जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : १९०/२०१८. तक्रार दाखल दिनांक : २०/०६/२०१८.
तक्रार निर्णय दिनांक : १२/०७/२०२१.
कालावधी : ०३ वर्षे ०० महिने २२ दिवस
स्वाती नरसिंग टेकाळे, वय २९ वर्षे, व्यवसाय : घरकाम,
रा. कोलेगांव, पो. ढोराळा, ता. जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ती
विरुध्द
(१) ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि., ३२१/ए/२, ओसवाल बंधू समाज बिल्डींग,
जे.एन. रोड, हॉटेल सेवन लव्हज् समोर, पुणे – ४११ ०४२.
(२) जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि., दुसरा मजला, जयका बिल्डींग,
कमर्शियल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४० ००१.
(३) तालुका कृषि अधिकारी,
तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
मा. श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
मा. श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- अजय दिलीपराव भिसे
विरुध्द पक्ष क्र.१ यांचेकरिता विधिज्ञ :- प्रताप प्रभाकरराव देवळे
विरुध्द पक्ष क्र.२ यांचेकरिता विधिज्ञ :- दिपक एम. परांजपे
आदेश
मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(१) तक्रारकर्ती यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, त्या मयत नरसिंग रावण टेकाळे (यापुढे “मयत नरसिंग”) यांच्या पत्नी आहेत. मयत नरसिंग यांचे नांवे मौजे कोलेगाव, ता. जि. उस्मानाबाद येथे गट क्र.११, क्षेत्र ० हे. ३६ आर.; गट क्र. १६, क्षेत्र ० हे. २६ आर. व गट क्र. २९५, क्षेत्र ० हे. १७ आर. शेतजमीन होती. दि.५/३/२०१७ रोजी मयत नरसिंग हे मोटार सायकलवरुन ढोकी येथून कोलेगाव येथे येत असताना गोरेवाडी पाटीजवळ ट्रकने धडक दिल्यामुळे वाहन अपघातामध्ये मयत नरसिंग यांचा मृत्यू झाला. घटनेबाबत पोलीस ठाणे, ढोकी येथे गु.र. नं. ५३/२०१७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. मयत नरसिंग हे शेतकरी असल्यामुळे व त्यांचा अपघाती मृत्यू असल्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत रु.२,००,०००/- रक्कम मिळण्याकरिता दि.१९/१/२०१८ रोजी विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. परंतु विरुध्द पक्ष क्र.३ यांनी दि.२७/३/२०१८ रोजीच्या पत्रानुसार मृताकडे मोटार सायकल चालविण्याचा वैध परवाना नाही, या कारणास्तव विमा प्रस्ताव नाकारला. विरुध्द पक्ष क्र.१ ते ३ यांनी सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने तक्रारकर्ती यांनी मयत नरसिंग यांच्या विम्याची रक्कम रु.२,००,०००/- तक्रार दाखल तारखेपासून ९ टक्के व्याज दराने देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.१०,०००/- देण्याचा व तक्रार खर्च रु.५,०००/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
(२) विरुध्द पक्ष क्र.१ यांनी दि.१८/९/२०१८ रोजी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे कथन आहे की, तक्रारकर्ता यांचा प्रस्ताव दि.२७/३/२०१८ रोजी त्यांना प्राप्त झाला. संपूर्ण कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत नरसिंग यांच्याकडे मोटार सायकल चालविण्याचा वैध परवाना नव्हता, असे दिसून आले. त्या कारणास्तव तक्रारकर्ता यांचा प्रस्ताव नाकारला आहे आणि तसे पत्र दि.२७/३/२०१८ रोजी तक्रारकर्ता यांना देण्यात आले. करारातील अटी व शर्तीनुसार वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांचा प्रस्ताव योग्य कारणास्तव नाकारला. अंतिमत: तक्रारकर्ता यांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(३) विरुध्द पक्ष क्र.२ यांनी दि.४/९/२०१८ रोजी लेखी निवेदन दाखल केले. लेखी निवेदनामध्ये सर्वप्रथम त्यांनी अपघात विमा योजनेखाली प्राप्त होणा-या दाव्यासंबंधी होणा-या कार्यपध्दतीचा तपशील नमूद केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे जयका इन्शुरन्स हे मध्यस्त आहेत आणि दावा मंजूर-नामंजुरीची बाब विमा कंपनीच्या अखत्यारीत असते. त्यांचे पुढे कथन आहे की, दि.५/३/२०१७ रोजी तक्रारकर्ती यांच्या पतीचे निधन झाले. तक्रारकर्ती यांनी योजनेंतर्गत विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे अर्ज सादर केला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्यामार्फत तो विरुध्द पक्ष क्र.२ यांना दि.२५/१/२०१८ रोजी प्राप्त झाला. त्यांनी तो दावा दि.२४/२/२०१८ रोजी विरुध्द पक्ष क्र.१ यांच्याकडे पाठविला. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.१ यांनी मयत व्यक्तीच्या नांवे वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे दि.२७/३/२०१८ रोजीच्या पत्राद्वारे नामंजूर केला. विरुध्द पक्ष क्र.२ यांनी त्यांची जबाबदारी त्वरीत व व्यवस्थित पार पाडली आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी तक्रारकर्ती यांची तक्रार रद्द करण्यात यावी, अशी त्यांनी विनंती केलेली आहे.
(४) विरुध्द पक्ष क्र.३ हे जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांनी लेखी निवेदन दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(५) तक्रारकर्ती यांची वादकथने, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदन, उभय पक्षांनी दाखल केलेले कागदपत्रे इ. चे अवलोकन करण्यात आले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला असता न्यायनिर्णयासाठी खालीलप्रमाणे उपस्थित होणा-या मुद्यांचे सकारण उत्तरे त्यांच्यापुढे नमूद करुन कारणमीमांसा देत आहोत.
मुद्दे उत्तर
(१) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
निर्माण केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(२) तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(३) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारणमीमांसा
(६) मुद्दा क्र. 1 व 2 :- गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेनुसार राज्यातील शेतक-यांना विमा कंपनीने अपघाती विमा संरक्षण दिल्याबाबत उभय पक्षांमध्ये वाद नाही. मौजे कोलेगाव येथे मयत नरसिंग यांचे नांवे शेतजमीन असल्याबाबत ७/१२ उतारा अभिलेखावर दाखल आहे. अभिलेखावर दाखल पोलीस कागदपत्रे व शवचिकित्सा अहवालाचे अवलोकन केले असता मयत नरसिंग यांचा वाहन अपघातामध्ये डोक्यास इजा होऊन मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते. मयत नरसिंग यांच्या मृत्यूनंतर विमा रक्कम मिळविण्याकरिता तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष क्र.३ यांच्यामार्फत विमा दावा दाखल केला आणि विरुध्द पक्ष क्र.१ यांनी दि.२७/३/२०१८ रोजीच्या पत्राद्वारे मृतकाकडे मोटार सायकल चालविण्याच्या वैध परवाना नाही, असे कारण देऊन विमा दावा नामंजूर केला, याबाबत उभय पक्षांमध्ये विवाद नाही.
(७) विरुध्द पक्ष क्र.१ यांचेतर्फे विधिज्ञांनी युक्तिवाद केला की, मयत नरसिंग यांच्याकडे मोटार सायकल चालविण्याचा वैध परवाना नव्हता; जो की करारातील अटी व शर्तीनुसार बंधनकारक आहे आणि त्यामुळे तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर केला आहे. उलटपक्षी तक्रारकर्ती यांचेतर्फे विधिज्ञांनी युक्तिवाद केला की, मयत नरसिंग यांचा वाहन अपघातामध्ये मृत्यू झालेला असून विरुध्द पक्ष क्र.१ यांनी चूक कारण देऊन विमा दावा नामंजूर केलेला आहे.
(८) मयत नरसिंग यांचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल केला नसल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.१ यांनी विमा रक्कम देण्याचे दायित्व अमान्य केल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ती यांचेतर्फे विधिज्ञांनी युक्तिवाद केला की, विरुध्द पक्ष क्र.१ यांनी चुकीचे कारण देऊन विमा दावा नामंजूर केला आहे. आमच्या मते, विमा दावा नामंजूर करण्याचे विरुध्द पक्ष क्र.१ यांचे कृत्य चूक व अयोग्य आहे, हे सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारकर्ती यांच्यावर येते. वास्तविक मयत नरसिंग यांच्याकडे वैध वाहन चालविण्याचा परवाना होता, असेही तक्रारकर्ती यांचे कथन नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.१ यांच्याकडे विमा दाव्यासोबत किंवा जिल्हा आयोगाकडे प्रस्तुत प्रकरणाच्या अनुषंगाने तक्रारकर्ती यांनी मयत नरसिंग यांचा वाहन चालविण्याचा वैध परवाना दाखल केलेला नाही.
(९) कृषि आयुक्त, विरुध्द पक्ष क्र.१ व विरुध्द पक्ष क्र.२ यांच्यामध्ये दि.२ डिसेंबर, २०१६ रोजी झालेल्या करारपत्रातील कलम क्र.६ खालीलप्रमाणे आहे.
(VI) Other documents required for specific kinds of accidents :
(A) Road Accident/Railway Accident :
i) First Information Report (F.I.R.)
ii) Spot Panchnama
iii) Inquest Panchnama
iv) Post Mortem Report
v) Valid Driving Licence
Considering the motor vehicle facilities in the area in which the farmers are staying, claims arising due to some accidents as stated in (1) to (3) below will be considered as payable in case the documents stated above are submitted.
1. Accidents occurring due to carrying of passenger in excess of the capacity of vehicle.
All farmers except the one who is driving should be eligible for the claim.
2. Accidents occurring where the driver does not have a driving license.
All farmers except the one who is driving should be eligible for the claim.
3. Accidents occurring where ...........
(१०) उपरोक्त तरतुदीनुसार वाहन चालविण्याचा परवाना नसताना अपघात घडल्यास वाहन चालविणा-या चालक (Driver) शेतक-याव्यतिरिक्त इतर शेतकरी दाव्याकरिता पात्र असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
(११) या ठिकाणी आम्हाला हे सुध्दा नमूद करावेसे वाटते की, मोटार वाहन कायद्याचे कलम ३ प्रमाणे कोणत्याही व्यक्तीस तिला मोटार वाहन चालविण्यास प्राधिकार देणारे खुद्द तिला देण्यात आलेले परिणामक चालन लायसन धारण करीत असल्याशिवाय, तिला कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ते वाहन चालविता येणार नाही. याचाच अर्थ सार्वजनिक स्थळी वाहन चालविण्याकरिता कार्यक्षम (Effective) ड्रायव्हींग लायसेन्सची आवश्यकता वाहनचालकाकडे असणे गरजेचे आहे. असे दिसते की, वाहन अपघातामुळे निर्माण झालेले दावे निकाली काढण्याकरिता विमा करारपत्रामध्ये अट (VI) तरतूद समाविष्ट केलेली आहे. अशा स्थितीमध्ये मयत नरसिंग यांच्याकडे अपघातसमयी मोटार सायकल चालविण्याचा वैध व कार्यक्षम वाहन परवाना नव्हता आणि त्या कारणास्तव विमा दावा नामंजूर केला असल्यास विमा कंपनीचे ते कृत्य सेवेतील त्रुटी ठरणार नाही, असे जिल्हा आयोगाचे स्पष्ट मत आहे.
(१२) विरुध्द पक्ष क्र.१ यांनी ‘नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. /विरुध्द/ संजीव कुमार’, २०१३ सी.जे. (एन.सी.डी.आर.सी.) ४२४; ‘न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लि. /विरुध्द/ सुरेशचंद्र अग्रवाल’, २००९ सी.जे. (एस.सी.) १०१२; ‘रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. /विरुध्द/ जिवाभाई मलदेभाई गोधानिया’, २०१७ सी.जे. (एन.सी.डी.आर.सी.) १७८ व ‘भारती अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लि. /विरुध्द/ आण्णासाहेब बापुराव गंधुरे’, २०१६ सी.जे. (एन.सी.डी.आर.सी.) ९८ या न्यायनिर्णयांचा आधार घेतला आहे. सदर निर्णयांमध्ये विमाधारकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्यामुळे त्यांना विमा रक्कम देय नाही, असे निरीक्षण दिसून येते. प्रस्तुत प्रकरणामध्ये उक्त न्यायनिर्णयातील तत्व लागू पडते.
(१३) वरील विवेचनाच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्ती यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही. त्या अनुषंगाने तक्रारकर्ती ह्या विमा नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र नाहीत. अनुतोष मागणीनुसार विरुध्द पक्ष क्र.२ व ३ यांनी तक्रारकर्ती यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही. अंतिमत: मुद्दा क्र.१ व २ चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
ग्राहक तक्रार क्रमांक : १९०/२०१८.
आदेश
(१) तक्रारकर्ती यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
(२) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. किशोर दत्तात्रय वडणे)
(श्री. मुकुंद भगवान सस्ते) अध्यक्ष (श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद (महाराष्ट्र)
-०-