो. त्याचप्रमाणे वस्तु किंवा सेवा घेणारा व्यक्ती लाभार्थी असल्यास तोही 'ग्राहक' संज्ञेत येतो. प्रस्तुत तक्रारीमध्ये मयत संतोष सुभाष जाधव यांचे नांवे वीज जोडणी देण्यात आलेली नसली तरी संपुर्ण कुटुंबाचा कायदेशीर हक्क असलेल्या व एकत्रित कुटुंबाच्या वापरातील शेतजमीन क्षेत्रामध्ये असलेल्या विद्युत पंपाकरिता तक्रारदार क्र.1 यांचे नांवे वीज पुरवठा घेण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने मयत संतोष सुभाष जाधव हे 'ग्राहक' संज्ञेत येतात, या मतास आम्ही आलो आहोत. वरील विवेचनारुन आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
7. मुद्दा क्र. 2 ते 4 :- तक्रारदार यांच्या कथनानुसार दि.14/6/2010 रोजी सकाळी मयत संतोष सुभाष जाधव हे शेतातील ऊस पिकास पाणी देत असताना शेतजमिनीतील खांबावरील विद्युत तार तुटून संतोष यांच्या अंगावर पडली आणि प्रस्तुत घटनेमुळे मयत संतोष सुभाष जाधव यांचा मृत्यू झाला आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत घटना, पोलीस अहवाल व विद्युत निरीक्षकांचा अहवाल अमान्य केला असून मयत संतोष यांच्या मृत्यूची बाब सिध्द होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. वास्तविक पाहता, विरुध्द पक्ष यांनी मयत संतोष सुभाष जाधव यांच्या मृत्यूनंतर निश्चित काय कार्यवाही केली ? याचा कोणताही ऊहापोह किंवा उल्लेख लेखी म्हणण्यामध्ये केलेला नाही किंवा त्याप्रमाणे कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. अभिलेखावर दाखल पोलीस पंचनाम्याचे अवलोकन करता, शेतातील खांबावरील विद्युत तारेची अर्थिंग तार तुटून मयत संतोष सुभाष जाधव यांच्या अंगावर पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. प्रस्तुत पंचनाम्याची दखल घेतली असता, विद्युत तार तुटूल्याची घटना सिध्द होते. त्याशिवाय सहायक अभियंता, म.रा.वि.वि.कं.लि., उपविभाग कुर्डूवाडी यांनी कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.लि., बार्शी विभाग यांना पाठविलेल्या पत्रामध्ये खालीलप्रमाणे अभिप्राय नमूद केला आहे.
सदर आपघात दि.14/6/2010 रोजी झाला आहे. यापूर्वी 1621 दि.16/6/2010 रोजी जो अहवाल दिला आहे, त्यामध्ये त्यावेळी वातावरणाची परिस्थितीची माहिती दिली आहे. तसेच कशाप्रकारे अपघात झाला याचे कारणमिमांसा केली आहे. सदर अपघात हा एल.टी. लाईनची न्युट्रल वायर तुटली व ती गार्डलुपला अडकून गार्डलुप हा चालू लाईनच्या फेजला चिकटला व न्युट्रलची वायर विद्युत प्रवाहीत झाली. तसेच शा.का. चे श्री. अवताडे यांच्या जबाबावरुन सदर बॉक्समधला फ्यूज गेला नसल्याचे नमूद केले आहे. या सर्वाचा परिणाम हा मयत संतोष जाधव यास विद्युत करंट बसला असल्याने अपघात होऊन मयत झाला असावा, असे दिसते.
8. मयत संतोष सुभाष जाधव यांच्या प्राणांतिक विद्युत दुर्घटनेबाबत विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, सोलापूर यांनी चौकशी केली असून त्यांनी असे निरीक्षण नोंदविले आहे की,
नोंदविलेले जबाब, घटनास्थळाची केलेली प्रत्यक्ष पाहणी व चौकशी यावरुन असे निदर्शनास येते की, दि.14/6/2010 रोजी श्री. पांडुरंग सुभाष जाधव यांचे शेतातील ऊसात म.रा.वि.वि.कं.लि. ची एल.टी. वायरची न्युट्रल वायर दुस-या व चौथ्या पोलवरुन तुटून पडून तिस-या पोलच्या दोन्ही बाजूस लटकत होती व तिचा गार्ड लूप सर्वात वरील फेजच्या संपर्कात आल्याने विद्युत भारीत झाली होती. मात्र योग्य क्षमतेचे फ्यूज व डी.ओ. नसल्याने ते उडाले नाही व त्यामुळे तुटलेली तार विद्युत भारीत झाली राहिली. मयत श्री. संतोष सुभाष जाधव हे ज्यावेळी पाणी भरण्यासाठी शेतात गेले त्यावेळी व तिच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा शॉक लागून त्यांना प्राणांतिक अपघात झाला.
सदर अपघाताच्या नुकसान भरपाईची जबाबदारी म.रा.वि.वि.कं.लि. यांचेवर आहे.
9. अभिलेखावर दाखल पोलीस घटनास्थळ पंचनाम्यावरुनही विद्युत निरीक्षकांच्या निरीक्षणास पुष्ठी मिळते. तसेच पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मयत संतोष सुभाष जाधव यांचा मृत्यू विद्युत धक्क्यामुळे झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
10. आमच्या मते, विद्युत कायद्यानुसार विद्युत दुर्घटनाची चौकशी करण्याचे अधिकार विद्युत निरिक्षकांना आहेत आणि विद्युत दुर्घटनांची चौकशी करण्यासाठी ते सक्षम व तज्ञ व्यक्ती आहेत. त्यांनी दिलेल्या अभिप्रायामध्ये एल.टी. वायरची न्युट्रल वायर दुस-या व चौथ्या पोलवरुन तुटून पडून तिस-या पोलच्या दोन्ही बाजूस लटकत होती व तिचा गार्ड लूप सर्वात वरील फेजच्या संपर्कात आल्याने विद्युत भारीत झाली होती. मात्र योग्य क्षमतेचे फ्यूज व डी.ओ. नसल्याने ते उडाले नाही व त्यामुळे तुटलेली तार विद्युत भारीत झाली राहिली. मयत संतोष सुभाष जाधव हे ज्यावेळी पाणी भरण्यासाठी शेतात गेले त्यावेळी व तिच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा शॉक लागून त्यांना प्राणांतिक अपघात आणि सदर अपघातास म.रा.वि.वि.कं.लि. जबाबदार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. वरील विवेचनावरुन विद्युत वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच मयत संतोष सुभाष जाधव यांचा मृत्यू झाल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही आलेलो आहोत.
11. प्राणांकीत विद्युत दुर्घटना घडण्यामागे मानवी चुका, निकृष्ठ देखभाल, विद्युत उपकरणांची चूक मांडणी, अप्रशिक्षीत कर्मचारी वर्ग, त्यांच्यातील समन्वय यासह अनेक कारणे असू शकतात. ज्यावेळी तक्रारदार यांच्या शेतातील विद्युत खांबावरील न्युट्रल तार तुटून ती गार्ड लूपला अडकली आणि तो गार्ड लूप विद्युतभारीत तारेशी चिकटला. अशा घटनेमुळे फ्यूज उडला नाही आणि विद्युत प्रवाह संचलीत तार अंगावर पडून मयत संतोष सुभाष जाधव यांचा मृत्यू झालेला आहे. विद्युत वितरण कंपनीने वेळोवेळी देखरेख ठेवून विद्युत तारा व योग्य फ्यूज कार्यान्वित ठेवण्याची योग्य काळजी घेतली असती तर सदरचा प्राणांकीत अपघात घडला नसता, हे स्पष्ट आहे. तक्रारदार यांनी अभिलेखावर दाखल केलेल्या विविध कागदपत्रांवरुन मयत संतोष सुभाष जाधव यांच्या मृत्यूकरिता विरुध्द पक्ष हे जबाबदार असल्याचे सिध्द होते, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
12. प्रस्तुत प्रकरणामध्ये आम्ही मा. राष्ट्रीय आयोगाने ‘अजमेर विद्युत वितरण निगम लि. /विरुध्द/ पार्थू व इतर’, 1 (2013) सी.पी.जे. 159 (एन.सी.) या निवाडयाचा संदर्भ घेऊ इच्छितो. प्रस्तुत निवाडयामध्ये मा. आयोगाने असे निरीक्षण नोंदविलेले आहे की,
Under the Indian Electricity Act and the rules framed thereunder, a supplier of electricity is under a statutory obligation to maintain all of its lines and equipments, etc., in such condition so as to ensure that no one comes into the direct contact of such lines or equipments resulting into mishaps. It is apparent that there were some hanging live wires and the transformer had not been protected against any untoward incident as has happened in the case in hand. Therefore, the petitioner cannot escape from its liability to compensate the respondent.
13. तसेच मा. राष्ट्रीय आयोगाने ‘डिव्हीजनल इंजिनियर, ए.पी.एस.पी.डी.सी.एल. /विरुध्द/ श्रीमती बुजम्मा व इतर’, रिव्हीजन पिटीशन नं.3457/2009 या प्रकरणामध्ये दिलेल्या निवाडयाचा असे न्यायिक तत्व नोंदविले आहे की,
Under these circumstances, we are unable to accept the contention of the counsel for the Petitioners that the responsibility for maintenance of the wire was that of the deceased. Clearly, the Petitioners are service providers, to whom deceased had paid for sanction and installation of the electricity connection including wiring, and it was, therefore, their responsibility to ensure that it was properly maintained and kept in a good condition so that it does not snap.
14. तक्रारीची वस्तुस्थिती, तक्रारीमध्ये उपस्थित विवाद व उपरोक्त न्यायिक तत्वे पाहता, विरुध्द पक्ष यांच्या निष्काळजीपणामुळे व सेवेतील त्रुटीमुळे मयत संतोष सुभाष जाधव यांचा मृत्यू झाल्याचे सिध्द होते. त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांनी त्रुटीयुक्त सेवा दिल्याच्या निर्णयाप्रत आम्ही आलो असून मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
15. प्रामुख्याने, मयत संतोष सुभाष जाधव यांच्या मृत्यूनंतर तक्रारदार यांनी विद्युत वितरण कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी करुनही त्याची दखल घेण्यात आली नाही, असे त्यांचे कथन आहे. मयत संतोष सुभाष जाधव हे व्यवसायाने शेतकरी असण्यासोबत ते वाहन चालकही होते. मृत्यूसमयी त्यांचे वय केवळ 35 वर्षे होते आणि निश्चितच ते घरातील तरुण व कर्ता पुरुष असल्याचे मान्य करावे लागते. मयत संतोष सुभाष जाधव यांच्या मृत्यूमुळे दोन अज्ञान मुलांचे पितृक्षत्र हिरावलेले आहे. तसेच त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, आई व वडील आहेत. मयत संतोष सुभाष जाधव यांच्या मृत्यूमुळे तक्रारदार यांचे कधीही न भरुन येणारे नुकसान झालेले आहे, असे आम्हाला वाटते. अभिलेखावर तक्रारदार क्र.1 यांचे नांवे 7/12 उतारा दाखल आहे. प्रस्तुत 7/12 उता-यावर तक्रारदार क्र.1 यांच्यासह भागवत शंकर जाधव व अजिनाथ भागवत जाधव यांचे संयुक्त नांवे निदर्शनास येतात. एकूण 4 हे. 79 आर. क्षेत्रापैकी अजिनाथ भागवत जाधव यांचे नांवे 0.20 आर. क्षेत्र निर्देशीत होत असले तरी उर्वरीत क्षेत्र तक्रारदार क्र.1 व त्यांचे बंधू भागवत यांचे संयुक्त नांवे दिसते. केवळ नुकसान भरपाई निश्चितीच्या अधीन राहून शेतजमीन क्षेत्राचा आकार व तक्रारीची वस्तुस्थिती पाहता, तक्रारदार क्र.1 व मयत संतोष सुभाष जाधव यांचे नांवे किमान 2 हेक्टर 25 आर. शेतजमीन असणे गृहीत धरावे लागते. शेतजमिनीचे क्षेत्र व वाहन चालविण्याचा व्यवसाय पाहता, योग्य विचाराअंती तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.5,00,000/- मिळविण्यास पात्र ठरतात, या निर्णयाप्रत आलो आहोत.
16. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.5,00,000/- (रुपये पाच लक्ष फक्त) नुकसान भरपाई द्यावी.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.5,000/- द्यावेत.
3. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाच्या करावे.
4. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विहीत मुदतीमध्ये न केल्यास तेथून पुढे देय रक्कम द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने अदा करावी.
5. उभय पक्षकारांना प्रस्तुत आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क उपलब्ध करुन द्यावी.
(श्री. ओंकारसिंह जी. पाटील) (सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी÷)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.