जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 333/2015.
तक्रार दाखल दिनांक : 26/08/2015.
तक्रार आदेश दिनांक : 23/08/2016. निकाल कालावधी: 00 वर्षे 11 महिने 27 दिवस
(1) सौ. सुकुमार गोरोबा शेटे, वय सज्ञान, व्यवसाय : शेती व
घरकाम, रा. कोंड, ता.जि. उस्मानाबाद.
(2) महादेव गोरोबा शेटे, वय सज्ञान, व्यवसाय : नोकरी,
रा. कोंड, ता.जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मार्फत विरुध्द पक्ष
क्र. 1 ते 3 हे कंपनीचे प्रशासकीय व जबाबदारी अधिकारी :-
(1) कार्यकारी अभियंता, म.रा.वि. कंपनी, उस्मानाबाद.
(2) उपकार्यकारी अभियंता, म.रा.वि. कंपनी, तेर.
(3) विद्युत निरीक्षक विभाग, समता नगर, उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एम.एस. घोंगडे
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.बी. देशमुख
विरुध्द पक्ष क्र.3 अनुपस्थित / एकतर्फा
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, मौजे कोंड, ता.जि. उस्मानाबाद येथे त्यांचे गट नं.167 व 172 मध्ये 2 एकर शेतजमीन क्षेत्र आहे. त्यांचा ग्राहक क्र.590300691872 असून ते विरुध्द पक्ष (यापुढे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना ‘विद्युत वितरण कंपनी’ संबोधण्यात येते.) यांचे ग्राहक आहेत. तक्रारकर्ता यांची शेतजमीन बागायत असल्यामुळे त्यांनी सन 2014-2015 मध्ये 2 एकर ऊस पिकाची लागवड केली होती. त्याकरिता त्यांनी मशागत व खते इ. करिता रु.30,000/- खर्च केला होता. त्यांचे ऊस पीक 22 ते 25 कांडयाचे होऊन गाळपासाठी परिपक्व झाले होते. दि.22/5/2014 रोजी तक्रारकर्ता क्र.1 यांच्या क्षेत्रातून गेलेल्या फिडरवर तारेमध्ये स्पार्कींग होऊन त्याच्या ठिणग्या तक्रारकर्ता यांच्या शेतातील ऊस पाचटावर पडून लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण ऊस पीक व ठिबक सिंचन संचासह दोन आंब्याची झाडे जळून गेली. घटनेबाबत तलाठी व पोलीस खात्याने घटनास्थळ पंचनामा केला असून विरुध्द पक्ष क्र.3 यांनीही ऊस जळीत प्रकरणाबद्दल अभिप्राय दिलेला आहे. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी विद्युत वितरण कंपनीकडे नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली असता दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे ऊस पिकाचे नुकसानीकरिता रु.1,00,000/-, ठिबक सिंचन संचाचे नुकसानीकरिता रु.60,000/- व मशागत व खताकरिता रु.40,000/- प्रमाणे एकूण रु.2,00,000/- नुकसान भरपाई व्याजासह मिळावी, अशी विनंती केली आहे.
2. विद्युत वितरण कंपनीने अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील विधाने व मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारकर्ता क्र.1 यांना ‘ग्राहक’ नात्याने त्यांच्याविरुध्द तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी ‘ग्राहक’ असल्याचा पुरावा दिलेला नाही. ते ग्राहकांकडून विद्युत वाहिनी उभारणीकरिता कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नाहीत आणि केवळ विजेचा वापर केलेल्या वीज देयक ग्राहकांकडून घेतात. त्यांनी विद्युत वाहिनीच्या देखभालीकरिता तज्ञ व्यक्तीच्या नियुक्त्या केलेल्या असून ते विद्युत वाहिनीची देखभाल वेळच्यावेळी करीत असतात. तलाठी व पोलीस खात्याने केलेले पंचनामे त्यांच्या परस्पर व तक्रारकर्त्याच्या सांगण्यावरुन केलेले असून अमान्य करण्यात आले आहेत. तसेच विद्युत निरीक्षकांच्या पत्राबाबत त्यांना कळवण्यात आलेले नाही. तक्रारकर्ता यांची नुकसान भरपाईची मागणी खोटी आहे. शेवटी तक्रारकर्ता यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
3. विरुध्द पक्ष क्र.3 यांना जिल्हा मंचाच्या नोटीसची बजावणी झाल्यानंतर ते जिल्हा मंचापुढे अनुपस्थित राहिले. उचित संधी देऊनही त्यांनी विहीत मुदतीमध्ये लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
4. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच विरुध्द पक्ष यांचे विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. तक्रारीमध्ये उपस्थित ग्राहक विवादाचे दृष्टीने
तक्रारकर्ता क्र.1 ह्या ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अन्वये
'ग्राहक' या संज्ञेत येतात काय ? नाही.
2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमीमांसा
5. मुद्दा क्र. 1 :- मौजे कोंड, ता.जि. उस्मानाबाद येथील जमीन गट नं.167 व 172 मधील 2 एकर क्षेत्रावरील तक्रारकर्ता यांचे ऊस पीक, ठिबक सिंचन संच व दोन आंब्याची झाडे विरुध्द पक्ष यांच्या फिडरवरील तारेमध्ये स्पार्कींग होऊन पूर्णत: जळून खाक झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याकरिता प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. विद्युत वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांची वादकथने अमान्य करताना तक्रारकर्ता क्र.1 यांना त्यांनी वीज पुरवठा दिलेला नसल्यामुळे ते ‘ग्राहक’ संज्ञेत येत नाहीत, अशी हरकत घेतली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत 'ग्राहक' या संज्ञेत येतात काय ? या कायदेशीर मुद्याचा विचार होणे न्यायोचित व संयुक्तिक आहे.
6. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2 (1) (डी) मध्ये ‘ग्राहक’ शब्दाची संज्ञा स्पष्ट करण्यात आलेली असून मोबदला देऊन वस्तु किंवा सेवा खरेदी करणारी व्यक्ती ग्राहक ठरते; तसेच ती व्यक्ती व्यवसायिक/व्यापारी हेतूने वस्तु किंवा सेवा खरेदी करत असल्यास 'ग्राहक' संज्ञेत येऊ शकत नाही.
7. तक्रारकर्ता यांच्या वादविषयाचे स्वरुप पाहता, तक्रारीमध्ये त्यांनी ग्राहक क्रमांक 590300691872 नमूद केलेला आहे. त्यापृष्ठयर्थ त्या ग्राहक क्रमांकाचे वीज आकार देयक अभिलेखावर दाखल केलेले असून ते तक्रारकर्ता क्र.2 यांचे नांवे असल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांनी प्रस्तुत तक्रार संयुक्तरित्या दाखल केलेली आहे आणि त्यांचे नांवे असणा-या शेतजमीन क्षेत्राचे स्वतंत्र 7/12 उतारेही अभिलेखावर दाखल केलेले आहेत. त्या उता-याचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांचे नांवे गट क्र. 167 व 172/2 मध्ये शेतजमीन क्षेत्र असल्याचे निदर्शनास येते. तसेच तक्रारकर्ता क्र.2 यांचे नांवे गट क्र. 169, 171 व 565/6 मध्ये शेतजमीन असल्याचे निदर्शनास येते.
8. मुख्य वादविषयाकडे लक्ष वेधले असता अभिलेखावर तलाठी पंचनामा, पोलीस खात्याकडे दिलेला अर्ज, पोलीस खात्याने घेतलेले जबाब, विद्युत वितरण कंपनीकडे दिलेला अर्ज, पोलीस घटनास्थळ पंचनामा, विद्युत निरीक्षकाचे ऊस जळीत घटनेबाबत अभिप्राय दर्शवणारे पत्र व इतर कागदपत्रे दाखल असून त्यांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ती क्र.1 यांचे शेतजमिनीतील ऊस पीक जळाल्याचा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये करण्यात आलेला आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, केवळ तक्रारकर्ती क्र.1 यांच्या शेतजमीन क्षेत्रामध्ये असणारे ऊस पीक जळालेले आहे.
9. विद्युत वितरण कंपनीच्या आक्षेपानंतर तक्रारकर्ता यांनी ते एकत्र कुटुंबाचे घटक आहेत आणि नात्याने ते माता-पुत्र असल्यामुळे ‘ग्राहक’ संज्ञेत येतात, असे सुचवले; पण स्पष्ट असे स्पष्ट निवेदन केले नाही. परंतु निर्विवादपणे तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांच्या शेतजमिनी स्वतंत्र आहेत आणि त्यांचे जमीन गट क्रमांक सुध्दा भिन्न असल्याचे निदर्शनास येते. जरी तक्रारकर्ता हे एकत्र कुटुंबाचे घटक आहेत, असे ग्राह्य धरुन त्यांनी एकत्रितरित्या तक्रार दाखल केलेली असली तरी त्यांचे वाटप झाल्याचे दिसून येत आहे; म्हणून असे कथन अमान्य करावे लागेल. तक्रारकर्ती क्र.1 यांच्या शेतजमीन क्षेत्रामध्ये विद्युत वितरण कंपनीने वीज पुरवठा दिलेला नाही, हे स्पष्ट आहे. त्याशिवाय 7/12 उता-याप्रमाणे तक्रारकर्ती क्र.1 यांच्याकडे पाण्याचे एखादे स्त्रोत असल्याचेही निदर्शनास येत नाही. आमच्या मते तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांचे शेतजमीन क्षेत्र स्वतंत्र आहे. तक्रारकर्ता क्र.2 यांनी पाणी स्त्रोताप्रमाणे त्यांच्या भिन्न गट क्रमांक असणा-या स्वतंत्र शेतजमिनीमध्ये वीज पुरवठा घेतलेला आहे. काही क्षणाकरिता तक्रारकर्ती क्र.1 यांच्या ऊस पिकासाठी पाणी देण्याकरिता त्या वीज पुरवठयाचा वापर केल्याचे ग्राह्य धरले तरी मुख्य वीज जोडणी तक्रारकर्ता क्र.2 यांचे नांवे व त्यांच्याच शेतजमिनीमध्ये दिलेली असल्यामुळे तक्रारकर्ती क्र.1 ह्या ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2 (1) (डी) नुसार 'ग्राहक' संज्ञेत येत नाहीत, असे या जिल्हा मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच ज्या वीज वाहिनीतून ठिणग्या पडल्या, ती 11 के.व्ही. वीज वाहिनी होती. तिच्यामधून ग्राहकाला थेट वीज पुरवठा होत नाही. त्यामुळेही विरुध्द पक्षाची सेवेत त्रुटी म्हणता येणार नाही. तक्रारकर्ता क्र.2 हे विद्युत वितरण कंपनीचे ‘ग्राहक’ असल्याचे निदर्शनास येत असले तरी त्यांच्या शेतजमीन क्षेत्रातील ऊस पीक जळालेले नाही आणि तसा ‘ग्राहक विवाद’ निर्माण झालेला नाही. अंतिमत: इतर मुद्दयांना स्पर्श न करता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयचे अनुषंगाने तक्रारकर्ती क्र.1 ह्या ‘ग्राहक’ संज्ञेत येत नाहीत, या एकमेव कारणास्तव तक्रार रद्द करणे न्यायोचित ठरते. आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश देत आहोत
आदेश
1. तक्रारकर्ता यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चासंबंधी कोणतेही आदेश नाहीत.
3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (सौ. व्ही.जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
(संविक/स्व/28716)