निकालपत्र :- (दि. 25-08-2015)(द्वारा-श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये वि.प. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि,.यांचेविरुध्द नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांचेविरुध्द नोटीसचा आदेश झाला. वि.प. यांना नोटीसा लागू होऊन हजर होऊन त्यांनी म्हणणे दाखल केले. उभय पक्षकारांतर्फे वकिलांनी युक्तिवाद केला.
2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
तक्रारदार हे तळसंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील रहिवाशी असून त्याठिकाणी वडीलार्जीत शेती व गादया व लोकरीपासून जेन (कारपेट) तयार करणेचा हातव्यवसाय घरासमोरचे मोकळया जागेवर त्यांचे व कुटूंबाचे उदरनिर्वाहासाठी करतात. सदर व्यवसायासाठी आवश्यक असणारे कापूस, लोकर व कापड असे साहित्य तक्रारदार घरामध्ये ठेवतात. तक्रारदाराचे घरामध्ये वि.प. कंपनीचे विद्युत कनेक्शन आहे. सदरचे कनेक्शन नुरमहंमद अकबर नदाफ तक्रारदार यांचे सख्खे भावाचे नावावर आहे. त्याचे येणारे बील वेळचेवेळी तक्रारदार भरीत असतात. सदरचे घराचा राहणेसाठी व व्यवसायाचे साहित्य ठेवणेसाठी उपयोग करत असतात. दि. 3-05-2012 रोजी पहाटे 5 वाजणेचे दरम्यान विद्युत कनेक्शनचे मिटरमधून शॉर्ट सर्कीट होऊन स्पार्कींग झालेमुळे घरामध्ये आग लागून आगीमध्ये तक्रारदाराचे प्रापंचिक साहित, गादी तयार करणचे कापूस, कापड व लोकर तसेच तयार केलेल्या गादया, लोड, तक्ते, कापरेट-जेन असे सर्व साहित्य जळून खाक झाले. त्याची नोंद तक्रारदारांनी वडगाव पोलिस स्टेशनला केलेली आहे. व संपूर्ण पंचनामा गावकामगार तलाठी व मंडल अधिकारी, वठार तर्फ वडगाव यांनी केलेला आहे. तक्रारदारांनी दि. 5-05-2012 रोजी वि.प. चे कोडोली येथील कार्यालयात लेखी तक्रार दिली. त्यानंतर वि.प. चे सहा. विद्युत निरिक्षक यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन घराची पाहणी करुन पंचनामा केलेला आहे व तक्रारदारांनी त्याबाबतची माहिती व पंचनामेचे कागदपत्र मागणी करुनही दिलेली नाहीत. आगीमध्ये तक्रारदारांचे चार लाखापेक्षा जास्त किंमतीचे साहित्य जळून घर भस्मसात झालेले आहे. त्यास वि.प. हे जबाबदार आहेत. तक्रारदारांनी यापुर्वी वि.प. यांचेकडे विद्युत कनेक्शनची पाहणी व पडताळणी करणेची विनंती केलेली होती. त्याकडे वि.प. चे अधिकारी व कर्मचारी यांनी दुर्लक्ष केलेले आहे. सदरचे आगीचे अपघातास वि.प. जबाबदार आहेत. तक्रारदारांना आग विझविणे, नवीन साहित्य जमा करणे, घराचे बांधकाम करणे व पुन्हा व्यवसाय सुरु करणे यासाठी दीड लाख रुपये खर्च झालेला आहे. व्यवसाय सुरु करणेसाठी तक्रारदारांना पन्नास हजार पेक्षा जास्त खर्च झालेला आहे असे एकूण सहा लाख रुपयाचे नुकसान तक्रारदारांना झालेले आहे. तक्रारदारांनी वि.प. कडे वारंवार भेटून नुकसानभरपाईची मागणी करुनसुध्दा वि.प. यांनी नुकसान भरपाई दिलेली नसलेमुळे दि. 12-06-2012 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. वि.प. यांनी कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नाही. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब, तक्रारदारांनी वि.प. कडून रक्कम रु. 6,00,000/- नुकसानभरपाई व मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व तक्रार अर्ज व नोटीसीचा खर्च रक्कम रु. 5,000/- मिळावी म्हणून तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती केली आहे.
3) तक्रारदारांनी तक्रारीसोबत कागदपत्रे दाखल केली आहेत. अ.क्र. 1 कडे तक्रारदार कडे दावा मिळकतीमधील वीज बिल दि. 22-02-2012, अ.क्र.2 कडे ग्रामपंचायत मिळकत नं. 18/3 चा उतारा दि. 2-05-2012, अ.क्र. 3 कडे अग्नीशामक दलाची पावती दि. 7-05-2012, अ.क्र. 4 कडे वि.प. यांचेकडे दिलेला अर्ज दि. 3-05-2012, अ.क्र. 5 कडे पोलिस स्टेशनचा जबाब दि. 3-05-2012, अ. क्र.6 कडे पंचनामा दि. 3-05-2012, अ.क्र. 7 कडे गावकामगार तलाठी यांनी केलेला पंचनामा दि. 3-05-2012, अ.क्र. 8 कडे तक्रारदाराचा नकला मागणी अर्ज दि. 11-05-2012, अ.क्र. 9 कडे तहसिलदार यांचे पत्र दि. 24-05-2012, अ.क्र. 10 कडे नकला मागणी अर्ज दि. 30-07-2012, अ.क्र. 11 व 12 कडे जळीताचे फोटो , अ.क्र. 13 कडे फोटोची पावती दि. 3-05-2012, अ.क्र. 14 कडे नोटीस पाठविलेची पोस्टाची पावती दि. 12-06-2012, अ.क्र. 15 कडे तक्रारदारांनी पाठविलेली नोटीस दि. 12-06-2012, अ.क्र. 16 कडे नोटीस पोहोचलेची पोहच पावती दि. 14-06-2012, अ.क्र. 17 कडे सहा. विद्युत निरिक्षक यांना कागद दिलेची पोहोच दि.18-07-2012, अ.क्र.18 कडे वि.प. ना नोटीस पोहचलेची पोस्टाची पावती दि. 14-06-2012, अ.क्र. 19 कडे प्रॉपर्टी कार्ड उतारा दि. 14-03-2012, अ.क्र. 20 कडे वि.प. यांचेकडे तक्रारदार यांनी दिलेला जबाब दि. 23-07-2012, अ.क्र. 21 कडे तक्रारदाराचे मुलाचा जबाब दि. 23-07-2012, अ.क्र. 22 कडे वि.प. यांनी कागद पोहचलेची दिलेली पोहोच पावती दि. 18-08-2012, अ.क्र. 23 कडे तकारदाराचा तक्रार अर्ज दि. 9-05-2012, अ.क्र. 24 वि.प. कडे रक्कम भरलेची पावती दि. 25-06-2012, अ.क्र.25 कडे वीज बील दि.13-12-2012, अ.क्र. 26 वि.प. कडे दिलेला अर्ज दि. 21-01-2013, अ.क्र. 27 व 28 जळीताची वृत्तपत्रातील बातमी इत्यादी कागदपत्रे व तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच दि. 18-04-2013 रोजी एकूण 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अ.क्र. 1 कडे तक्रारदाराने वि.प. कडे कागद हजर केलेली पावती दि.18-07-2012, अ.क्र. 2 कडे तक्रारदाराने वि.प. कडे दिलेला जबाब दि. 23-07-2012, अ.क्र. 3 कडे तक्रारदाराचे वि.प. कडे दिलेला जबाब दि. 23-07-2012, अ.क्र. 4 कडे वि.प. कडे दिलेला अर्ज दि. 9-05-2012, अ.क्र. 5 कडे जळालेले मिटर बंद करणेसाठी भरलेली रक्कम दि. 25-06-2012, अ.क्र. 6 कडे जळालेल्या मिटरचे आलेले बील दि. 25-06-2012, अ.क्र. 7 वि.प. कडे दिलेला अर्ज दि. 21-01-2013, अ.क्र. 8 व 9 कडे दै.सकाळ व लोकमतमधील बातमी इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच दि. 11-02-2014 रोजी एकूण 4 कागदपत्रे दाखल केली आहेत. अ.क्र. 1 कडे वि.प. कंपनीकडे तक्रारदाराने दिलेला अर्ज दि. 22-02-2009, अ.क्र. 2 कडे वि.प. कंपनीने दिलेली पावती दि.17-12-2009, अ.क्र. 3 वि.प. कंपनीचे बिल दि. 6-12-2009, अ.क्र. 4 कडे प्रॉपर्टी कार्ड उतारा दि. 14-03-2012 तसेच दि. 11-11-2014 रोजी एकूण 11 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अ.क्र. 1 ते 11 कडे तक्रारदाराने माल खरेदी केलेची पावती नं. 293 दि. 11-07-2012, पावती नं. 182 दि. 13-08-2013, पावती नं. 816 दि. 13-08-2013, पावती नं. 504 दि. 12-12-2012, पावती नं. 7025 दि. 21-09-2012, पावती नं. 22141 दि. 17-08-2012, पावती नं. 22288 दि. 29-09-2012, पावती नं. 22329 दि. 10-10-2012, पावती नं. 22407 दि. 25-10-2012, पावती नं. 22669 दि. 14-12-2012, पावती नं. 22744 दि. 29-12-2012 तसेच दि. 11-02-2014 रोजी 4 कागदपत्रे अ.क्र. वि.प. कंपनीकडे तक्रारदाराने दिलेला अर्ज दि. 22-02-2009, अ.क्र. 2 कडे वि.प. कंपनीने दिलेली पावती दि. 17-12-2009, अ.क्र. 3 कडे वि.प. कंपनीचे बील दि. 6-12-2009, अ.क्र. 4 कडे प्रॉपर्टी कार्ड उतारा दि. 14-03-2012 इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4) वि.प. नं. 1 यांनी तक्रारदारांचे तक्रारीस म्हणणे दाखल केले असून तक्रार अर्जातील मजकूर मान्य व कबूल नाही. तक्रारदार ज्या मिळकतीमध्ये राहतात ती मिळकत वि.प. यांचे अधिकारक्षेत्रात येत नाही. तक्रारदाराचे विज कनेक्शन वि.प. चे हद्दीत नाही. तक्रारदार हे तळसंदे गावी राहतात. तक्रारदाराचे विज कनेक्शन संदर्भात तक्रार करावयाची झालेस वि.प.चे ऑफीस कोडोली येथे असून तालुका पन्हाळा आहे. वि.प. नं. 1 चा तालुका शिरोळ आहे. त्यामुळे तक्रारदाराचे विज कनेक्शन संदर्भात वि.प. चा कसलाही संबंध नाही. तक्रारदारांना वि.प. नं. 1 विरुध्द तक्रार करणेस कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदारांनी निव्वळ चुकीच्या माहितीआधारे वि.प. नं. 1 ला पक्षकार करुन आर्थिक व मानसिक त्रास दिलेला असलेमुळे तक्रारदाराकडून रक्कम रु. 5,000/- कॉम्पेनसेटरी कॉस्ट मिळावी. तक्रारदाराचे प्रस्तुतचे नुकसान भरपाईस वि.प. नं. 1 यांना जबाबदार धरता येणार नाही. त्यामुळे वि.प. नं. 1 यांना जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती वि.प. नं. 1 यांनी केली आहे.
5) वि.प. नं. 2 व 3 यांनी तक्रारदारांचे तक्रारीस म्हणणे दाखल केले असून तक्रार अर्जातील मजकूर मान्य व कबूल नाही. तक्रारदारांनी वि.प. कडून घेतलेल्या विज कनेक्शनचा उपयोग त्यांचे व्यवसायाकरिता करतो असे स्पष्टपणे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारदारांची तक्रार ही व्यापारा/व्यवसायाबद्दलची असलेने तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही. तक्रारदारांनी तक्रार अर्जात नमूद केलेली माहिती वि.प. नं. 1 व 2 यांना माहिती नाही. तक्रारदाराचे घरामध्ये कसलेली शॉर्ट सर्किट होवून स्पार्किंग झालेले नाही. तक्रारदारांचा कापूस, लोकर व कापड जळाले याची कोणतीही जबाबदारी वि.प. कंपनीवर येत नाही. जो पंचनामा तक्रारदार म्हणतात तो तक्रारदार यांचे सांगणेवरुन केलेला आहे. तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे शॉर्ट सर्किट होऊन स्पार्किंग झाले असे कोठेही शाबीत होत नाही. तक्रारदाराचे विज कनेक्शनबाबत कधीही कसलीही लेखी स्वरुपात तक्रार केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराचे विज कनेक्शनची वि.प. कंपनीने पडताळणी अगर पाहणी करणेस काहीच कारण नाही. तक्रारदाराचे घरास लागलेली आग, आग विझवणेकामी, नवीन साहित्य जमा करणे, घराचे बांधकाम करणे, पुन्हा व्यवसाय सुरु करणेसाठी तक्रारदार यांना दीड लाख खर्च आला हे खरे नाही. तक्रारदार हे नुकसानभरपाई मागतात ती वि.प. कंपनी देऊ शकत नाहीत. वि.प. कंपनीने तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. त्यामुळे वि.प. हे तक्रारदारास कसलीही नुकसानभरपाई देऊ लागत नाहीत.
वि.प. नं. 2 व 3 त्यांचे म्हणण्यात पुढे नमुद करतात, तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडून त्यांचे तळसंदे येथील घर मिळकतीमध्ये घरगुती वापराकरिता विज कनेक्शन घेतले आहे. सदरचे विज कनेक्शन हे त्यांचे भाऊ नूरमहमद अकबर नदाफ यांचे नावावर आहे. त्यामुळे तक्रारदार हे वि.प. कंपनीचे ग्राहक नाहीत. त्यामुळे तक्रार चालणेस पात्र नाहीत. तक्रारदार हे नमूद पत्त्यावर आपला कापूस व लोकरीपासून गादया तयार करणेचा व्यवसाय करतात असे तक्रार अर्जात नमूद केलेले आहे. तक्रारदारांनी घरगुती कारणाकरिता घेतलेल्या वीज कनेक्शनचा वापर आपल्या व्यवसायाकरिता करत होते हे स्पष्ट होते. घरगुती वीज कनेक्शनचे दर अत्यंत कमी असून व्यापारी किंवा व्यवसायाकरिता असलेल्या विज कनेक्शनचे दर जास्त आहेत. तक्रारदारांनी घरगुती विज कनेक्शनमधून बेकायदेशीरपणे व्यवसायाकरिता व मशिनरीकरिता वीज वापर करुन व्यवसाय केलेला असून वि.प. यांची फसवणूक करुन वि.प. यांचे फार मोठे आर्थिक नुकसान केले आहे. तक्रारदाराने आपले व्यवसायाची कोठेही नोंदणी केलेली नसून व्यवसायाचे शॉप अॅक्टचे लायसन्स घेतलेले नाही. त्याबाबत ग्रामपंचायतीकडे व्यवसायाची कसलीही नोंदणी केलेली नाही. तक्रारदारांचा व्यवसाय हा कायदेशीर नाही. तक्रारदारांची व्यवसायासाठी कोणतीही फी भरलेली नाही व परवानाही घेतलेला नाही. त्यामुळे बेकायदेशीर व्यवसायामध्ये काही नुकसान झालेस ती भरुन देण्याची कायद्यात तरतुद नाही. तक्रारदारांची मिळकत पाहता त्यामध्ये चार लाखाचा कापूस, लोकर, व अन्य सहा लाखाचे साहित्य होते यावर विश्वास ठेवता येणार नाही. तक्रारदारांनी कापसाची खरेदीची बिले, कोणाची किती ऑर्डर होती, किती कापूस शिल्लक राहिला, कापूस कोणत्या मिलमधून आणला याची कसलीही बिले, नोंदी, जमाखर्च, रजि. नोंदी व त्यावर सरकारी टॅक्स इत्यादी बाबतची बिले प्रस्तुत कामी हजर केलेली नाही. त्यामुळे नुकसानीबाबत अॅसेसमेंट करता येणार नाही. तक्रारदाराची तक्रार ही मोघमपणे असलेने चालणेस पात्र नाही. तक्रार अर्जात मागितलेली नुकसान भरपाई देता येणार नाही. तक्रार अर्ज रद्द करणेत यावा.
वि.प. नं. 2 व 3 त्यांचे म्हणण्यात पुढे नमुद करतात, तक्रारदारांनी जे विज कनेक्शन घेतले आहे ते त्यांचे घरासमोर असलेल्या रस्त्याचे पलिकडे उभ्या असलेल्या इलेक्ट्रीक पोलवरुन घेतले आहे. इलेक्ट्रीक पोल व तक्रारदाराचे घर यामध्ये सुमारे 50 फुटाचे अंतर आहे. एखादे वेळेस विजेचा लोड वाढला तर पोलवरील इलेक्ट्रीक संचामधील फयूज जळून पुढील विज प्रवाहामुळे स्पार्कींग झाले तरी त्याची ठिणगी तक्रारदाराचे घरापर्यंत जाणे शक्य नाही. तसेच तक्रारदाराला दिलेली विज कनेक्शनची सर्व्हिस वायर ही तक्रारदाराचे घरापर्यंत आलेली आहे ती सुस्थितीत आहे त्यामुळे पोलवर शॉर्ट सर्किट किंवा स्पार्कींग झाले नाही. तक्रारदाराचे इले. फिटींग व वायरिंग हे सुस्थितीत व चांगले आहे हे पाहणे त्या त्या ग्राहकाची जबाबदारी व कर्तव्य आहे. तक्रारदारांचे हलगर्जीपणामुळे वायरिंग व फिटींग हे सुस्थितीत नसलेने नुकसान झालेले आहे त्याच वि.प. जबाबदार नाहीत. तक्रारदाराचे व्यवसायामध्ये 4 नोकर काम करतात. तक्रारदाराचा व्यवसाय मोठा आहे. तक्रारदार हे आपले घरगुती कारणाकरिता विज कनेक्शनमधून बेकायदेशीरपणे आपले गादया तयार करणेच्या व्यवसायाकरिता बेकायदेशीरपणे वापरीत होते. तक्रारदार हे विज कनेक्शनचा व्यापारी कारणाकरिता करीत होते. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्यात यावी. तक्रारदाराकडून रक्कम रु. 5,000/- कॉम्पेनसेटरी कॉस्ट मिळावी.
6) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, शपथपत्र व वि.प. यांचे म्हणणे व तक्रारदार व वि.प. यांचे वकिलांचा युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी मंचापुढे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
ठेवली आहे काय ? नाही
2. काय आदेश ? तक्रार अर्ज नामंजूर.
वि वे च न
मुद्दा क्र. 1 -
तक्रारदारांची मिळकत तळसंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे असून तक्रारदारांनी त्यांच्या सख्या भावाच्या नावावर विद्युत कनेक्शन वि.प. यांचेकडून घेतले आहे. तसेच वि.प. ही विद्युत पुरवठा करणारी कंपनी आहेत. तक्रारदाराचे घराला आग विद्युत मिटरमध्ये शॉर्ट सर्कीट होऊन घराला आग लागून तक्रारदाराचे नुकसान झाले आहे काय ? तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो ? त्या अनुषंगाने तक्रारदाराने आपली तक्रार शाबीत करण्यासाठी दाखल केलेले कागदपत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदर घटनेची नोंद तक्रारदाराने वडगाव पोलिस स्टेशनला केलेला होती व सदर घटनेचा पंचनामा गावकामगार तलाठी व मंडल अधिकारी वठार तर्फ वडगाव यांनी केलेला आहे. सदर नोंदीची व पंचनाम्याची प्रत प्रस्तुत कामी तक्रारदाराने याकामी दाखल केले आहे. तक्रारदाराने दि. 3-05-2012 रोजी वि.प. चे कोडोली येथील कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली, त्याचप्रमाणे दि. 5-05-2012 रोजी वि.प. तर्फे सहा. विद्युत निरिक्षक यांनी तक्रारदाराचे घराची पाहणी केली होती व पंचनामा केलेला होता. सदर पंचनाम्याची प्रतची मागणी तक्रारदाराने करुन देखील वि.प. यांनी तक्रारदाराना पंचनाम्याची प्रत दिली नाही असे तक्रारदारांनी तक्रारीत कथन केले आहे. सदर आगीत सुमारे 4 लाखाचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती वि.प. यांना प्राप्त झालेनंतर वि.प. कंपनी यांनी नियम 2005 प्रमाणे वि.प. यांनी 48 तासांपूर्वी तक्रारदाराचे घराचे जागेची पाहणी करुन पंचनामा करुन माहिती घेतलेली आहे. सदर पंचनामा वेळेस तक्रारदारांकडून कागदपत्रांची मागणी केली होती, परंतु तक्रारदारांनी कागदपत्रे व खरेदी केलेली बिले दिली नाही. तक्रारदारांना विज कनेक्शनचा पुरवठा तक्रारदाराचे घरासमोर असलेल्या रस्त्याचे पलिकडे उभ्या असलेल्या इलेक्ट्रीक पोलवरुन देण्यात आलेले आहे. इलेक्ट्रीक पोल व तक्रारदारांचे घर यामध्ये सुमारे 50 फुट इतके अंतर आहे. एखादे वेळेस विजेचा लोड (प्रवाह) वाढला तरी पोलवरील विद्युत संचामधील फयुज जळून पुढील विज प्रवाहामुळे स्पार्कींग झाले तरी सदर स्पार्कींगची ठिणगी तक्रारदारांच्या घरापर्यंत जाणे शक्य नाही. तसेच तक्रारदाराला देण्यात आलेले विज कनेक्शनची सर्व्हिस वाय तक्रारदारांचे घरापर्यंतची सर्व्हिस वायर सुस्थितीत आहेत यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदाराचे घराला आग इलेकट्रीक पोलवरील (लोड) प्रवाहामुळे स्पार्कींग झाल्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झालेले नाही. सादर केलेल्या पंचनाम्यात फक्त तक्रारदाराचे मिळकतीमधील वायरिंग जळाले आहे, सर्व्हिस वायर सुस्थितीत आहे. तक्रारदाराचे घरामधील वायरिंगमध्ये दोष असल्यामुळे स्पार्कींग होऊन तक्रारदाराचे घराचे साहित्य जळून नुकसान झाले असलेची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे वि.प. यांना जबाबदार धरता येणार नाही. सर्व कागदपत्राचे अवलोकन केले असता प्रस्तुत कामी तक्रारदाराने कोणताही पुरावा किंवा सरकारमान्य इलेक्ट्रीक सुपरवायझर किंवा तज्ञांचा पुरावा/अहवाल प्रस्तुत कामी दाखल केलेला नाही की, तक्रारदारांच्या घरामधील संपूर्ण वायरिंग हे योग्य दर्जाचे व सुस्थितीत होते. वरील सर्व बाबीचा विचार करता हे मंच या निष्कर्षाप्रत येते की, वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही, म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच नकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2 : वर मुद्दा क्र. 1 मधील विवेचनाचा विचार करता हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत येते.
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. सदर निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.