जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 310/2015.
तक्रार दाखल दिनांक : 20/08/2015.
तक्रार आदेश दिनांक : 09/12/2016. निकाल कालावधी: 01 वर्षे 03 महिने 19 दिवस
प्रभाकर भिमराव बनसोडे, वय 48 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. चिवरी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी लि., कार्यालय तुळजापूर.
(2) उपकार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी लि., कार्यालय तुळजापूर.
(3) विद्युत निरीक्षक, समता कॉलनी, उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ : पी.डी. शिंदे
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.बी. देशमुख
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, त्याची चिवरी, ता. तुळजापूर येथे गट नं.449, क्षेत्र 1 हे. 35 आर. शेतजमीन आहे. त्याने सन 2014-15 मध्ये दि.2/1/2015 रोजी त्याने प्रस्तुत शेतजमिनीमध्ये 0 हे. 80 आर. क्षेत्रावर ऊस पिकाची लागवड केली होती. त्या गट नंबरमध्ये खोदलेल्या विहिरीवर त्याचे थोरले बंधू उत्तम भिमराव बनसोडे यांचे नांवे एकत्र कुटुंर्बकर्ता म्हणून वीज कनेक्शन घेतले आहे. त्याचा ग्राहक क्रमांक 593820391978 आहे. तक्रारकर्त्याने त्या विहिरीवरील पाण्यावर ऊस पिकाची लागवड केली होती. गट नं.449 च्या उत्तरेला विरुध्द पक्षाचा डी.पी. आहे. त्या डी.पी. वरुन शेतक-यांच्या मोटारीला विद्युत कनेक्शन दिलेले आहे. तसेच तक्रारकर्त्याचे नांवे असलेल्या गट नं.449 मध्ये असलेल्या जमिनीवरुन इतरत्र विद्युत तारा गेलेल्या आहेत. दि.10/7/2015 रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटाच्या सुमारास विरुध्द पक्ष यांच्या तारेचे घर्षन होऊन ठिणग्या पडल्यामुळे तक्रारकर्त्याचे 80 आर. क्षेत्रावरील ऊस पिकास आग लागून सर्व ऊस पीक जळून खाक झाले. तसेच पिकास पाणी देण्याकरिता अंथरलेले पाईप सुध्दा त्यामध्ये जळून नुकसान झाले. तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. घटनेमध्ये मशागत, खते, बेणे, पाईप, ठिबक सिंचन संच, ऊस उत्पादन असे एकूण रु.1,52,000/- चे नुकसान झाले. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून रु.2,00,000/- नुकसान भरपाई व्याजासह मागणी केलेली आहे.
2. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत कारखान्याची ऊस पिकाची नोंद केल्याची पोहोच, वीज बील भरणा पावती, ऊस वजन पावती, तलाठी पंचनामा, विरुध्द पक्षास दिलेला अर्ज, पोलीस स्टेशनला दिलेला अर्ज, 8-अ उतारा, वर्तमानपत्राचे कात्रण, पाईप खरेदी पावती, ठिबक सिंचन संच खरेदी पावती, तलाठ्याचे ऊस लागवड केल्याचे प्रमाणपत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले आहे. त्यांनी तक्रारीतील विधाने अमान्य केली आहेत. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारकर्त्यास त्यांनी विद्युत पुरवठा दिलेला नसून तो उत्तम भिमराव बनसोडे यांना दिलेला असल्यामुळे तक्रारकर्ता त्यांचा ग्राहक नाही आणि त्या वीज पुरवठयाशी तक्रारकर्त्याचा काहीही संबंध येत नाही. तक्रारकर्त्याचा ऊस खोडवा असल्यामुळे व उन्हाळ्यामुळे त्याची वाढ झालेली नव्हती. तलाठ्याच्या पंचनाम्यामध्ये ऊस विद्युत तारेच्या घर्षनाने ठिणग्या पडून जळाल्याच्या ओळी वेगळ्या लिहिल्या आहेत आणि खोटा पंचनामा केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चौकशी केली असता ऊस नवनाथ भिमराव बनसोडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. घटनेबाबत विद्युत निरीक्षकांनी जबाब घेऊन चौकशी केली. त्यांचे निष्कर्षाप्रमाणे ऊस पिकास आग कशामुळे लागली, याचा बोध होत नाही. तक्रारकर्ता यांचा संपूर्ण ऊस जळाला नसून तो कारखान्यास घातला आहे. शेवटी तक्रार खर्चासह नामंजूर करण्याची विनंती विरुध्द पक्ष यांनी केली आहे.
4. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर नागनाथ बनसोडे यांचा जबाब, कनिष्ठ अभियंता यांचा जबाब व विद्युत निरीक्षकांचा अहवाल इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
5. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
6. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारकर्त्याने म्हटले आहे की, चिवरी येथे त्याची जमीन गट नं.449, क्षेत्र 1 हे. 35 आर. आहे. सदर गट नंबरमध्ये 1 विहीर खोदलेली आहे. मात्र वीज कनेक्शन त्याचा थोरला भाऊ उत्तम यांचे नांवे एकत्र कुटुंबकर्ता म्हणून घेतलेले आहे. विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, सदरहु वीज पुरवठ्याशी तक्रारकर्त्याचा काहीही संबंध नाही. तक्रारकर्त्याने 8-अ चा उतारा हजर केला आहे. मात्र 7/12 उतारा हजर केलेला नाही. तक्रारकर्त्याने मातोश्री शुगर इंडस्ट्रीजकडील दि.2/1/2015 चा ऊस लागण दाखला हजर केलेला आहे. त्याप्रमाणे 60 आर. क्षेत्रावर 2015-16 मध्ये ऊस होता. मात्र तक्रारीत 80 आर. क्षेत्रावर ऊस जळाला, असे म्हटले आहे. तलाठ्याचे दि.27/11/2015 चे प्रमाणपत्राप्रमाणे तक्रारकर्त्याने 2014-15 मध्ये गट नं.449 वर 1 हेक्टर ऊस पिकाची लागवड केली होती. तक्रारकर्त्याने दि.20/4/2012 रोजी ठिबक सिंचन संच घेतल्याची पावती हजर केली असून दि.28/4/2012 रोजी पाईप घेतल्याची पावती हजर केली आहे.
7. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, दि.10/7/2015 रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटाच्या सुमारास शेतावरुन गेलेल्या तारांमध्ये घर्षन होऊन ठिणग्या पडल्यामुळे त्याच्या ऊसाला आग लागली व सर्व ऊस जळून खाक झाला. तसेच पाईप सुध्दा जळून खाक झाले. तलाठी, चिवरी यांनी केलेल्या दि.10/7/2015 चे पंचनाम्याप्रमाणे तकारकर्त्याचा ऊस तारेच्या घर्षनाने ठिणग्या पडून जळाला होता. विद्युत निरीक्षकाच्या दि.16/9/2015 चे अहवालप्रमाणे अपघाताची माहिती उशिरा मिळाल्यामुळे व परिस्थितीजन्य कोणताही पुरावा नसल्यामुळे ऊसाला आग कशाने लागली, याचा निश्चितपणे बोध होत नाही.
8. तक्रारकर्त्याच्या जमिनीमध्ये ऊसाचे पीक असले तरी त्यासाठी पाणी देण्याची काही तरी सोय असणार. तक्रारकर्त्याने आपल्या जमिनीचा 7/12 उतारा हजर न केल्यामुळे त्याची व भावाची जमीन एकत्र आहे की वेगळी आहे, हे कळून येत नाही. मात्र विहीर एकत्रातपासून भावाचे नांवे त्यावर विद्युत पंप बसवलेला असू शकतो.
9. विरुध्द पक्षातर्फे कनिष्ठ अभियंता उटगे याचा जबाब हजर करण्यात आलेला आहे. तयाप्रमाणे नागनाथ भिमराव बनसोडे याच्या गट नं.449 मध्ये शॉटसर्कीटमुळे ऊस जळाल्याच्या घटनेची माहिती दि.30/7/2015 रोजी मिळाली होती. पाहणी केली असता तेथे दीड एकर ऊस अर्धा जळाल्याच्या परिस्थितीत आढळून आला. नागनाथ भिमराव बनसोडे याचा पण नोंदवलेला जबाब हजर केलेला आहे. त्याप्रमाणे दि.28/7/2015 रोजी दुपारी 2.00 वाजता त्याचा अडीच एकर ऊसाचे क्षेत्रात आग लागली होती. विद्युत निरीक्षकाच्या अहवालाप्रमाणे कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नव्हता. सदरचे ऊस जळीत हे नंतरचे ऊस जळीत असल्याचे दिसून येत आहे.
10. तक्रारकर्त्याने दि.11/7/2015 रोजी विरुध्द पक्षाच्या कार्यालयाला आपला ऊस जळाल्याचे कळवल्याचे दिसून येते. पोलीस ठाण्याकडे दि.1/8/2015 रोजी माहिती दिल्याचे दिसते. मात्र विरुध्द पक्षाकडे ताबडतोब कळवले असताना विरुध्द पक्षाने कोणतीही पावले उचलल्याचे दिसून येत नाहीत. विद्युत निरीक्षकाला कळवण्याची तसदी विरुध्द पक्षाने घेतली नाही. जरी तक्रारकर्त्याचा भाऊ उत्तम याने सर्व भावासाठी म्हणून विहिरीवरील पंपासाठी विद्युत पुरवठा घेतला असला तरी तक्रारकर्ता हा लाभधारक होतो. त्याच्या जमिनीतील ऊस तारांतील ठिणग्यामुळे जळाला, हे पंचनाम्यावरुन दिसून येते.
11. तलाठी पंचनाम्याप्रमाणे 2014-15 मध्ये तक्रारकर्त्याने 1 हेक्टर ऊसाची लागवड केली होती. मातोश्री कारखान्याच्या दाखल्याप्रमाणे 60 आर. ऊस लावल्याबद्दल तेथे कळवलेले होते. जयलक्ष्मी कारखान्याच्या दि.2/1/2015 च्या पावतीप्रमाणे 8.024 टन ऊस तक्रारकर्त्याने पुरवलेला होता. तक्रारकर्त्याने म्हटले आहे की, मागील वर्षी त्याने 27 टन ऊस कारखान्याला पुरवला व 20 टन ऊस बेणे म्हणून शेतक-यांना दिले. म्हणेच 47 टन ऊस झालेला होता. त्यानंतर खोडवा ऊस असल्यामुळे उत्पादन कमी होणार. 30 टनाचे उत्पन्न रु.1,800/- प्रति टनाप्रमाणे रु.54,000/- इतके झाले असते. पैकी तक्रारकर्त्यास 50 टक्के रक्कम म्हणजेच रु.27,000/- इतकी जळीत ऊसाकरिता मिळणे आहे, असे म्हणता येईल. जळालेला ऊस कारखान्याला दिल्यास त्याची निम्मी किंमत मिळते. त्यामुळे प्रतिटन रु.900/- नुकसान धरता येईल. एकूण नुकसान रु.27,000/- झाले, असा निष्कर्ष काढता येईल. म्हणून आम्ही मुद्दा नं.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास जळीत ऊसाच्या नुकसान भरपाईकरिता रु.27,000/- द्यावेत.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास या तक्रारीच्या खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(3) प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.