जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 171/2021. तक्रार दाखल दिनांक : 10/08/2021. तक्रार निर्णय दिनांक : 13/05/2022.
कालावधी : 00 वर्षे 09 महिने 03 दिवस
सारिका तानाजी सूर्यवंशी, वय 34 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. बोरगांव (न.), ता. औसा, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
विभागीय व्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि.,
विभागीय कार्यालय, लोखंडे कॉम्प्लेक्स, पहिला मजला,
सिंध टॉकीजसमोर, सुभाष चौक, लातूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. रणजीत म. लोमटे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. काशिनाथ जी. देशपांडे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांच्या ग्राहक तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप असे की, त्या मयत शेतकरी तानाजी भारत सूर्यवंशी (यापुढे "मयत तानाजी") यांच्या पत्नी आहेत. दि.1/7/2017 रोजी मयत तानाजी ठेच लागून पडले आणि त्यानंतर वैद्यकीय उपचारादरम्यान दि.3/7/2017 रोजी मृत्यू झाला. घटनेसंबंधी पोलीस ठाणे, गांधी चौक, लातूर येथे मृत्यू नोंद क्र.0/17 करण्यात येऊन एम.एल.सी.नं. 1088, दि.3/7/2017 अन्वये कळविल्यानंतर आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली. मयत तानाजी यांचा मरणोत्तर पंचनामा व शवचिकित्सा करण्यात आली. शवचिकित्सा अहवालामध्ये डोक्यास मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण नमूद केले. तसेच पोलीस घटनास्थळ पंचनामा करण्यात येऊन अंतिमत: तालुका दंडाधिकारी, लातूर यांनी दि.25/10/2018 रोजी समरी मंजूर केली.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, मयत तानाजी हे बोरगाव (न.) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., बोरगाव (न.), ता. औसा, जि. लातूर यांचे सभासद होते. जनता अपघात विमा योजनेंतर्गत सहकारी संस्थेने त्यांच्याकरिता रु.150/- विमा हप्ता भरणा केला असून त्यांचा यादीमध्ये सभासद क्रमांक 382 आहे. मयत तानाजी यांच्या अपघाती मृत्यूनंतर तक्रारकर्ती यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर यांच्याकडे विमा प्रस्ताव सादर केला आणि बँकेने तो प्रस्ताव विरुध्द पक्ष यांच्याकडे पाठविला.
(3) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, विरुध्द पक्ष यांनी दि.8/8/2019 रोजीच्या पत्रान्वये विमा दावा नामंजूर केल्याबाबत बँकेस कळविले आणि बँकेने त्याप्रमाणे तक्रारकर्ती यांना कळविले. विरुध्द पक्ष यांनी चूक व काल्पनिक निष्कर्ष काढून तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर केला आणि सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने रु.2,00,000/- विमा रक्कम व्याजासह देण्याचा, मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- देण्याचा व तक्रार खर्चाकरिता रु.25,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केली आहे.
(4) विरुध्द पक्ष यांनी निवेदनपत्र दाखल केले असून ग्राहक तक्रारीतील मजकूर अमान्य केला आहे. त्यांचे कथन आहे की, मयत तानाजी त्यांचे "ग्राहक" नाहीत. तसेच दावा मुदतीमध्ये नाही. कृषि आयुक्त, पुणे यांनी विमा पॉलिसी घेतलेली आहे आणि जायका इन्शुरन्स यांचा त्यामध्ये सहभाग असून त्यांना आवश्यक पक्षकार केले नाही.
(5) विरुध्द पक्ष यांचे पुढे कथन आहे की, पोलीस यंत्रणेशी संगनमत करुन अपघाताची नोंद केलेली आहे. घटनेनंतर 3 दिवसांनी पंचनामा झालेला आहे. संबंधीत डॉक्टरांच्या अहवालानुसार अति मद्य सेवन केल्यामुळे मयत तानाजी पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. ते दैनंदीन मद्य प्राशन करीत असत आणि व्यसनाच्या आहारी गेलेले होते. मद्य प्राशन करुन स्वत:च्या चुकीमुळे रस्त्यावर पडून मृत्यू झाल्यास किंवा आत्महत्या केल्यास त्याकरिता विमा कंपनी जबाबदार नाही. त्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी अधिका-याच्या अहवालामध्ये मयत तानाजी यांचा मृत्यू अति मद्य सेवनामुळे झाल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. अंतिमत: तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वादमुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- विरुध्द पक्ष यांचे प्राथमिक बचाव असे आहेत की, मयत तानाजी त्यांचे "ग्राहक" नाहीत आणि दावा मुदतीमध्ये नाही. तसेच कृषि आयुक्त, पुणे यांनी विमा पॉलिसी घेतलेली असून त्यांना आवश्यक पक्षकार केलेले नाही.
(8) विरुध्द पक्ष यांच्या दि.8/8/2019 रोजीच्या विमा दावा नामंजूर करणा-या पत्राचे अवलोकन केले असता त्यामध्ये मयत तानाजी यांच्या गट जनता वैयक्तिक अपघात दाव्याच्या अनुषंगाने दावा क्रमांक : 144400/47/2018/000009 व पॉलिसी क्र.164400/47/2018/48 असा उल्लेख आढळतो. विरुध्द पक्ष यांच्याद्वारे नियुक्त अन्वेषकाच्या अहवालामध्ये दावा क्रमांक : 144400/47/2018/000009 उल्लेख आढळतो. विरुध्द पक्ष यांनीही जनता वैयक्तिक अपघात विमापत्रासंबंधी अटी व शर्तीचे पत्रक दाखल केलेले आहे. उक्त कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत तानाजी यांच्या जनता वैयक्तिक अपघात विमा दाव्यासंबंधी विरुध्द पक्ष यांची स्वीकृती / कबुली (Admission) तथ्ये पाहता विरुध्द पक्ष यांनी मयत तानाजी यांना जनता वैयक्तिक अपघात विमापत्राच्या अनुषंगाने विमा संरक्षण दिल्याचे व तक्रारकर्ती यांनी विमा दावा सादर केल्याचे सिध्द होते. विमापत्र किंवा विमा संविदेमध्ये कृषि आयुक्त, पुणे व जयका इन्शुरन्स यांचा सहभाग असल्यासंबंधी उचित कागदपत्रे अभिलेखावर दाखल नाहीत. अशा स्थितीमध्ये मयत तानाजी "ग्राहक" नाहीत आणि कृषि आयुक्त आवश्यक पक्षकार आहेत, हा विरुध्द पक्ष यांचा बचाव तथ्यहीन व निरर्थक ठरतो.
(9) विरुध्द पक्ष यांनी विमा दावा नामंजूर केल्याबाबत दि.8/8/2019 रोजीच्या पत्रान्वये तक्रारकर्ती यांना कळविले आहे. त्यानंतर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांनीही दि.20/8/2019 रोजीच्या पत्राद्वारे दावा नामंजूर केल्याबाबत कळविलेले आहे. जिल्हा आयोगामध्ये प्रस्तुत ग्राहक तक्रार दि.9/8/2021 रोजी दाखल केलेली आहे. अशा स्थितीमध्ये विरुध्द पक्ष यांच्याद्वारे उपस्थित केलेल्या मुदतीच्या मुद्याची दखल घेतली असता विमा दावा नामंजूर करणारे पत्र तक्रारकर्ती यांना कधी प्राप्त झाले, याचा तपशील किंवा पुरावा दिसून येत नाही. तक्रारकर्ती ह्या ग्रामीण भागामध्ये राहत असल्यामुळे डाकेद्वारे एखादे पत्र त्यांच्या पत्त्यावर प्राप्त होण्यास किमान 5 ते 10 दिवसाचा अवधी लागू शकतो. विमा नामंजूर करणा-या पत्रावरील नमूद तारखेनुसार दखल घेतली असता साधारणत: तक्रारकर्ती यांना ते पत्र अनुक्रमे दि.18/8/2019 व बँकेचे पत्र दि.30/8/2019 पर्यंत प्राप्त झाले असावे, असे ग्राह्य धरणे न्यायोचित ठरते. तक्रारकर्ती यांनी दि.9/8/2021 रोजी दाखल केलेली असून उक्त वस्तुस्थितीचा विचार करता प्रस्तुत ग्राहक तक्रार विहीत मुदतीमध्ये आहे, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(10) विमा रक्कम देण्याचे दायित्व अमान्य करताना विरुध्द पक्ष यांचा प्रतिवाद आहे की, तक्रारकर्ती यांनी पोलीस यंत्रणेशी संगनमत करुन अपघाताची नोंद केलेली आहे. मयत तानाजी हे अति मद्य सेवन केल्यामुळे पडून मृत्यू पावले आणि मद्य प्राशन करुन स्वत:च्या चुकीमुळे रस्त्यावर पडून मृत्यू झाल्यास किंवा आत्महत्या केल्यास त्याकरिता विमा कंपनी जबाबदार नाही. तसेच त्यांनी चौकशी अधिका-याच्या अहवालाचाही आधार घेतलेला आहे.
(11) मयत तानाजी यांच्या मृत्यूपश्चात विविध शासकीय यंत्रणेद्वारे घटनास्थळ पंचनामा, मरनोत्तर पंचनामा, शवचिकित्सा अहवाल, पत्रव्यवहार, तालुका कार्यकारी दंडधिकारी यांचा समरी मंजुरीचा आदेश, जबाब नोंदविणे इ. कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केलले आहेत. त्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत तानाजी हे ठेच लागून पडले आणि त्यांच्या डोक्यास इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे निदर्शनास येते. विरुध्द पक्ष यांच्याद्वारे नियुक्त अन्वेषकाच्या अन्वेषण अहवालाचे अवलोकन केले असता मयत तानाजी यांचा मृत्यू अपघाती असल्याचे स्पष्ट मत नोंदविले आहे. परंतु अन्वेषकांनी पोलीस यंत्रणेशी मयताच्या नातेवाईकांनी संगनमत केल्याचे व घटनेचे ठिकाण व तारखेबाबत संशय असल्याचे नमूद केलेले आहे. वास्तविक पाहता, अन्वेषण अहवालाच्या अनुषंगाने योग्य कायदेशीर कार्यवाही करण्याची विरुध्द पक्ष यांना संधी होती. तसेच संबंधीत अन्वेषकांचे प्रतिज्ञापत्र अभिलेखावर दाखल केलेले नाही. त्यामुळे अन्वेषकांनी व्यक्त केलेल्या संशयाचा लाभ विरुध्द पक्ष यांना घेता येणार नाही, असे जिल्हा आयोगाचे स्पष्ट मत आहे.
(12) मयत तानाजी हे अति मद्य सेवनामुळे पडून मृत्यू पावले आणि विमापत्रातील अटी व शर्तीनुसार तक्रारकर्ती यांना विमा रक्कम देण्याचे दायित्व येत नाही, असा विरुध्द पक्ष यांचा प्रतिवाद आहे. विरुध्द पक्ष यांनी आपल्या प्रतिवादापृष्ठयर्थ प्लॅनेट क्रिटीकल केअर सेंटर, लातूर रुग्णालयातील मयत तानाजी यांचे आंतररुग्ण चिकित्सा प्रपत्र व वैद्यकीय नोंदी; तसेच गांधी हॉस्पिटल, लातूर यांचे प्लॅनेट क्रिटीकल केअर सेंटर, लातूर यांच्याकरिता संदर्भ पत्र दाखल केले आहे. त्या कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता History given by relative, Patient is Chronic alcoholic, Non diabetic, Non hypertension. असा उल्लेख आढळून येतो. याचा स्पष्ट अर्थ आहे की, मयत तानाजी यांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय उपचार करणा-या रुग्णालयास जी माहिती दिली; त्याप्रमाणे कागदपत्रांमध्ये उल्लेख करण्यात आला. यदाकदाचित, मयत तानाजी यांना मद्याचे व्यसन होते, असे काही क्षणाकरिता ग्राह्य धरले तरी अपघातसमयी मयत तानाजी यांनी मद्य प्राशन केले होते, हे सिध्द करणारा सबळ वैद्यकीय कागदपत्रे दिसून येत नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे, शवचिकित्सा अहवालामध्ये मयत तानाजी यांच्या पोटामध्ये मद्याचा अंश असल्याचे किंवा त्याचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा जास्त असल्याचा कोणताही उल्लेख आढळून येत नाही. केवळ ऐकीव माहितीच्या आधारे रुग्णाच्या आरोग्याबाबत नोंद झालेली असल्यास उचित पुराव्याअभावी त्या नोंदी ग्राह्य धरता येणार नाहीत. आमच्या मते, मयत तानाजी यांनी अति मद्यपान केल्यामुळे तोल जाऊन पडले आणि जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, असे सिध्द होण्याइतपत पुरावा नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांचा विमा दावा अयोग्य व अनुचित कारणास्तव नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे आणि तक्रारकर्ती ह्या रु.2,00,000/- विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत येत आहोत.
(13) तक्रारकर्ती यांनी विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याज दराने मागणी केलेली आहे. सद्यस्थितीतील व्याज दराचा विचार करता द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देण्याकरिता विरुध्द पक्ष यांना आदेश करणे न्यायोचित राहील, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(14) तक्रारकर्ती यांनी मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.25,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. असे दिसते की, तक्रारकर्ती यांना विमा रक्कम मिळविण्याकरिता पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ती यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना विमा रक्कम न दिल्यामुळे जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले, ही बाब स्पष्ट आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहोत.
(15) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 यांचे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना विमा रक्कम रु.2,00,000/- द्यावी.
तसेच, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रु.2,00,000/- रकमेवर दि. 8/8/2019 पासून संपूर्ण रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
ग्राहक तक्रार क्र.171/2021.
(4) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(5) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/8522)