ग्राहक तक्रार क्र. 320/2015
दाखल तारीख : 01/09/2016
निकाल तारीख : 02/03/2017
कालावधी: 0 वर्षे 06 महिने 01 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. बाबुराव पि.तुकाराम जाधव (मयत),
वारस
1-अ कलावती भ्र. बाबुराव जाधव,
वय – 62 वर्षे, धंदा – घरकाम,
रा. चेंडकाळ, ता.उमरगा, जि. उस्मानाबाद.
1-ब अरुणा नागनाथ पौळ,
वय – 40 वर्षे, धंदा – घरकाम,
रा. सदर.
2 वृषीकेत पि. बाबुराव जाधव,
वय – वर्षे, धंदा – शेती,
रा. चेंडकाळ, ता.उमरगा, जि. उस्मानाबाद .तक्रारदार
वि रु ध्द
1. अधिक्षक अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी लि. उस्मानाबाद
2. कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी लि. तुळजापूर,
ता. उमरगा, जि. उस्मानाबाद.
3. उपकार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी लि. उपविभाग उमरगा
ता. उमरगा जि. उस्मानाबाद.
4. कनिष्ठ अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी लि. तुरोरी,
तुरोरी ता. उमरगा जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधिज्ञ : श्री.एम.टी.आपचे.
विरुध्द पक्षकारां तर्फे विधिज्ञ : श्री.व्हि.बी.देशमुख.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा:
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1) तक क्र. 1 व 2 हे मौजे चेंडकाळ ता. उमरगा जि.उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. तक क्र. 2 हे तक क्र. 1 चा मुलगा आहे तक यांचे एकत्र कुटूंब आहे. तक क. 2 यांनी त्यांचे मालकीचे जमीन गट क्र.11 मधील क्षेत्र 1 हे. 16 आर पैकी 1 हे. 00 आर क्षेत्रामध्ये ऊस हे बागायती पिक योग्य काळजी घेऊन घेतले होते व आहेत. दि.05/04/2015 रोजी सांयकाळी 5 ते 5.30 वा. चे सुमारास वा-यामुळे तक क्र.2 यांचे शेताचे वरुन गेलेल्या विद्युत वाहीनीतील तारामध्ये घर्षण होऊन स्पार्किंग होऊन त्याच्या ठिणग्या खाली असणारे शेतातील ऊसाचे पाचटावर पडल्या व त्यामुळे तक क्र. 2 यांचे शेतातील लागवड केलेला संपूर्ण ऊस तसेच सदरील क्षेत्रामध्ये ठेवलले 350 पेंडया, वाडे आणि बोअरचे केसींग पाईप अंदाजे 5 फुट जळुन खाक झाले. सदरील घटनेनंतर तक यांनी विप यांना तसेच पो.स्टे. उमरगा आणि तहसिलदार यांना कल्पना दिली दि.06/04/2015 रोजीचे लेखी अर्जानुसार मा. तहसिलदार, उमरगा यांचे आदेशावरुन मंडळ अधिकारी विभाग मुळज आणि तलाठी सज्जा मळगी यांनी जायमोक्यावर येऊन पंचासमक्ष दि.06/04/2015 रोजी पंचनामा केलेला आहे व सदरील पंचनम्यामध्ये देखील सदरहू घटना ही विजेच्या तारेचे घर्षण होऊन स्पार्कींग च्या ठिणग्या पडल्यामुळे घडलेली असल्याचे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. म्हणून तक यांनी सदर बाब विप यांना नुकसान भरपाईची मागणी केली असता दि.17/08/2015 रोजी विप यांनी नकार दिल्याने तक यांनी सदरची तक्रार दाखल करण्यास भाग पडले. विप यांचे निष्काळजीपणामुळे तक याचे रु.1,80,000/- किंमतीचा ऊस तसेच रक्कम रु.7,000/- चे वाडे आणि रक्कम रु.1,000/- आणि रक्कम रु.1,000/- चे केसिंग जळुन तक यांचे एकूण रक्कम रु.1,88,000/- चे नुकसान झालेले आहे. करता तक यांना विप यांचेकडून वरिल रक्कम द.सा.द.शे 12 टक्के व्याज दराने मिळावी अशी विनंती केली आहे.
2) सदर तक्रारीबाबत विप यांना नोटीस पाठवण्यात आली असता त्यांनी आपले म्हणणे पुढीलप्रमाणे दाखल केले आहे.
तक यांचे कुटुंब एकत्र कुटुंब असून तक यांनी ऊस पीक घेतल्याबाबत विप यांना माहिती नाही तक यांनी ते पुरावे देऊन सिध्द करावे. लाईनच्या ताराचे वा-यामुळे घर्षण होऊन सदरची घटना घडली हे तक चे म्हणणे संपूर्ण खोटे असून तक चे झालेले नुकसान विप यांना मान्य नाही. तक यांच्या अर्जावरून तहसिलदार यांच्या मंडळ अधिकारी मुळज व तलाठीसज्जा मळगी यांनी विद्युत तज्ञ नसतांना तसेच सदरची घटना प्रत्यक्ष पाहिली नसतांना दि.06/04/2015 रोजी पंचनामा करुन विजेच्या तारेचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्याचा पंचनामा खोटा असून विप यांना मान्य नाही. तक यांनी दिलेले नुकसानीबाबतचे अंदाज पुराव्यासह सिध्द करावा. पोलीस पंचनामा दाखल नाही. ठिणग्या पडून ऊस जळाला तर मे. कोर्टात पुराव्याची न्यायीक स्क्रुटीनी होऊ शकत नसल्यामुळे मे. कोर्टात सदरची तक्रार चालवण्याचा अधिकार पोहचत नाही. म्हणून तक यांची तक्रार सिध्द केलेली नसल्याने तक यांची तक्रार खर्चासह खारीज व्हावी अशी विनंती केली आहे.
4) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, विप यांचे म्हणणे व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे तसेच उभयतांचा लेखी व तोंडी युक्तिवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांची उत्तरे त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? नाही.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
4) काय आदेश? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्या क्र.1 :
1) तक ने दाखल केलेली तक्रार ही विप क्र.1, 2 व 3 यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे झालेल्या नुकसानीबाबत आहे. तक ने तो विप चा ग्राहक असल्याबाबत म्हंटले आहे. त्याच्या संदर्भात तक ने विद्युत देयक सादर केलेले आहे. तक ने तक्रार दुरुस्ती केल्या नंतर तक क्र.2 यांना रेकॉर्डवर घेतलेले आहे. अर्थात या संदर्भात विप ने सांगितले आहे की तक हे त्यांचे ग्राहक नाही परंतु कागदपत्रांची पडताळणी केली असता सातबारा वृषीकेत जाधव यांच्या नावावर जमा दिसुन येतो तसेच पीक लागवडीचे प्रमाणपत्रही दिसुन येते या व्यतरिक्त विद्युत देयकही दि.25/06/2016 चे दिसुन येते. या सर्व बाबी तक हा विप चा ग्राहक असल्याबाबत स्पष्टता निर्माण करतात. म्हणून आम्ही मुददा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देतो.
मुद्दा क्र. 2 व 3 :
2) विप च्या म्हणणे नुसार सदरचे झालेले नुकसान हे विप च्या निष्काळजीपणामुळे झालेले नसल्याने झालेल्या नुकसानीस ते जबाबदार नाही. या संदर्भात कागदपत्राची पडताळणी केली असता दि.06/04/2015 रोजी मंडळ अधिकारी विभाग मुळज यांचा पंचनामा तसेच सदरची घटना ही घडलेली असल्याबाबतचे निवेदन तथापि विप यांच्या म्हणण्यानुसार सदर घटनेमध्ये विप चा सहभाग आहे असे म्हणण्याचा अधिकार तलाठी यांचा नसून पंचनामा खोटा आहे तसेच सदर घटनेची पाहणी करण्याचे अधिकारीही संबंधीत अधिका-यास नाही असे विप चे म्हणणे आहे. अशी घटना घडल्यानंतर तत्काळ विद्युत निरिक्षक तसेच संबंधीत पोलीस स्टेशन यांना कळवणे आवश्यक होते मात्र तक यांनी ते केलेले नाही व अश्या घटना घडल्यानंतर वरिल कार्यवाही तक यांनी चार ते पाच महिन्यानंतर केलेली आहे. याचा अर्थ विचाराअंती पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने तक यांनी हे केले या म्हणण्याकडे विप ने लक्ष वेधले तसेच सदरचा ऊस ताबडतोब कारखान्यास दिलेला असल्याने तक चे नुकसान झालेले नाही असा युक्तिवादही केला. तक व विप यांनी आपले म्हणण्याच्या समर्थनार्थ दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता तक ने पोलीस स्टेशन व विद्युत निरिक्षक या दोघांना सदरच्या घटनेबाबत कळविलेले दिसुन येते. पोलीस स्टेशनला तक्रार करण्याचे तक चे कर्तव्य होते ही बाबी खरी आहे कारण ती तपास यंत्रणा आहे. परंतू तक ने विद्युत विभागाला सदरची तक्रार केलेली नाही हे वस्तुस्थिती आहे त्याच बरोबर विद्युत निरिक्षकाला तक ने कळवण्याचे बंधन नाही. विद्युत विभागाला वीज सेवा देणारी शासकीय कार्यालयाला कळवण्याचे बंधन आहे. तथापि असे करण्यास तक चुकला आहे हि बाब खरी आहे. विद्युत विभागाला कळवल्यानंतर विद्युत निरिक्षकाला कळवण्याचे बंधन विद्युत विभागाला आहे. तक ने दाखल केलेली कागदपत्रात तक चा क्षेत्र मालकीचा पुरावा दिसुन येतो त्याच बरोबर पीक लागवडीचे प्रमाणपत्रामध्ये एक हेक्टर ऊस लागवडीची नोंद दिसुन येते परंतु सदरची ऊस लागवड ही केव्हा केली होती. जळीत घटने प्रसंगी ऊसाचे अंदाजे वय काय होते. याचा कोणताही पुरावा सापडून येत नाही. तक ने केलेली तक्रार ही अत्यंत मोघम स्वरुपाची असुन फक्त तलाठयाचा पंचनामा या व्यतरिक्त ऊस उत्पन्नाबाबत व इतरांच्या ऊसाच्या उत्पन्नाबाबत वा इतर कोणताही पुरावा तक ने दाखल केलेला नाही त्याच सोबत विप कडून घेतलेल्या विद्युत पुरवठा तारा हया तक च्या ऊसावरुन जातो याचाही पुरावा दिसुन येत नाही. त्यामुळे साल सन 2015 मध्ये तक ने ऊसाची लागवड केली होती याबाबत स्पष्टता दिसुन येत नाही. पीक लागवडीचे सादर केलेला प्रमाणपत्र हे खरिप पेरणीचा आहे. ते ऊसासारखे बागायती 12 माही पिकासाठी उपयोगी असू शकत नाही. ऊस हे व्यापारी पीक असुन साखर कारखान्याकडे लागवडीची नोंद आवश्यक आहेत. सदरचा ऊस हा सुरुचा होता किंवा खोडवा होता हेही तक्रारीवरुन स्पष्ट होत नाही याचे कारण यापुर्वीचा ऊस गेल्याची नोंद रेकॉर्डवर दिसुन येत नाही आणि जर सुरुचा असेल तर बेणे खरेदीची पावती रेकॉर्डवर दिसुन येत नाही. त्यामुळे विप च्या बचावामध्ये अर्थ असू शकतो व ग्राहक संरक्षण कायद्यानुसार स्वत:ची तक्रार सिध्द करण्याचे तक वर बंधन आहे त्यामुळे विप ने दाखल केलेला वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचा अधिकचा ऊहापोह न करता तक ने त्याची तक्रार सिध्द केली नसल्याने तक्रार रद्द करण्यात येते व खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे दाखल तक्रारीतील मा.सदस्यां करीता असलेले संच तक्रारदाराने परत न्यावेत.
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
.